लखनौ – लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या आपल्या स्थलांतरित मजुरांना परत आणण्याची प्रक्रिया उत्तर प्रदेशने सुरू केली आहे. त्याअंतर्गत शनिवारी हरियाणातून 2224 मजुरांची राज्यवापसी झाली.
मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असणारे अनेक मजूर देशाच्या विविध भागांत अडकले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने परराज्यांतून आणण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुढाकार घेतला आहे. योगींच्या आदेशावरून हरियाणात 82 बस पाठवण्यात आल्या. त्या बसमधून 2 हजारांहून अधिक मजूर परतले. आता आणखी 11 हजार मजुरांना हरियाणातून पुढील एक ते दोन दिवसांत उत्तर प्रदेशात आणले जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या सूत्रांनी दिली.
परराज्यांतून आणलेल्या आपल्या मजुरांना उत्तर प्रदेश 14 दिवस विलगीकरणात ठेवणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने निवारागृहांची व्यवस्था केली जात आहे. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर मजुरांना त्यांच्या मूळ गावाजवळ रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशातून उत्तर प्रदेश सरकार हालचाली करत आहे.
अनेक राज्यांमधील स्थलांतरित मजूर इतरत्र अडकून पडले आहेत. त्यांना पैशांची चणचण भासत आहे. त्यामुळे मूळगावी परतण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी स्थलांतरित मजुरांकडून केली जात आहे.