मंजिले उन्ही को मिलती है। जिनके सपनो में जान होती है॥ पंखो से कुछ नहीं होता। हौसलो से उडान होती है ॥ अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत चिकाटीच्या जोरावर बांधकाम, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याची छाप निर्माण करणारे आणि जिल्हयात समाजसेवक म्हटले की पहिले नाव येते ते राजेंद्र चोरगे यांचे. सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे समाजाप्रती असणारी तळमळ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती आणि याच तळमळीतून त्यांच्या हातून कैलास स्मशानभूमी, श्री. छ.शाहू जिल्हा क्रीडा संकुल, गुरुकुल स्कूल, श्री बालाजी पतसंस्था व ट्रस्ट, सवयभान याची निर्मिती झाली. तसेच क्रीडा क्षेत्रातही अनेक संघटनाच्या प्रमुख पदावर आहेत. राजेंद्र चोरगे यांनी सहन केलेले कष्ट, अनुभवलेली गरिबी इतरांना अनुभवायला लागू नये म्हणून ते अखंड कार्यरत असतात. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने…..
श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना : 15 ऑगस्ट 1999 रोजी आपल्या सवंगड्यांसोबत ट्रस्टची स्थापना करून ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उद्दीष्टाने शहर व परिसरात सार्वजनिक स्वच्छता, रक्तदान शिबिर, योग प्रशिक्षण, व्यसन विरोधी कार्यक्रम, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना आर्थिक सहकार्य, गरीब गरजूंना मदत अशा अनेक प्रकारचे उपक्रम सर्वसामान्यांसाठी राबविले. शहरात पहिल्यांदा घंटागाडी सुरु करण्याचा मान श्री बालाजी ट्रस्टला मिळाला. शहरात एकेरी वाहतुकीसाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. गणेशोत्सव काळात पोलीस व होमगार्ड यांना फुडस् पॅकेटचे वाटपाची परंपरा गेली एकवीस वर्षे अविरतपणे सुुरु आहे.
श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था : पतसंस्थेची स्थापना करून गोरगरीब बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. सलग 20 वर्षे सातत्याने उत्कृष्ठरित्या चालणार्या नामांकित संस्थेपैकी ही एक संस्था आहे. शहरात वीज बील स्विकृती केंद्र सुरु करण्यात आली. कोवीड 19 महामारीच्या काळात अत्यंत कमी व्याज दरात कर्ज देणारी ही पहिली संस्था आहे.
कैलास स्मशानभूमी : सन 2003 साली ट्रस्ट व लोकसहभागातून संगम माहूली येथे कैलास स्मशानभूमी उभारण्यात आली. कोणत्याही प्रकारचे शासकीय निमशासकीय अनुदान मिळत नसताना सुद्धा गेली 21 वर्षे उत्कृष्ठ रित्या संगोपन करत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लाकडा ऐवजी शेणीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून शेणी बनवून घेतल्यामुळे त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या या ठिकाणी प्रत्येकाचा शेवटचा प्रवास सुखकर होतो. राजेंद्र चोरगे यांच्या दिनचर्येची सुरुवात या ठिकाणी भेट देऊनच होत असते. आजपर्यंत 29000 व कोवीड 19 मध्ये 4400 मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हयात वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढत होती.
कैलास स्मशानभूमी मध्ये शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी गौरविले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आदर्शवत स्मशानभूमी ठरली आहे. काही दुर्धर आजाराने मृत्युमूखी पडलेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करताना काही अडचणी उभ्या राहत होत्या. त्यासाठी गॅस दाहिनीची गरज होती. अनेक दानशुरांनी पुन्हा एकदा साहेबांच्या ओंजळीत भरभरुन दान दिले. यात प्रामुख्याने कै. जुगलकिशोर कालाणी व श्री. सावजी सुंदरजी वाघेला यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे कैलास स्मशानभूमीत सव्वा कोटी रुपयांची अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गॅस दाहिनी उभारण्यात आली आहे.
श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल : जिल्हयातील क्रीडा क्षेत्राची परंपरा जोपासण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर क्रीडा संकुल उभारणीचे काम मुदतीत पुर्ण केलेले पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले क्रीडा सुंकल आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक खेळाडू या संकुलात निर्माण होत आहेत. आज सातार्याची ओळख म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.
नाविन्यपूर्ण गुरुकुल स्कूल : गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 2008 साली या गुरुकुल स्कूलची जबाबदारी घेतली असून 1340 विद्यार्थी व 90 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. इ.10 वीच्या 100% निकालाची परंपरा कायम असून अनेक क्षेत्रात विद्यार्थी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आले आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच क्रीडा, नृत्य,सेंद्रिय शेती, वीज बचत, पाणी वाचवा व झाडे लावा अशा प्रकारचे अभियान विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरु असून एन.सी.सी., बॅन्ड पथक इ. सुविधा आहेत. विविध उपक्रमामुळे विद्यार्थी शाळेतून बाहेर पडताना समाजासमोर सर्वगुणसंपन्न होऊनच बाहेर पडतो.
सवयभान (मीच माझ्या सातारकरांचा रक्षक) : करोना काळात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने राजेंद्र चोरगे यांनी बाजार पेठेतील व्यापारी व संघटना यांना बरोबर घेऊन ‘सवयभान’ संस्थेची स्थापना करून विविध उपक्रम राबविले. मोफत ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून शहरातील गर्दीच्या ठिकाणे तसेच शासकीय कार्यालये सॅनिटाईज केली. प्रतिकार शक्ती संवर्धक गोळ्यांचे वाटप, पोलिसांना फेस शिल्ड, मास्क वाटप करण्यात आले. गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट देण्यात आले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले.
सातारा जिल्हा अॅमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन : सन 2007 ला स्थापना केली असून यामध्ये आज मितीस 13 क्लब कार्यरत आहेत. जिल्हयामध्ये चार बॉक्सिंग रिंग, प्रशिक्षित प्रशिक्षक आहेत. 30 पंच असून सुमारे 450 खेळाडू सराव करीत असून 40 राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. दोन राज्य स्तरीय व दोन राष्ट्रीय स्पर्धेचे, तसेच 72 वी वेस्टर्न इंडीया बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा : धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने सहा.धर्मादाय आयुक्त सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिमाखदार पद्धतीने विवाह सोहळ्याचे नियोजन करून सन 2018 मध्ये 36 व सन 2023 मध्ये 29 जोडप्यांचे विवाह करण्यात आले. या सोहळ्यात मणीमंगळ सुत्र, शालू, सफारी, पादत्राणे, संसारपयोगी भांडी तसेच वर्हाडी मंडळींना मोफत जेवण व्यवस्था करण्यात आली होती.
राजेंद्र चोरगे विविध संस्थांचा कार्यभार सांभाळत असून विविध क्षेत्रातील अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. नुकतेच त्यांच्या या कार्याचा गौरव करताना आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांनी ‘सामाजिक रत्न’ या पुरस्काराने गौरविले आहे. अशा या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभासारखे काम करणारे राजेंद्र चोरगे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
जगदीश खंडेलवाल (चेअरमन)
श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा