पुणे, दि. 7 -शाळांमध्ये इयत्ता पहिली, दुसरीपासून परीक्षा न घेता तिसरीपासून परीक्षा घेण्यात येणार आहे, असे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केले. “याचा अर्थ तिसरीपासून विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणार असेही नव्हे,’ असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत मुलांना अनुत्तीर्ण करता येत नाही. तिसरीपासून परीक्षा सुरू झाल्यानंतर त्यात विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणार का? यावर तसे काही होणार नसल्याचे म्हटले. 20 पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या प्रश्नांवर केसरकर म्हणाले, “कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती शासनाकडून मागविली की तो निर्णय झालेला असे होत नाही. या शाळा क्लस्टर पद्धतीने सुरू करता येतील का, असाही विचार आहे. मुलं संख्येने जास्त असतील तर मुलांचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो. या शाळांतील विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टचा खर्च पाहिला जाणार आहे. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शिक्षक भरती होणार
सध्या राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या संख्येने रिक्त आहेत. तसेच राज्यातील काही शाळांमध्ये शिक्षक हे अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांना पहिल्यांदा समायोजन करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षक भरती होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध खात्यात 75 हजार पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्यात शिक्षकही भरती केले जाणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.