संदीप राक्षे
सातारा – जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अजेंड्यावर जिल्ह्याचा पर्यटनाचा विषय असतो. राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त साताऱ्यातील बाजीरावाच्या विहिरीला पोस्ट कार्डावर स्थान मिळाले ही सातारकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे. मात्र,आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या विहिर व परिसराचा शहरातील पर्यटनवाढीच्या दृष्टीने या विकास करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सातारा शहर म्हणजे ऐतिहासिक शाहूनगरी. शह व परिसर निसर्ग समृद्ध असून येथे अनेक ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केल्यास त्याचा फायदा शहर तसेच जिल्हा प्रशासनाला होणार आहे .येथील किल्ले अजिंक्यतारा, छत्रपती शिवाजी संग्रहालय, चार भिंती स्मारक, शहरातील कमानी हौदांसह विविध दगडी हौद, तळी, महादरे परिसरातील फुलपाखरू संवर्धन उद्यान, कुरणेश्वर व खिंडीतील गणपती, यवतेश्वर अशी अनेक स्थळे साताऱ्यात भेटी देण्यासारखी आहेत. बाजीराव विहिरीसह या सर्व स्थळी पर्यटन पॉइंट विकसित करण्याची अपेक्षा इतिहासप्रेमी व वारसा संवर्धन संस्थेच्यावतीने व्यक्त होत आहे.
पर्यटकाला कास पठाराकडे जाताना साताऱ्यात मुक्काम करून येथील स्थळे पाहता यावीत या दृष्टीने दीर्घकालीन धोरण आखले जाणे गरजेचे आहे. यामध्ये अजूनही साताऱ्याच्या आजच्या पिढीला माहीत नसलेली शुक्रवार पेठेतील बाजीरावची विहीर हे स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित होण्याच्या दर्जाचे निश्चित आहे. स्टेपवेलमध्ये पायरी विहीर या प्रकारात मोडणारी ही ऐतिहासिक वास्तू दोन मजली असून यामध्ये दोन स्वतंत्र दालने आहेत. या विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा असून या विहिरीच्या कमानीवर छत्रपती शाहू महाराज यांचे शिल्प राजचिन्हांसह कोरण्यात आले आहे. पहिले बाजीराव पेशवे यांचे साताऱ्यात वास्तव्य असताना या परिसरात ते राहयला होते. छत्रपती शाहू महाराज आणि त्यांची या विहिरीच्या परिसरात असणाऱ्या दालनांमध्ये खलबते चालत असत म्हणून आजच्या शुक्रवार पेठेला पूर्वी बाजीराव पेठ असे म्हणले जात असे.
स्टेपवेल या प्रकारातील विहिरीला राष्ट्रीय टपाल विभागाने पोस्ट कार्डवर छायाचित्र म्हणून प्रसिद्धी दिल्याने शहराच्या गौरवशाली परंपरेत भर पडली आहे. मात्र, एवढ्यावरच समाधान न मानता या शुक्रवार पेठेतील विहिरीचा पर्यटनस्थळाच्या दृष्टीने कसा विकास होईल याकडे दीर्घकालीन पाठपुरावा करून नगरपालिकेने विकासात्मक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे तसेच पुरातत्त्व विभागाकडे सादर करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याला भरभरून निधी दिला आहे. त्याप्रमाणेट शा निधीतून बाजीरावच्या विहिरीचा विकास केल्यास लिंब येथील बारा मोटेच्या विहिरीबरोबर बाजीरावच्या विहिरीची सुद्धा राष्ट्रीय पातळीवर पर्यटनस्थळ म्हणून एक वेगळी ओळख होणार आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास या सर्व पर्यटनस्थळांचा विकास होणे सहजसाध्य आहे.
साताऱ्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी…
वारसा ग्रुपचे सक्रिय सदस्य राजेश कानीम म्हणाले, “”या विहिरीसह स्थळांमध्ये पर्यटन विकास होण्याचा निश्चित दर्जा आहे. मात्र, त्यासाठी शासकीय पातळीवर अखंड पाठपुरावा आणि त्याचे शास्त्रीय सादरीकरण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळही आवश्यक आहे. सध्या ही विहीर शुक्रवार पेठेतील जलमंदिरच्या परिसरात असून तो खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीचा भाग आहे.
त्यामुळे पर्यटनवाढीच्या दृष्टीने या स्थळाचा विकास झाल्यास त्याचा महसूल हा सातारा पालिकेला मिळणार आहे.” माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के म्हणाले, साताऱ्यात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या स्थळांचा टप्प्याटप्प्याने नियोजनपूर्वक विकास केल्यास सातारा शहर पर्यटन नगरी बनण्यास काहीच अडचण येणार नाही. पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास पर्यटक कास पठाराकडे जाण्यापूर्वी आवर्जून साताऱ्यात मुक्काम करतील. त्या पर्यटन शुल्काचा महसूल साताऱ्याला प्राप्त होणार असून ऐतिहासिक शाहूनगरीची पर्यटन नगरी म्हणून एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.