बहारदार वक्तृत्वाचा चतुरस्र साहित्यिक असे श्रेष्ठ संगीत नाटककार विद्याधर गोखले यांचे व्यक्तिमत्त्व. विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष लेख…
गच्च भरलेला मालेगावचा छत्रपती शिवाजी टाऊन हॉल. विलक्षण मोहित झालेला, मंत्रमुग्ध अवस्थेतील जनसमुदाय. 75 वर्षे वयाचे कोल्हापूरचे शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून विद्याधर गोखले गेला तासभर बोलत होते. त्यांनी बोलतच रहावे आणि आपण ऐकतच रहावे असा माहोल निर्माण झालेला होता. शाहीर राम जोशी यांच्या जीवनातील एक किस्सा ते सांगत होते. सोलापूरचे विख्यात शाहीर शीघ्रकवी राम जोशी. “सुंदरा मनामध्ये भरली’ ही प्रसिद्ध लावणी त्यांनी लिहिलेली.
या राम जोशींचा सांगलीचे सरदार घोरपडे यांच्या दरबारात एक जंगी शाहिरी कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपायची वेळ झाली तसं सरदारांचा पी. ए. त्यांच्याजवळ आला. (गोखले त्याला त्याकाळचा “फायनान्स मिनिस्टर’ म्हणतात आणि प्रचंड हशा व टाळ्या पडतात) तो घोरपड्यांशी शाहीर राम जोशींच्या बिदागीविषयी बोलू लागला. राम जोशींनी हे पाहिलं. त्यांच्या लगेचच लक्षात आलं, हे आपल्याला देणाऱ्या पैशांविषयीच काहीतरी चाललंय. शीघ्रकवीच ते, त्यांनी ताबडतोब एक आर्या भिरकावली-
“”भोजासम कविताप्रिय। कर्णासम दानशूर घोरपडे ।ऐसे असता अमुच्या बिदागीचा का तुम्हास घोर पडे।।”
लोकांनी सभागृह डोक्यावर घेतले. गोखलेअण्णा मिष्किलपणे लोकांकडे बघत होते.
बहारदार वक्तृत्वाचा चतुरस्त्र साहित्यिक असं श्रेष्ठ संगीत नाटककार विद्याधर गोखले यांचं व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यापूर्वीचा म्हणजे 1924 सालातला अण्णांचा जन्म. वडील राजकारणी. मध्यप्रदेश सरकारमध्ये ते मंत्री होते. परंतु घरामध्ये उत्तम संस्कारांचा वावर असल्याने अगदी लहानपणापासून गोखले अण्णांवर त्याचा प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर 1944 साली अण्णा मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत त्यांनी इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे अध्यापन केले. त्या काळात अत्यंत लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकीक होता. त्याच काळात त्यांची लेखणी कार्यरत झाली. लवकरच मराठी दैनिकाच्या संपादकीय विभागात ते रुजू झाले आणि अखेरीस संपादक म्हणून निवृत्त झाले. त्यांचे अग्रलेख आणि रविवारच्या पुरवणीतील रसाळ लेखन वाचक अत्यंत आवडीने वाचत. संस्कृत आणि उर्दू या दोन्ही लावण्यलतिका असणाऱ्या भाषांवर कमालीचे प्रभुत्व असणाऱ्या गोखले अण्णांच्या सिद्धहस्त लेखणीतून स्त्रवणाऱ्या मजकूरावर या दोन्ही भाषांचा प्रभाव पडलेला दिसे. त्यातून निर्माण झालेला मजकूर कमालीचा गोडवा धारण केलेला आणि समृद्ध असा होई.
