सातारा – कास पठाराला युनेस्कोने वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. तरी पण येथील पर्यटनवृद्धीसाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी येथे पर्यटक येणे गरजेचे आहे. पर्यटकांना सुविधा मिळणे गरजेचे असून छोट्या- मोठ्या उद्योगांचे स्टार्टअप हीच पर्यटनाची संजीवनी आहे. पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभ्या करून कास महोत्सवासारखे उपक्रम वारंवार राबवले गेल्यास येथील पर्यटनवृद्धीला निश्चित संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
सी प्लेन, वॉटर स्पोर्टस् यासारख्या सुविधा व्ह्यूविंग गॅलरी, बोटिंग अशा विविध माध्यमांतून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देणे शक्य आहे व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन उदयनराजे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन विभाग यांच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय कास महोत्सवाचे उदघाटन आटाळी गावच्या हद्दीतील सभा मंडपात झाले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम, अभिनेते मिलिंद इंगळे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, पंकज चव्हाण इत्यादी यावेळी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, “”महाबळेश्वर, पाचगणी, कास, पाटण हा सर्व भाग सह्याद्रीच्या एकाच रांगांमध्ये येतो, येथील नागरिकांनी रोजगार निर्मिती होत नसल्याने पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन आपले शून्यातून विश्व निर्माण केले. पण काससारख्या डोंगरी भागांमध्ये निसर्ग सौंदर्य भरपूर असताना पर्यटन आणि रोजगार यामध्ये अजिबात वाढ झाली नाही. त्यामुळे या भागात पर्यावरणपूरक सोयीसुविधा निर्माण करणे आणि स्थानिकांना रोजगार निर्माण करून देणे यासारख्या कल्पनांना चालना देण्यासाठी कास महोत्सव ही एक सुवर्णसंधी आहे.
येथे ग्रामोद्योग प्रदर्शन, खाद्यान्न प्रदर्शन तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम, कास पठारावरील फुलणाऱ्या फुलांचे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांचे मनोरंजन होणार असून त्यांना निसर्गाचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे.” कास परिसराच्या पायाभूत सुविधा आणि रोजगारांसाठी कास परिसरात वॉटर स्पोर्टस् विकसित करण्याचे नियोजन केंद्र शासनाच्या सहकार्याने केले जाणार आहे. त्याकरता केंद्र व राज्य यांचा संयुक्त निधीतून हे करणे शक्य होणार आहे. परराज्यातील नागरिकांना कास पठारावर येण्यासाठी थेट सी प्लेन सुविधा सुरू करता येईल काय याकरता केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, “”कास परिसरातील नागरिकांना आपली संस्कृती, आपली ग्रामरचना तसेच आपल्या परंपरा कास महोत्सवाच्या माध्यमातून करणे शक्य आहे. यातून होणारी रोजगार निर्मिती येथील पर्यटनाला चांगली चालना देऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी या कास महोत्सवाचा निश्चित लाभ घ्यावा.” कार्यक्रमाची सुरुवात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानंतर दीप प्रज्वलनाने झाली.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार उदयनराजे भोसले व मिलिंद इंगळे, किशोर कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महादेव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. दीप्ती भागवत यांनी सूत्रसंचालन केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध कार्यक्रमांचा आनंद पठारावर आलेल्या पर्यटकांनी लुटला. या महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री शंभूराज देसाई व पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ऐनवेळी तांत्रिक कारणास्तव त्यांच्या हस्ते होणारे उद्घाटन रद्द झाले.
=============================