बाहेरच्या वादळाचं एक बरंय. अवचित कुठूनतरी यायचं आणि जमिनीवरचा सगळा पालापाचोळा आपल्या मिठीत गोळा करून, धूळ उडवत निघून जायचं. बेवारस कुजत पडून राहण्यापेक्षा त्या वादळात एकदाचं छिन्नविच्छिन्न होऊन गेलेलंच बरं! पण ही आतली वादळं भलतीच क्रूर भासतात! मनाला अशी काही जखडून धरतात की गुदमरायला होतं. भंगलेल्या स्वप्नांची, कटू आठवणींची धूळधाण डोळ्यातून पाणी काढतात; तेव्हा कुठं हा त्याचा विळखा सैल करतो! वीणा स्वतःच्याच विचारात गुरफटून गेली होती.
वीस वर्षे झाली लग्नाला. आपण मूल जन्माला घालू शकत नाही, हे कटू सत्य तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हतं. आपली कूस कधीच उजवणार नाही; ही एकच खंत तिच्या आयुष्यात उरली होती. बाकी सगळी सुखे तिच्या पायाशी लोळण घेत होती. वीणा एक नावाजलेली लेखिका होती. ऐश्वर्य आणि मानसन्मानाने तिचं आयुष्य पुरतं न्हाऊन निघालं होतं. पण तिच्या चेहऱ्यावर कायमच आवेशरहित भाव असायचे. कदाचित आतल्या वादळात ती एवढी विस्कटून जात होती की; जगाला दाखवण्याइतपत सुद्धा उसनं हसू कधी तिला तिच्या चेहऱ्यावर ठेवता यायचं नाही!
दुपारची वेळ. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. वीणा काहीतरी लिहीत बसली होती. अचानक दारावरची बेल वाजली. ती दार उघडायला उठली. बाहेर पोस्टमन हातात पत्र घेऊन उभा होता. तिने ते पत्र घेतलं. एखाद्या वाचकाचं असेल म्हणून, वीणाने ते टेबलावर ठेवलं आणि किचनमध्ये गेली. काहीवेळाने हातात चहाचा कप घेऊन ती बाहेर आली आणि लिहायला बसली. तेवढ्यात तिची नजर त्या पत्रावर पडली. तिने ते वाचायला घेतलं. “आप्पांचं पत्र!’ आप्पा म्हणजे वीणाचे वडील. “तू लवकरात लवकर गावी निघून ये. का ते इथं आल्यावर सांगतो. कळावे. तुझाच आप्पा.’ का बरं आप्पांनी असं तडकाफडकी गावी बोलावलं असेल? माईची तब्बेत तर ठीक असेल ना? का आप्पांना तर काही…?
वीणा ताडकन जागेवरून उठली आणि गावी फोन लावला. ती बराच वेळ प्रयत्न करत होती; पण फोन काही लागला नाही. शेवटी तिने केदारला फोन लावून आप्पांच्या पत्राबद्दल सांगितलं. पलीकडून केदार म्हणाला, “”वीणा, तू आधी शांत हो. मी ऑफिसहून आलो की आपण दोघेही गावाकडे निघू.” केदारने फोन ठेवून दिला. मी शेवटची गावी कधी बरं गेले होते? खालच्या वाड्यातल्या दिनाच्या मुलाच्या मुंजीलाच बहुधा. पण त्यावेळी तर आप्पा-माई दोघेही ठीक होते. इथं क्षणाचा भरवसा नाही. ही तर चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट! वीणा स्वतःच्याच मनाशी बोलत होती. संध्याकाळी केदार ऑफिसमधून घरी आला. वीणा आतून थोडीशी भेदरली होती. “”केदार, मला काहीच सुचत नाही. कधी एकदाची गावी जाते आणि माई-आप्पाला डोळे भरून पाहते असं झालंय.” केदारने वीणाला जवळ घेतलं. “”माई म्हणते ते खरंय अगदी. हरीणकाळीज आहेस तू!”
रात्र होऊन गेली होती. “”केदार, किती त्रास देते ना मी तुला? ऑफिसात दिवसभर काम करून दमून आला असशील, साधा विचारदेखील केला नाही.” गाडीच्या स्टिअरिंग वरचा एक हात केदारने वीणाच्या हातावर ठेवला. “”माझे आई-बाबा गेल्यावर माई-आप्पांनीच तर मला आधार दिला. जशी तुला त्यांची काळजी वाटते, तशी मला वाटणारच ना! आणि त्रासाचं म्हणशील तर; तुला असं अस्वस्थ पाहिलं की; जास्त होतो.” केदार वीणाला जीवापाड जपायचा. आपण केदारला मूल देऊ शकत नाही, ही सल गेली कित्येक वर्षे तिच्या मनात सलत होती. वीणाची आतल्या आत होणारी घुसमट पाहून तो देखील कासावीस व्हायचा.