अण्णांना मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मालवणी अशा अनेक भाषा अस्खलित येत. बहुभाषाकोविद असणाऱ्या या पंडिताचे वाचन आणि अभ्यास प्रचंड असल्याने आपोआपच त्यांच्या साहित्य आणि वक्तृत्वावर त्याचा प्रभाव पडला. त्यांच्या वक्तृत्वावर फिदा असणारे हजारो लोक केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहरेही पसरलेले होते. संस्कृत ग्रंथांतले संदर्भ, उर्दू शेरोशायरी, किस्से-कोट्या, लोकसाहित्यातील अद्भूत माहिती, पर्यटनातील अनुभव आणि जात्याच सर्व विषयांचा अभ्यास यामुळे त्यांची भाषणे कमालीची लोकप्रिय झाली. याच दरम्यान 1999 साली उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. साहित्य कला-पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत असणारे विद्याधर गोखले लोकसभेच्या पटलावरही चमकून गेले.
माझे वडील विद्याधरांचे भक्त आणि जवळचे मित्र. त्यांनी लोककलावंतांच्या अनेक अधिवेशनात विद्याधरांना मालेगावी प्रमुख पाहुणे म्हणून अनेकदा बोलवले. मुख्य म्हणजे विद्याधरांनाही लोकसाहित्य आणि लोककलांची प्रचंड आवड होती आणि सखोल अभ्यासही होता. त्यामुळे गोखले अण्णा आनंदाने मालेगांवी येत आणि प्रत्येक वेळी आपल्या अभूतपूर्व वक्तृत्वाचा आनंद मालेगांवकरांना देत. लोककलावंतांच्या मागण्या सरकारदरबारी ठेवण्याचे महत्कार्य अण्णा कर्तव्यतत्परतेने करीत असत. त्यांचा आणि वडिलांचा मोठा पत्रव्यवहार होता.
गोखले अण्णांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मराठी रंगभूमीवर केलेले संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन. एकेकाळी कोल्हटकर- किर्लोस्कर-खाडिलकर-देवल-गडकरी यांच्यासारख्या दिग्गज नाटककारांनी लिहिलेली आणि बालगंधर्व-केशवराव भोसले, मा. कृष्णराव यांच्यासारख्या तेवढ्याच तोलामोलाच्या कलावंतांनी साकारलेली अनेक संगीत नाटके मराठी रंगभूमीवर आली आणि गाजली. लोकमानसावर अनेक वर्षे या संगीत नाटकांनी अधिराज्य गाजवले. परंतु या एका विशिष्ट कालखंडानंतर संगीत नाटकांची परंपरा उतरतीला लागून बंद पडली. एक मोठा कालावधी सुनासुना गेल्यानंतर गोखले अण्णांचे पहिले संगीत नाटक मराठी रंगभूमीवर 1960 साली अवतरले, त्याचे नाव होते, “संगीत सुवर्णतुला’! अण्णांच्या लेखणीला खऱ्या अर्थाने खुलविणारा लेखनप्रकार अण्णांना गवसला होता. मराठी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक असणारे अण्णा संस्कृत, उर्दू भाषेतील पुराणकथा-आख्यायिका-प्रेमकथा- नवलकथा जाणत होते. त्याला लोकसाहित्याची जोड देऊन त्यांनी संगीत नाटकांचा फॉर्म हाताळण्यास प्रारंभ केला आणि त्यांची नाटके कमालीची गाजू लागली.
“सं.सुवर्णतुला’पाठोपाठ “पंडितराज जगन्नाथ’ हे कमालीचे गोड-भावगर्भ, कोणालाही रुचेल-पचेल-आवडेल असे कथानक असणारे दुसरे नाटक अण्णांच्या लेखणीतून बाहेर पडले. “पंडितराज’ रसिकांनी डोक्यावर घेतले. त्याचे प्रयोग मान्यवरांसमोर दिल्लीलाही झाले. त्यानंतर अण्णांनी मागे वळून पाहिलेच नाही. सं.मेघमल्हार, सं.चमकला ध्रुवाचा तारा, सं.स्वरसम्राज्ञी, सं.बावनखणी, साक्षीदार, जावयाचे बंड, रुपरंजनी, सुंदरा मनामध्ये भरली, बरसते सूर्यातून चंद्रिका, राणी रुपमती अशी सुमारे 17 नाटके अण्णांनी लिहिली आणि 1960 ते 1990 ते असा तीस वर्षांचा मराठी रंगभूमीचा कालखंड संगीतमय केला. अण्णांची स्मरणशक्ती अतिशय दांडगी होती. त्यामुळे लेखन व व्याख्यान या दोन्ही ठिकाणी असंख्य संदर्भ त्यांच्यापुढे हात जोडून उभे रहात.
