भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, हे संविधान किती चांगले आहे, हे संविधानाचा वापर कसा केला जातो, यावर ठरेल. गणतंत्र या शब्दात गण आघाडीवर आहे. ते इंजिन आहे आणि तंत्र त्यामागून येते. अशा पार्श्वभूमीवर संविधानाची श्रेष्ठता गणांवर म्हणजेच लोकांवर अवलंबून आहे. कारण तंत्राची निवड लोकच करतात.
अमेरिका ही सर्वांत जुनी आणि भारत ही सर्वांत मोठी लोकशाही आहे, असे काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वर्षांपूर्वी म्हटले असले, तरी वास्तव असे आहे की, भारत हीच सर्वांत मोठी आणि सर्वांत जुनी लोकशाही आहे. स्वातंत्र्य भले 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले असेल. प्रजासत्ताक भले 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले असेल; परंतु इसवीसन पूर्व सहाव्या शतकात भारतात गणराज्ये होती, याचा इतिहास साक्षीदार आहे.
संविधान सभेसाठी जुलै 1946 मध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर देशाची फाळणी झाली. संविधान सभेचेही दोन भाग झाले. संविधान लिहिणाऱ्या सभेत 299 सदस्य होते. डॉ. राजेंद्रप्रसाद अध्यक्ष होते. संविधान तयार करण्यासाठी 166 बैठका झाल्या. 11 सत्रे आयोजित करण्यात आली. बैठकांना उपस्थित राहण्याची माध्यमांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मुभा होती. संविधान लिहून पूर्ण होण्यास 2 वर्षे 11 महिने 17 दिवस लागले.
संविधानाच्या हस्तलिखित प्रतींवर 24 जानेवारी 1950 रोजी 308 सदस्यांनी स्वाक्षरी केली होती. 26 जानेवारी 1950 रोजी सकाळी 10.18 वाजता संविधान लागू करण्यात आले. अर्थात कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा 1930 मध्येच करण्यात आली होती. डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली होती. प्रजासत्ताक दिनीच भारतीय वायुसेना स्वतंत्र संस्था म्हणून अस्तित्वात आली.
संविधानाच्या केवळ दोन मूळ प्रती आहेत आणि त्या हस्तलिखित आहेत. एक हिंदीत आहे आणि दुसरी इंग्रजीत आहे. या प्रती संसद भवनाच्या ग्रंथालयात नायट्रोजन वायूने युक्त खोक्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दोन कंट्रोल मीटरच्या सहाय्याने या खोक्यांवर नजर ठेवली जाते. कोणतीही मुद्रित म्हणजेच प्रिंटेड प्रत उपलब्ध नाही. आतापर्यंत एक हजार प्रती हाताने लिहिल्या गेल्या आहेत. हे जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान आहे. जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा त्यात 395 अनुच्छेद, 8 अनुसूची, 22 भाग होते. आज ही संख्या वाढून 465 अनुच्छेद, 12 अनुसूची आणि 25 भाग एवढी झाली आहे. ब्रिटन, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स आणि जर्मनीकडून काही तरतुदी घेण्यात आल्या आहेत. अर्थात, ब्रिटनचे संविधान अलिखित आहे. 26 नोव्हेंबर हा आपल्या देशात संविधान दिवस आहे.
प्रेमबिहारी रायजादा सक्सेना यांनी संपूर्ण संविधान हाताने लिहिले. त्यासाठी त्यांनी एकही पैसा मानधन घेतले नाही. होल्डर निब शाईत बुडवून-बुडवून संविधान लिहिण्यात आले. प्रेम फाउंडेशनच्या मते, 432 निब यासाठी वापरली गेली. ही निब 303 नंबरची होती. संविधान लिहून काढण्यास सहा महिन्यांचा अवधी लागला होता. जेव्हा संविधान लिहून काढण्यास त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सांगितले की, माझी एक अट आहे. मी संविधानाच्या प्रत्येक पानावर माझे नाव लिहीन. शेवटच्या पानावर माझ्या आजोबांचे नाव लिहीन. त्यांच्या आजोबांचे नाव होते रामप्रसाद सक्सेना. भारतीय संविधान नंदलाल बोस यांनी चित्रांनी सजविले आहे. ही चित्रे म्हणजे भारतीय इतिहासाची यात्राच आहे. सोनेरी किनार आणि लाल-पिवळ्या रंगांचा अधिक वापर करून काढलेल्या या चित्रांचा प्रारंभ भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभापासून होतो.
