मुंबई – शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. राऊत यांनी मात्र आपण कोणताही गैरव्यवहार केला नसून आपल्यावर करण्यात येत असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप केला आहे. अशातच आज संजय राऊत यांनी त्यांच्या आई सविता राऊत यांना एक भावनिक पत्र लिहले आहे. संजय राऊत यांच्या अधिकृत खात्यावर ८ ऑगस्टला लिहलेलं हे पत्र पोस्ट करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी पत्रात नमूद केलेल्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकणार आहोत… ( sanajay raut letter to mother savita raut )
केंद्र सरकारवर तिरकस निशाणा…
पत्राची सुरुवात करतानाच संजय राऊत यांनी, “खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज ‘सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौन्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौन्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले, आता है पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली.” असं म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर तिरकस निशाणा साधला आहे.
‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले तेव्हा…
संजय राऊत यांनी पत्रात पुढे ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर धाड मारली तेव्हा नेमकं काय काय घडलं याची आठवण करून दिली आहे. ते लिहतात, “रविवारी (१ ऑगस्ट) ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच तू आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये म्हणालीस. खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज ‘सामना’त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.”
शिंदे गटावर निशाणा | sanajay raut letter to mother savita raut
संजय राऊत यांनी पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उल्लेख ‘कायर’ असा करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ते लिहतात, “आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही कायर भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा काहीतरी करा, शिवसेना वाचवा!” असे सांगणारी तूच होतीस. “हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?” असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच.”
केंद्रीय यंत्रणांवर पुन्हा आरोप
पत्राच्या पुढील भागात राऊत यांनी केंद्रीय यंत्रणा मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप केला आहे. ते लिहतात, “शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मराठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’ वगैरेच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी ‘गन पॉइंट वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकरेंची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?”
सोनिया व राहुल गांधींचाही छळ | sanajay raut letter to mother savita raut
पत्रामध्ये राऊत यांनी सोनिया व राहुल गांधी यांच्याविरोधात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवर भाष्य केले आहे. ते लिहतात, “आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, ‘नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल.”
आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव
राऊत यांनी पत्रात पुढे शिवसेनेशी बेइमानी करण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याचं म्हटलंय. ते लिहतात, “जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुध्द बोलू नका, महाग पडेल, अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे!”