मुंबई – शिवसेनेमधील बंडाळी ही शिवसेनेची नसून भारतीय जनता पक्ष प्रणीत होती. भाजप जास्त वेळ सत्तेविना राहू शकत नाही त्यामुळे पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली आहे, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्षांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शिवसेना फोडण्याचे काम भाजपने केले आहे, असा आरोप यावेळी जयंतराव पाटील यांनी केला. पुढे ते म्हणाले की, शिवनेसा पक्षाच्या नावावरून निवडणूक आयोग ज्याप्रमाणे निर्णय घेत आहे, त्यावर जयंत पाटील यांनी शाशंका व्यक्त केली. या निर्णयातून राज्यातील जनतेचा राग वाढतो आहे. या सरकारला विरोध करण्याची भूमिका लोकांमध्ये वाढते आहे, असे चित्र निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
भाजप जास्त वेळ सत्तेविना राहू शकत नाही त्यामुळे पडेल ती किंमत देऊन त्यांनी शिवसेना फोडली आहे. राज्याची जनता ही भाजपच्या विरोधात गेली आहे. शिवसेनेच्या फुटीर गटावर जनता नाराज आहे याचे खापर कोणावर मारायचे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बोट दाखवले जात आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
आपला पक्ष टिकवायचा असेल तर पुढचा पक्ष हा प्रोफेशन पद्धतीने फोडला पाहिजे हा उद्देश ठेवून भाजपने शिवसेना फोडली. आता त्यांचे चिन्ह आणि नावही काढून घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेल्यावर ती कोणाच्या घरात मिळेल हे थोड्या दिवसांनी कळेल. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सर्व देण्याची व्यवस्था ही आयोगाच्या माध्यमातून होईल यात शंका नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.