पुढील भागात भारतीय संविधानाची प्रस्तावना असून, ती सोनेरी किनारीने वेढली आहे. त्यात घोडा, वाघ, हत्ती आणि बैल यांची चित्रे काढलेली आहेत. मोहेंजोदडो संस्कृतीचे अध्ययन करताना जी चित्रे सामान्यतः दिसतात, तीच ही चित्रे आहेत. भारतीय संस्कृतीत शतदल कमळाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच या किनारीमध्ये नंदलाल यांनी शतदल कमळालाही स्थान दिले आहे. समकालीन लिपीत लिहिलेल्या काही अक्षरांनी हे कमळ वेढलेले आहे. या किनारीत मोहेंजोदडोची मुद्राही दिसते. पुढील भागापासून वैदिक काळाला प्रारंभ होतो. कोणत्यातरी ऋषींच्या आश्रमातील एक चित्र आहे. मधोमध गुरूजी बसले आहेत आणि भोवती त्यांचे शिष्य बसल्याचे दर्शविले आहे. शेजारी एक यज्ञशाळाही चित्रित करण्यात आली आहे.
मूलभूत अधिकारांच्या भागाची सुरुवात त्रेतायुगापासून होते. या चित्रात भगवान श्रीराम रावणाला हरवून, सीतेला घेऊन लंकेहून परत आणताना दिसतात. राम धनुष्य-बाण घेऊन पुढे बसले आहेत. त्यांच्या मागे लक्ष्मण आणि हनुमान आहेत. या चित्रावरून संविधान सभेत वादही झाला होता. ऐतिहासिक विकासक्रमानुसार भगवान श्रीकृष्णाचे चित्रही यात आहे. कृष्णाचा गीता उपदेश करतानाचे जे चित्र आपल्याला परिचित आहे, तेच एका भागात नंदलाल यांनी रेखाटले आहे. पाचव्या भागात भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित एक चित्र आहे. महात्मा बुद्ध आणि चार बाजूंना त्यांचे पाच शिष्य वर्तुळ करून बसले आहेत. पुढील भागात भगवान महावीर यांची समाधी मुद्रा रेखाटण्यात आली आहे. आठव्या भागात गुप्तकाळाशी संबंधित एका कलाकृतीत तत्कालीन भारतीय संस्कृतीचा प्रत्येक पैलू दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.
नृत्य करणाऱ्या नर्तिकांच्या चारही बाजूंना वेगवेगळे राजे दिसत आहेत. कलात्मकदृष्ट्या खूप श्रेष्ठ असे हे चित्र आहे. दहाव्या भागात गुप्तकालीन नालंदा विद्यापीठाची मोहर दर्शविण्यात आली आहे. या मोहरेवर देवनागरी लिपीत नालंदा विद्यापीठ ही अक्षरे लिहिली आहेत. अकराव्या भागात ओडिशातील मूर्तिकलेचे एक चित्र आहे. बाराव्या भागात नटराजाची मूर्ती दिसते. तेराव्या भागात महाबलीपुरम मंदिरावरील कलाकृती दिसतात. शेषनागाबरोबर अन्य देवी-देवतांची चित्रे आहेत. भगीरथाची तपश्चर्या आणि गंगावतरणही याच चित्रात आपल्याला दिसते. चौदाव्या भागात मुघल स्थापत्यकलेला स्थान देण्यात आले आहे. बादशहा अकबर आणि त्याचे दरबारी बसल्याचे चित्रात दिसते. मागे चवऱ्या ढाळणाऱ्या महिलाही दिसतात. पंधराव्या भागात गुरू गोविंदसिंह आणि शिवाजी महाराज दर्शविण्यात आले आहेत.
