नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील भाजपची विवादित लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिने काल आणखी एक विवादित वक्तव्य करत स्वतःला व भाजपला अडचणीत आणण्याचे काम केले होते. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने काल एका माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना, “नथुराम गोडसे ‘देशभक्त’ होते, ते ‘देशभक्त’ आहेत आणि ते ‘देशभक्तच’ राहतील. जे लोक नथुराम गोडसेंना आतंकवादी म्हणतात त्यांनी आत्मचिंतन करायला हवं, अशा लोकांना या निवडणुकीत जनतेकडून योग्य उत्तर देण्यात येईल” असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
साध्वीच्या या वक्तव्यानंतर भाजपने स्वतःला तिच्या या वक्तव्यापासून दूर ठेवत “नथुराम गोडसे” देशभक्त आहेत आणि राहतील या प्रज्ञा सिंगच्या या विधानाशी भाजप सहमत नाहीये. आम्ही तिच्या विधानाचा निषेध करतो. तसेच पक्षातर्फे तिला या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात येईल, तिने या विधानासाठी सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे.” अशी भूमिका मांडली होती.
मैं नाथूराम गोडसे के बारे में दिये गए मेरे बयान के लिये देश की जनता से माफ़ी माँगती हूँ । मेरा बयान बिलकुल ग़लत था । मैं राष्ट्रपिता महात्मा गांधी जी का बहुत सम्मान करती हूँ ।
— Sadhvi Pragya Official (@SadhviPragya_MP) May 16, 2019
दरम्यान, पक्षाकडून आपल्या वक्तव्याबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर साध्वीने आज ट्विटरद्वारे आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली असून, “मी काल नथुराम गोडसे बाबत केलेल्या वक्तव्याबाबत देशाच्या जनतेची माफी मागते. माझं वक्तव्य अतिशय चुकीचं होतं मी महात्मा गांधींचा खूप सन्मान करते.” असं ट्विट तिने आपल्या अधिकृत ट्विटरखात्यावरून केलं असून तिने आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्ट शब्दांमध्ये माफी मागितली आहे.
तत्पूर्वी, पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना भाजपचे प्रवक्ते हितेश बाजपेयी यांनी काल, “साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी माफी मागितली असून त्यांनी आपलं वक्तव्य देखील मागे घेतलं आहे.” अशी माहिती दिली होती. मात्र साध्वीने आपला माफीनामा कोणासमोर सादर केला असा प्रश्न केला असता त्यांनी, “माफी मागितली हे महत्वाचं असून कोणासमोर माफी मागितली हे महत्वाचं नाहीये.” असं उत्तर दिलं होतं.