सायना नेहवाल एक असे नाव जिच्या कामगिरीमुळे देशातील अनेक मुलींना बॅडमिंटन खेळाची गोडी लागली. तिने ऑलिम्पिकचे पदक मिळवताना भारतीय बॅडमिंटनचे जागतिक वर्चस्वही सिद्ध केले. अफाट प्रसिद्धी व त्यातून येणाऱ्या सगळ्याच भौतिक सुखांचा तिने लाभ घेतला. मात्र, आता गेल्या दोन ते तीन मौसमांपासून तिचा खेळ खालावला आहे. तिला होत असलेल्या दुखापती व सुमार कामगिरीमुळे हीच ती फुलराणी का, असा प्रश्न निर्माण होतो. यशाच्या शिखरावर असतानाच निवृत्ती घ्यावी हा विक्रमादित्य सुनील गावसकर यांचा कानमंत्र तिने गंभीर्याने घेतला पाहिजे व मानमरातब शाबूत ठेवत निवृत्ती घेतली पाहिजे, असेच आता प्रकर्षाने सांगावेसे वाटते.
रामनाथन क्रिष्णन, प्रकाश पदुकोन व पुलेला गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनला जगात नाव मिळवून दिले. पदुकोन व गोपीचंद यांनी तर या खेळातील सर्वात मानाची समजली जात असलेली ऑल इंग्लंड स्पर्धाही जिंकली. ही स्पर्धा जिंकण्याचे प्रत्येक बॅडमिंटनपटूचे स्वप्न असते हेच स्वप्न उराशी बाळगून सायनाही या खेळात पावले ठेवू लागली व काही दिवसांतच तिने हे विश्वही पादाक्रांत करण्याचा पराक्रमही केला. चीन, जपान, इंडोनेशिया, तैवान या जागतिक बॅडमिंटनमधील सुपर पॉवर संबोधल्या जात असलेल्या देशावरही मात करत सायनाने आपली दैवी गुणवत्ताही सिद्ध केली.
मात्र, 2019 सालापासून तिची कामगिरी खालावत गेली. या कालावधीत तिला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अपयश तर आलेच; परंतु सातत्याने डोके वर काढणाऱ्या दुखापतीही मागे लागल्या. भारतीय बॅडमिंटनची ही एकेकाळची सम्राज्ञी टीकेची धनी बनली. यंदाच्या मौसमातही तिने मलेशिया ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. 2024 साली होत असलेल्या ऑलिम्पिकमध्येही तिला खेळायचे असल्याचे खुद्द तिनेच सांगितले; पण हे लक्ष्य तिच्यासाठी आता कठीण होणार हे स्पष्ट दिसत आहे. जर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही मिळालेले असतानाही आपल्याच कामगिरीचे आत्मपरीक्षण ती का करत नाही, असा प्रश्न पडतो. म्हणूनच सांगावेसे वाटते की, बस्स झाले आता निवृत्ती घे.
वडिलांकडूनच मिळाला वारसा
1990 साली हरियाणाच्या हिसारमध्ये जन्मलेल्या सायनाने आपल्या वडिलांकडूनच या खेळाचे धडे गिरवले. तिचे वडील हरविंदर सिंग व आई उषा राणी याही बॅडमिंटनपटूच होते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्याची प्रेरणा तसेच पाठिंबाही तिला घरातूनच मिळाला. खरेतर तिच्या काही मैत्रिणींसह तिला कराटेमध्ये नाव उंचवायचे होते. तिने या खेळाचे धडेही गिरवले व ब्रॉंझबेल्टही मिळवला होता. मात्र, काही दिवसांतच आपल्या आई व वडिलांच्या मतानुसार तिने बॅडमिंटनचीच कारकीर्द केंद्रित केली. हिसारमधील एका खासगी शाळेत तिने शालेय शिक्षण घेतले व त्यानंतर हैदराबादला स्थलांतर करताना तेथिल सेंट नीझ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. हैदराबाद ही भारतीय बॅडमिंटनची राजधानी मानली जाते, त्यामुळे तिने हा निर्णय घेतला. तसेच तिला ऑल इंग्लंड विजेते पुलेला गोपीचंद यांच्या अकादमीत अद्ययावत प्रशिक्षणही हैदराबादमध्येच असल्याने घेता आले. गोपीचंद यांच्या आधी हैदराबादमध्ये स्थानिक स्तरावरचे प्रशिक्षण तिने देशाच्या एक प्रख्यात महिला बॅडमिंटनपटू नानी प्रसाद यांच्याकडून घेतले. तीथपासून तिचा हौशी बॅडमिंटनपटू ते व्यावसायिक खेळाडू असा प्रवास सुरू झाला.