सोळाव्या भागात टिपू सुलतान आणि महाराणी लक्ष्मीबाई यांची ब्रिटिशांविरुद्धची झुंज चित्रित केली आहे. सतराव्या भागात गांधीजींची दांडी यात्रा पाहायला मिळते. पुढील भागात गांधीजींच्या नोआखली यात्रेशी संबंधित चित्र आहे. धार्मिक सद्भावनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चित्रात गांधीजींसोबत दीनबंधू अँड्रयूजसुद्धा आहेत. एक हिंदू महिला गांधीजींना तिलक लावत आहे आणि काही मुस्लिम पुरुष हात जोडून उभे आहेत. एकोणीसाव्या भागात नेताजी सुभाषचंद्र बोस आजाद हिंद सेनेची मानवंदना स्वीकारताना दिसतात. या पवित्र युद्धात आम्हाला महात्मा गांधी यांची आवश्यकता सदैव भासेल, असे या चित्रात इंग्रजीत लिहिण्यात आले आहे. विसाव्या भागात हिमालयाची उत्तुंग शिखरे दिसतात. हे चित्र भारतीय संस्कृतीच्या उंचीचे प्रतीक आहे. पुढील भागात मोठ्या अंतरापर्यंत पसरलेले वाळवंट आणि उंटांचा तांडा दिसतो तर अंतिम भागात समुद्राचे चित्र आहे. बर्मा, इंडोनेशिया, मलय अशा बेटांवर एकेकाळी भारताचे वर्चस्व होते. चित्रात एक विशाल जहाज दर्शविण्यात आले असून, ते आपल्या सागरी विस्ताराचे आणि सागरी मार्गाने केलेल्या यात्रांचे प्रतिनिधित्व करते.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे आयोजन दिल्लीच्या राजपथावर सर्वप्रथम 1955 मध्ये करण्यात आले. पहिलेसंचलन पाहण्यासाठी जे 15,000 लोक जमले होते, त्यांची बसण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. उभे राहूनच सर्वांनी संचलन पाहिले. राजपथाचे पूर्वीचे नाव किंग्ज वे असे होते. 1950 ते 1954 पर्यंत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, लाल किल्ला, रामलीला मैदान तसेच किंग्ज वे या भागात संचलनाचे आयोजन केले जात होते. 1955 मध्ये राजपथावरील संचलनाचे दृश्य पाहणारे पहिले परदेशी पाहुणे होते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहंमद. 1950 मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्रपती डॉ. सुकार्णो हे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनास उपस्थित राहिलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होत. संचलनाच्या शेवटी फ्लाइंग पास्ट असतो. त्याची जबाबदारी पश्चिम कमांडकडे असते.
41 हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने यात सहभागी होतात. 2018 मध्ये सर्वाधिक दहा पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 1953 मध्ये संचलनात प्रथमच लोकनृत्य आणि आतषबाजीला स्थान मिळाले. 23 जानेवारीला संचलनाची तालीम 12 किलोमीटरमध्ये केली जाते, तर प्रत्यक्ष संचलन 8 किलोमीटरचे असते. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी दिली जाते, असे म्हटले जात असले तरी वस्तुतः लष्कराच्या 7 तोफांचीच सलामी दिली जाते. या तोफा 1941 मध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत. लष्कराच्या सर्वच कार्यक्रमांत या तोफा सामील केल्या जातात. गांधीजींचे आवडते गीत लष्करी बॅंडवर वाजवून संचलनाची सांगता केली जात असे. मागील वर्षीपासून हे गीत बदलण्यात आले आहे. या कार्यक्रमाला बीटिंग रीट्रिट म्हणतात आणि प्रजासत्ताक दिनानंतर तीन दिवसांनी हा कार्यक्रम पार पडतो.
– योगेश मिश्र