कर्जत -केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या तरीही विरोधी पक्ष म्हणतोय पैसा आणणार कोठून? मात्र पैसा आहे. जर आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी पैसा वापरला तर विकासासाठी पैसा कोठून आणणार, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शनिवारी येथे केला.
कर्जत येथे आयोजित शेतकरी मेळावा, विविध विकासकामांचे उद्घाटन व पक्षप्रवेश समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, रामभाऊ तुमचे कामच वेगळे आहे. इतर पक्षाच्या कार्यक्रमामध्ये जेवढे लोक समोर बसलेले असतात. तेवढे लोक तुम्ही व्यासपीठावर बसवले आहेत. मी पाठीमागे वळून बोललो, तरी इकडे पण एक सभा होईल.येथील सर्व प्रकल्पांची सुरुवात ही राम शिंदे पालकमंत्री असताना झाली होती. ती कामे अडीच वर्षात पूर्ण झाली नाहीत. आपले सरकार आल्यानंतर ही कामे पूर्ण होत आहेत. विकास कामांचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला. आमदार प्रा. राम शिंदे यांचा जवळचे मित्र असा उल्लेख करून त्यांच्या संघटनकौशल्याचे फडणवीसांनी कौतुक केले.
फडणवीस पुढे म्हणाले, विजेमुळे शेतकऱ्यांना रात्री अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोलर फिडर दिले जात आहेत. आगामी काळात हा कार्यक्रम राबवणार असून त्यासाठी सरकारी जमीन फिडरसाठी देणार आहोत. सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांकडून जमीन भाड्याने घेणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक 75 हजार भाडे देणार असून प्रतिवर्षी 3 टक्के भाडेवाड देणार आहोत.
कर्जत- जामखेडमध्ये 100 टक्के सोलर फिडर करा असे आवाहन त्यांनी आ. राम शिंदे यांना केले. या वेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले कॉंग्रेसचे पदाधिकारी प्रवीण घुले आणि त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांचे तसेच कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रवेश केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,आमदार राम शिंदे, खा. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, भीमराव धोंडे यांच्यासह कर्जत- जामखेड तालुक्यातील पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केले तर पप्पू धोदाड यांनी आभार मानले.
धडाडीचे नेतृत्व
गेल्या पाच वर्षापासून या कर्जत आणि जामखेडला टॅंकर लागत नाही, केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रात काम झाले. त्याचा परिणाम कर्जतमध्ये झाला, मी प्रामाणिकपणे इमाने इतबारे या जनतेची सेवा करत आहे, फडणवीस यांनी मला मंत्री केले, प्रलंबित असलेल्या तुकाई चारीला मान्यता द्यावा लागेल अशी मागणी त्यांच्याकडे केली. अधिकारी सांगत होते नियमात बसत नाही, पाणी उपलब्ध होत नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी तुकाई चारीला मंजुरीच देऊ असे सांगितले. म्हणून सांगतोय तुमच्यासारख्या धडाडीचा नेता या महाराष्ट्रात नाही. असे म्हणत आ. राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले.
कर्डिलेंच्या टोपीखाली दडलंय काय?
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेत राष्ट्रवादीचे संख्या बळ जास्त असतानाही अध्यक्षपद खेचून आणणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केले. कर्डिले यांचा नामोल्लेख करताना फडणवीस म्हणाले, कर्डिले यांच्या टोपीखाली काय काय दडलंय, कोणालाच सांगता येणार नाही. जिल्हा बॅंकेत त्यांनी चमत्कार घडवून दाखविला आहे, असा उल्लेख फडणवीस यांनी केला.