जग जिंकण्याचा प्रवास सुरू झाला
भारताकडून खेळण्याचे तिचे स्वप्न व त्यासाठीची वाटचाल 2003 साली सुरू झाली व जवळपास पुढील 15 वर्षे तिने आपल्या कामगिरीने जग जिंकण्याचा प्रवास सुरू केला. तिने 2003 साली ज्युनियर सेजॅक ओपन स्पर्धेत सहभाग घेतला व तिथेच समीक्षकांना आपण भविष्यातील ऑलिम्पिकपदक विजेती खेळाडू पाहात आहोत, असा साक्षात्कार झाला. त्यानंतर 2004 साली झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक मिळवत पहिले राष्ट्रीय यश प्राप्त केले. त्याच वर्षी आशियाई स्पर्धेत सायनाने विजेतेपद पटकावले. हेच सातत्य 2006 सालीही कायम ठेवले. 19 वर्षांखालील वयोगटात अशी सलग दोन स्पर्धांची विजेतेपदे मिळवणारी सायना देशाची पहिलीच खेळाडू ठरली. याच वर्षी फिलिपाइन्सला झालेल्या स्पर्धेतही तिने विजेतेपद मिळवले व तिचा पहिल्यांदा फुलराणी असा उल्लेख केला गेले. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही व यश आणि किर्ती मिळवती झाली.
2007 साल तिच्यासाठी फारसे यशस्वी ठरले नाही. तिने सहभाग घेतलेल्या काही स्पर्धांमध्ये तिला अपयश स्वीकारावे लागले. मात्र, 2008 साली तिने अपयश पुसून काढले व जागतिक ज्युनिअर स्पर्धा जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू बनण्याचा विक्रम साकार केला. त्याच वर्षी ग्रॅंड प्रिंक्स गोल्ड, राष्ट्रीय मानांकन, राष्ट्रकुल युवा अशा कितीतरी स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले. याच वर्षी तिला आश्वासक व उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. 2009 साली तिने इंडियन ओपन स्पर्धा जिंकली व अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय खेळाडू बनली. याच वर्षी तिला भारतीय क्रीडाक्षेत्रातील मानाचा समजला जात असलेला अर्जुन पुरस्कारही देण्यात आला. 2010 साली इंडिया ओपन ग्रॅंड प्रिंक्स, सिंगापूर ओपन, इंडोनेशिया ओपन, हॉंगकॉंग ओपनसह दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. 2011 साली स्वीस ओपन, मलेशिया ओपन, इंडोनेशिया ओपन तसेच बीडब्ल्यूएफ सुपर सीरिज स्पर्धाही गाजवल्या. 2012 साली स्वीस ओपन, थायलंड ओपन, इंडोनेशिया ओपन तसेच तिसऱ्यांदा इंडोनेशियन ओपन स्पर्धाही जिंकली.
