नवी दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह 16 बंडखोर आमदार अपात्र ठरतील, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (eknath shinde) 16 आमदारांची राजकीय तिरडी बांधलेली आहे, फक्त हे राम म्हणायचे बाकी आहे, अशी घणाघाती टीका आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी संजय राऊत (Sanjay Raut) दिल्ली येथे आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले, आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून त्यांनी निर्णय घेतला तर संसदीय राजकारणाच्या इतिहासात त्यांचे नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिले जाईल.
महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे सरकार हे फसवणुकीतून निर्माण झालेले सरकार आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांना पैसे मिळाले असतील किंवा त्यांना ईडी-सीबीआयची भीती वाटत असेल. त्यामुळे हे आमदार सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेले आहेत.
महिला विधेयकावरुन भाजपवर आरोप
लोकसभेत कालच महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. एमआयएम वगळता सर्वच पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.
या विधेयकावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी “अनेक प्रमुख नेते पुन्हा सभागृहात निवडून येऊ नयेत यासाठी हे विधेयक सत्ताधाऱ्यांनी घाईघाईने आणले आहे.
तसेच, फक्त आमदार-खासदार वाढून महिला सबलीकरण होत नसते. त्यासाठी महिलांचा सन्मान आणि अधिकार जपायला हवेत,’ असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.