हर्षद कटारिया बिबवेवाडी, दि. 27 – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरण भरलेली आहेत. यातून पुणे शहर, उपनगरांसाठी महिन्याला सध्या दीड टीएमसी पाणी उचलले जाते. शहराचा विस्तार पाहता ते देखील अपुरे पडत आहे. तर, पश्चिम पुण्याला भामा आसखेड प्रकल्पातून पाणी मिळत आहे. त्यामुळे काही अंशी ताण कमी झाला आहे. अशा स्थितीत महापालिकेत समाविष्ट 23 गावांसाठी पालिका या धरणांतून किती पाणीसाठा वाढवून घेणार? असे कोणते नियोजन महापालिकेने केले आहे का? याबाबत सगळा कारभार अद्यापही “कोरडा’च असल्याने या 23 गावांतून ऐन पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सुरूच आहेत.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासह साखळीतील धरण भरलेली असताना उपनगरांसह समाविष्ट 23 गावांतील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी अद्यापही सुटलेल्या नाहीत. धरण पूर्ण भरलेले असताना पाणी टंचाई, कमी दाबाने पाणी पुरवठा, तीन-चार दिवस पाणी न येणे, वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याऐवजी कधीही सोडणे अशा तक्रारी येतच आहेत.
23 गावांना पाणी पुरवठा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले असताना महापालिकेडून एकाही गावात नवी पाणी पुरवठा योजना जाहीर करण्यात आलेली नाही. या उलट या गावांना टॅंकर पाणीपुरवठा केला जात आहे. 23 गावांचा भार वाढल्याने पुणे महापालिका आता शहराला मिळणाऱ्या पाण्याचे नव्याने नियोजन करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत बहुतांशी या सर्वच गावातून आयुक्त तसेच मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे निवदने, तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु, खडकवासला धरणातून शहराला पूर्वी मिळणारे पाणी आणि 23 गावांचा समावेश झाल्यानंतर यामध्ये किती पाणी अधिक वाढविले आहे, याचे कोठेच नियोजन नसल्याने उपलब्ध पाण्यात महापालिका 23 गावांची तहान भागविणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याउलट या गावांत पाणी मीटर बसविण्यासंदर्भातील प्रस्ताव पालिकेने ठेवला असून त्याची अंमलबजावणीही लवकरच करण्यात येणार आहे.
महापालिका जास्त पाणी घेते?
पुण्याला दिवसाला दीड टीएमसी पाणी मिळते, प्रत्यक्षात महापालिका त्यापेक्षा जास्त पाणी घेते, अशी जलसंपदा विभागाची ओरड आहे, असे असेल तर पालिकेडून 23 गावांना पाणी पुरवठा सुरळीत होणे शक्य आहे. मात्र, या गावांत पाणी पुरवठ्याबाबत ओरड कायम आहे. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न महापालिका कशी सोडविणार, असा प्रश्न कायम आहे.