1989 मध्ये वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाला. डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रिया सुचविली. अण्णांना ही बातमी समजल्यावर त्यांच्या वळणदार अक्षरात धीर देणारे अतिशय हृदयस्पर्शी पत्र त्यांनी वडिलांना पाठविले. त्याचा कमालीचा आधार त्या काळात आम्हाला वाटला. मुंबईच्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अण्णा भेटायला आले, यावेळी योगायोगाने विख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. नितू मांडके राऊंडवर होते. विद्याधरांना पाहिल्यावर डॉ. मांडकेंनी आनंदाने त्यांचा हात हातात घेतला आणि त्या मिनिटापासून विद्याधर भेटायला आले आहेत ही गोष्ट लक्षात आल्यावर मांडकेंच्या नजरेत वडिलांचे स्थानही कमालीचे उंचावले.
1993 साली सातारा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अण्णा अध्यक्ष झाले. संमेलनाध्यक्षपदावरून त्यांनी केलेले भाषण विलक्षण गाजले. “गजलसम्राट गालीब’, “शायरे आझम’, “शायरीचा शालीमार’ ही मिर्झा गालीब यांच्यावरील पुस्तके तर फारसी, उर्दू, हिंदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे त्यांचे पुस्तकही लोकप्रिय झाले. “शंकर सुखकर हो’ हा नाट्यविषयक संदर्भाचा संग्रह त्यांच्या राजस लेखणीची साक्ष देतो. पत्रकारिता हा त्यांचा श्वास तर नाटके हा त्यांचा प्राण होता. त्यामुळेच “रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकांमध्ये नृत्ये सादर करण्याचा अभिनव प्रयोग त्यांनीच सुरू केला.
लोककलांचा अभ्यास करुन तेरा लोककलांचा परिचय करून देणारे लेख मी लिहिले आणि नंतरच्या काळात ते एकत्रित करून त्याचे “दिंडी लोककलांची’ हे पुस्तक वडिलांनी हौसेने प्रसिद्ध केले. या माझ्या पहिल्या पुस्तकासाठी अण्णांनी आशीर्वादपर लिहिलेली सुंदर प्रस्तावना माझ्यासाठी मी त्यांनी दिलेला प्रसाद समजतो. एका कार्यक्रमाला अण्णा मालेगावी आलेले असताना मी त्यांची सही घेतली तेव्हा, “तुला रे कशाला हवी माझी सही, मी तुझ्या घरचाच आहे!’ हे त्यांचे वाक्य आजही कानात घुमते.
लोकसत्ताकार ते संगीत नाटककार, खासदार ते साहित्य संमेलनाध्यक्ष, व्युत्पन्न पंडित ते अभिनयपटू, लोककला अभ्यासक ते बहुभाषाकोविद अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या अण्णा अर्थात विद्याधर गोखलेंनी माणसांवर निस्सीम प्रेम केले. पाय सतत जमिनीवरच कसे राहतील यासाठी ते प्रयत्नशील राहिले. 1996 साली ते गेले तेव्हा माता सरस्वतीला कदाचित तिच्या दरबारात तिचा अलौकीक प्रतिभावंत सुपूत्र दाखल झाल्याचा आनंद झालाही असेल, पण मराठी भूमीवरच्या त्यांच्या हजारो चाहत्यांना मात्र कमालीचे दु:ख झाले यात शंका नाही.
– डॉ. विनोद गोरवाडकर