वाड्याबाहेर दिवा अजूनही मिणमिणत होता. वीणाने लगबगीने दारावर अडकवलेल्या घंटेचा दोर ओढला. काहीवेळाने माईने दार उघडलं. “”वीणा, तू!” वीणाने हातातली बॅग खाली ठेवली आणि माईच्या दंडाला घट्ट धरलं. “”माई, तू बरी आहेस ना?” “”हो बाळा, मी ठीक आहे.’ “”आणि आप्पा? ते कसे आहेत?” म्हणतच वीणा घरात शिरली. मागोमाग माई आणि केदार आत आले. आप्पा दिवाणवर झोपले होते. त्यांच्या बाजूला बसलेली एक बाई आप्पांच्या डोक्यावर ओल्या कापडाची पट्टी ठेवत होती. वीणाने आवाज दिला. “”आप्पा उठा. मी आले.” आप्पा शांत पडून होते. “”माई, काय झालंय आप्पांना?” “”त्यादिवशी अचानक ताप आला. कधी उतरतो, कधी चढतो. कालपासून झोपूनच आहेत.” केदार म्हणाला, “”मग आम्हाला कळवलं का नाही?” “”वाटलं; होतील बरे दोन दिवसांत. त्यादिवशी बसवत नव्हतं तरी वीणाला पत्र लिहिलं आणि राईला टपाल करायला सांगितलं.”
थोड्यावेळाने आप्पांनी डोळे उघडले. “”आलीस पोरी” म्हणत वीणाच्या तोंडावरून हात फिरवला. दोन-चार शब्द बोलले आणि पुन्हा डोळे झाकून घेतले. “”पोरी, जा तू घरी. गीता एकटीच आहे.” असं म्हणून माईने आप्पांच्या बाजूला बसलेल्या त्या बाईला म्हणजे राईला घरी जायला सांगितले. “”माई, काही लागलंच तर आवाज द्या. सकाळच्याला येत्ये म्या.” असं म्हणत राई निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी, “”आप्पा, बरं वाटतंय का आता?” आप्पांनी वीणाकडं पाहून मान हलवली आणि माईला हाताने खुणवत अलमारीतली फाइल आणायला सांगितली. आप्पांनी वीणाच्या हातात फाइल दिली. “”हे काय आप्पा?” “”आपल्या जमिनीची कागदपत्रं. आपली शेतजमीन मी तुझ्या नावावर केलीय.” वीणा केदारकडे पाहू लागली. आप्पांनी गावाकडे का बोलावून घेतलं; ते वीणाच्या लक्षात आलं होतं.
“”आप्पा, हे कशासाठी करताय? मला यातलं काहीच नकोय. तुमच्या आशीर्वादाने आम्हा दोघांना कशाचीच कमी नाही.” “”पोरी, माझी तब्येत साथ देत नाही. पिकलं पान कधी गळून पडंल सांगता येत नाही. आणि आम्हाला तरी कोण आहे दुसरं?” केदारने आप्पांच्या पाठीवरून हात फिरवला. “”आप्पा, असं नका बोलू. तुम्हाला काही होणार नाही.” तेवढ्यात राई तिथं आली. “”माई, म्या भाकऱ्या थापून आणल्यात. भाजीला काय करायचं त्ये सांगा.” तिच्या पदराआड तिची पाच वर्षांची मुलगी हाताला धरून उभी होती. ती चोरट्या नजरेनं वीणाकडं पाहात होती. काळ्याभोर दाट केसांच्या बांधलेल्या बुचड्यात ती खूप गोड दिसत होती. तिचे डोळे विलक्षण बोलके वाटत होते. तिला पाहून क्षणात वीणाच्या ओठांवर हसू आलं. तिने हळूच राईच्या हातातून तिचा हात सोडवला आणि तिला आपल्या जवळ घेतलं. राई स्वयंपाकघरात गेली. वीणाने तिचा पापा घेतला. “गीता ना तू?’ तिने लाजून आपली मान हलवली आणि राईकडे पळत सुटली.
“”किती गोड! पण ही राई कोण?” “”तुला आठवतंय, आपल्या शेतात केशव नावाचा शेतगडी कामाला होता.” “”हो… हो… चांगलं आठवतंय. मला वरच्या खंडोबाच्या माळावरून करवंद आणून द्यायचे. तेच ना?” “”हो. त्याचीच मुलगी राई.’ वीणाच्या नजरेसमोर मळक्या फ्रॉकमधली, दोन वेण्या घातलेली आणि कमी वयातच अंगाला हळद लावून सासरी बोळवणी केलेली राई उभी राहिली. “”नवऱ्याने सोडचिट्ठी दिली. वंशाला दिवा पाहिजे होता.” राईच्या काळजीनं केशव हाय खाऊन गेला. “”लहानपणीच डोक्यावरून आईचं छत्र हरवलेल्या पोरीचा शेवटचा आधारसुद्धा तुटला. आता ती स्वतः…” माई पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात राई बाहेर आली. डोक्यावरचा पदर अधिक घट्ट करत, “”जाते माई. सांच्याला येत्ये.” म्हणून निघून गेली. “”तू बोलता बोलता मध्येच का थांबलीस?” माईने एक दीर्घ श्वास सोडला. “”राईला कॅन्सरचं निदान झालंय. हा देवसुद्धा एवढा निष्ठुर का होतो; कळत नाही!”
