मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाजपच्या आराध्य दैवतांकडून ज्या पद्धतीने अपमान होतोय,त्यानंतर आम्हालाच शहाणपण शिकवलं जातंय या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्र संतापला आहे, खवळला आहे. याचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
राज्यपालांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याचा यावेळी राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. छत्रपतींचा अपमान हा या राज्यातील ११ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे.या मातीचा अपमान आहे. या राज्यात काम करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाचा हा अपमान आहे. देशात अशा कोणत्याच नेत्याचा अपमान होऊ नये ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. जो ऍक्शन प्लॅन आहे तो केव्हाही होऊ शकतो. आम्ही वाट पाहतोय जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून सोडून गेले ते आमदार,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे हात चोळत किती वेळ बसणार आहेत. हे आम्ही महाराष्ट्राला दाखवत आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही जी पावले उचलायची ती उचलत आहोत. राज्यपालांसह सुधांशु त्रिवेदीचा बचाव केला जातोय. या महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. पंडित नेहरूंकडून जेव्हा अपमान झाला होता तेव्हा त्यांनी माफी मागितली होती. इतके ते मोठे होते. त्यांना जेव्हा समजलं आपल्या लिखाणात आणि बोलण्यात चूक झाली त्यावेळी त्यांनी पंतप्रधान असतानाही माफी मागितली. असा दाखला देखील राऊत यांनी यावेळी दिला. मुरारजी देसाई यांच्याकडून देखील छत्रपतींविषयी चुकीची विधाने गेली होती त्यांनी देखील माफी मागितली पण भारतीय जनता पक्षाचे हे जे टगे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपणा शिकवताहेत. हे महाराष्ट्र बघतोय याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.
राजकारण म्हणजे मिमिक्री नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या आवाजाची नक्कल देखील केली संजय राऊत यांनी आता यारूनच राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू हे असं आवाज काढणं आता खूप झालं. याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र पहा आपण आता मॅच्युर झालेले आहात. जे आमच्यावर टीका करताहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.