ऑलिम्पिकचे पदक व वाटचाल
यशस्वी वाटचाल सुरू केल्यावर व आपली गुणवत्ता प्रत्येक स्पर्धेत सिद्ध केल्यानंतर सायनाकडून ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा केली जात होती. तिनेही निराश केले नाही व 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉंझपदकाला गवसणी घातली व भारताचे या खेळात जागतिक वर्चस्व निर्माण केले. या पदकामुळे सायना ऑलिम्पिकपदक मिळवणारी भारताची पहिलीच महिला बॅडमिंटनपटू ठरली.
सिंधूचा उदय व सायनाचा अस्त
एकीकडे सायना दुखापतींमुळे तसेच सुमार कामगिरीमुळे मागे पडत चालली होती, त्याचवेळी भारतीय बॅडमिंटनच्या क्षितीजावर पी. व्ही. सिंधू या नव्या फुलराणीचा उदय होत होता. यापूर्वी झालेल्या काही स्पर्धांमध्ये सायनाने सिंधूचा पराभव केला होता मात्र, त्यावेळी सिंधूकडे अनुभव नव्हता. मात्र, सिंधूने 2016 साली रिओ ऑलिम्पिकचे पदक पटकावले तसेच त्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदक प्राप्त केले व आपणच देशाची सध्याची सर्वात अव्वल महिला बॅडमिंटनपटू असल्याचे सिद्ध केले. सायनाला कारकिर्दीत भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न हा पुरस्कार मिळाला. मात्र, त्याच वर्षापासून तिच्या कारकिर्दीला ग्रहण लागले व एका नावाजलेल्या खेळाडूचा अस्तही जवळ आल्याची जाणीव प्रकर्षाने जाणवली.
बॅडमिंटनमध्ये भारताला मान मिळवून देण्याचे तसेच आपल्या खेळातूनच भावी खेळाडू पुढे यावेत अशी प्रेरणा बनणारी सायना खरोखरची फुलराणी आहे, यात शंका नाही. परंतु आता तिची कारकीर्द अखेरच्या वळणावर आहे. 2024 सालची ऑलिम्पिक स्पर्धा तशी खूप दूर आहे व तेथे पोहोचण्यासाठीची पात्रताही आता सायना मिळवेल का, याची शाश्वती नाही. त्यामुळे तिने मानाने निवृत्ती स्वीकारावी असेच वाटते. संघातून कोणीतरी वगळण्यापेक्षा सन्मानाची निवृत्ती कधीही चांगली ठरते. खेळ असो व कोणतेही क्षेत्र तिथे आपण आता आपले योगदान देऊ शकत नाही, हे कळल्यावर जो थांबण्याचा निर्णय घेतो तो महान ठरतो, हे आता सायनानेही ओळखले पाहिजे व थांबलेही पाहिजे.
लक्षवेधी
* 2014 साली इंडिया ओपनमध्ये ब्रॉंझपदक
* पी. व्ही. सिंधूवर केली होती मात
* जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी येणारी पहिलीच भारतीय
* चायना ओपन जिंकणारी पहिलीच भारतीय
* 2015 साली इंडिया ओपन जिंकली
* याच वर्षी पहिल्यांदा ऑल इंग्लंडमध्ये सहभाग
* अंतिम फेरी गाठूनही अपयश
* उपविजेतेपदावर समाधान
* 2015 सालीही इंडिया ओपन जिंकली
* याच वर्षी जागतिक स्पर्धेत रजतपदक
* 2016 सालापासून दुखापतींनी ग्रासले
* याच वर्षी तिचे आशियाई पदकही हुकले
* रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयश
* याच स्पर्धेत पी. व्ही. सिंधूला पदक
* 2017 साल दुखापतींनी त्रासदायक ठरले
* दुखापतीवर मात करत मलेशिया स्पर्धेचे विजेतेपद
* याच वर्षी जागतिक स्पर्धेत ब्रॉंझपदक
* 2018 साली सिंधूचा पराभव करत राष्ट्रीय विजेतेपद
* राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक
* आशियाई पदकही मिळवले
* 2019 साली मलेशिया स्पर्धेत यश
अमित डोंगरे