वीणा दारापाशी स्तब्ध उभी राहून राईच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहात होती. घट्ट धरून ठेवलेला पदर वाऱ्याने ढळताच, बोडकं पडत चाललेलं तिचं डोकं पाहून वीणाला भरून आलं. राहून राहून त्यादिवशी वीणाच्या डोळ्यासमोर राईचा चेहरा येत होता. राई रोज संध्याकाळी माळावरच्या खंडोबाच्या मंदिरात जायची आणि झाडलोट करून दिवा लावायची. “”तू रोज इथे येतेस.” अचानक पाठीमागून कुणाचातरी आवाज येताच, राईने मागे वळून पाहिलं. “”ताई, तुम्ही!” वीणाने राईकडे पाहून हसल्यासारखं केलं. “”लहानपणी तुला पाहिलं होतं; त्यावर काल पाहिलं. ओळखू नाही आलीस.” राईने वीणाच्या हाताला धरून खाली बसवलं. “”ताई, आज तुमच्या हातानी देवाम्होरं वात लावू.” वीणाने पणतीत तेल ओतलं आणि वात पेटवली. “”देवा, आमच्या आप्पाला लवकर बरं कर अन् ताईसाहेबाच्या झोळीत समदी सुखं पडू दे.”
“”आणि तुझ्यासाठी काही मागितलं का नाहीस?” “”मागून तरी काय उपयोग? येळ निगुन गेलीय…” राईसाठी जेवढं दुःख वाटावं; तेवढंच वीणाला स्वतःसाठी वाटत होतं. “”गीता खूप गोड आहे.” “”व्हय. आप्पा अन् माई पण लयी जीव लावत्यात. म्हणत्यात, आमच्या वीणाला पण अशीच मुलगी…” बोलताना राई मध्येच थांबली आणि पश्चातापाच्या नजरेनं वीणाकडं पाहू लागली. वीणाने सोबत आणलेल्या पिशवीतून जमिनीची कागदपत्रं बाहेर काढली आणि ती राईच्या हाती दिली. “”काय ह्ये ताईसाहेब?” “”आप्पांनी माझ्या नावावर केलेली जमीन मी तुला देतेय. ती विकून थोडाफार पैसा येईल. तुझ्या आजारपणाला वापर. खचून जाऊ नकोस.” राई वीणाच्या तोंडाकडं पाहातच बसली. “”तुझ्याकडे काहीतरी मागायचं होतं.” “”काय ताईसाहेब?” वीणाने धीर एकवटून बोलायचं ठरवलं; पण तिच्या तोंडातून अखेरीस शब्द नाही फुटले! “”बोला ना ताईसाह्येब…” “”काही नाही.” म्हणून वीणा निघून गेली.
वीणा चार-आठ दिवसांनी परत जायला निघाली. “”आप्पा, काळजी घ्या. मी जे केलं ते बरोबर केलं ना?” “”हो पोरी. तुझ्यासारखी पोरगी आमच्या पदरात पडली, भाग्यवान आहोत आम्ही.” वीणा दाराबाहेर पडणार तेवढ्यात समोरून राई येताना दिसली. तिच्या बोटाला धरून गीता लुटूलुटू चालत होती. राई वीणासमोर येऊन उभी राहिली. “”ताईसाह्येब, तुमचं मन झऱ्यातल्या पाण्यावाणी नितळ हाय! दुसऱ्याच्या सुखाचा इचार करताना सवताच्या दुःखाला तुम्ही आत दाबून ठेवता. माज्या हातात आप्पांची समदी जायदाद दिलीत. काल माज्याकडं काहीतरी मागणार होता; पर नाही मागितलं. काय मागणार होता?” सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडं पाहू लागले. राईने हात जोडले आणि डोळ्यात पाणी आणून बोलू लागली. “”ताईसाह्येब, म्या जर काही मागितलं तर द्याल का? माज्यानंतर माज्या गीताला आई म्हणून सांभाळाल?” वीणाने राईच्या जोडलेल्या हाताला घट्ट धरलं आणि आवंढा गिळून घेत मान हलवली. एका आईचं मन; एक आईच ओळखू शकते! “”उरलंसुरलं मूठभर आयुष्य मला माज्या पोरीसंग घालायचंय” आत दाबून ठेवलेला वीणाच्या अश्रूचा बांध अखेरीस फुटलाच! तिने राईला आणि गीताला आपल्या छातीशी कवटाळून घेतलं आणि हुंदक्यावर हुंदके देत रडू लागली…
– अमोल भालेराव