जिना चढायला म्हणून पायरीवर पाय ठेवला आणि वर पाहिले, चौदा पायऱ्या चढल्यावर एक टप्पा पूर्ण होणार होता. असे चार जिने चढून जावयाचे होते. चढायचे ठरवले. थोडा दम लागत होता. पण सहज चढले. चढताना मनात विचार चालू होते.. अरे आपले जीवनही जिन्यासारखेच आहे की.
आज चारपेक्षा जास्त जिने चढून आलोच इथपर्यंत. पहिल्या पायरीवर असताना कुठे माहीत होत की किती चढण चढायची आहे. पण कष्टाने का होईना चढत राहिलोच. कधी आधाराला कोणी होते कधी नाही. पण प्रत्येक पायरीवर काहीतरी शिकत राहिलो. अनुभव घेत राहिलो. पण चढण काही थांबविता येत नाही.
पायरी म्हणजे टप्पा. एकेक टप्पा पार करत चढण पूर्ण करायची असते. प्रत्येक पायरी असते खरी वर जाण्यासाठी आणि खाली देखील पायरी उतरतच यावे लागते. पायऱ्याच माणसाला वर खाली करायला शिकवितात. काही पायऱ्या अरुंद असतात, काही रुंद, काही उंच, काही छोट्या. काही संगमरवरी तर काही लाकडीसुद्धा. लाकडी जिन्याची पायरी पाय न वाजवता चढण जमलं तर जीवनाची खूपशी चढण सोपी होते.
पायरी हा खालून वर जाण्याचा तसा सोप्पा मार्ग… प्रत्येक पायरी सावकाश, विचारपूर्वक आणि संयमाने चढली तर. प्रत्येक पायरी म्हणजे स्थित्यंतर… पुढे जाण्याच. चढताना थोडा दम लागला तर खुशाल थांबावं थोडा वेळ. पण पुढे मात्र जात राहायचं. मागे वळून उतरणीला नाही लागायचं. पूर्ण चढण चढून झाल्यावर, हळूहळू उतरण उतरायची. चढून गेल्याचा आनद मनात साठवत.
आपल्या पायरीप्रमाणे वागायचे ही शिकवण लहानपणीच घरातील वडीलधार्यांकडून मिळते. त्यामुळे पायरी वगळून किंवा सोडून जमतच नाही. पायरी ही फक्त निमित्त असते वरवर जाण्यासाठी. साधन असते. म्हणून देवळात जाताना आपण पहिल्या पायरीवर हात टेकूनच आपण पुढे जातो. शाळेत, विद्येच्या मंदिरात जाताना देखील असे नम्र होणे जमलं पाहिजे. पायरी आपल्याला नम्र राहायला शिकविते.
कान्होपात्राच्या भक्तीमुळे विठ्ठल दर्शन घेण्याआधी तिच्या पायरीवर वंदन करण्याचे भाग्य तिला तिच्या प्रेमाने मिळाले. मानवी जीवनात पायरीचे महत्त्व म्हणूनच अधिक आहे.
– आरती मोने