मांजरी – इथेनॉलच्या वापरामुळे साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळत असून 106 कारखान्यांकडून इथेनॉल निर्मिती होत आहे. ऊसासह कापूस, सोयाबीन आणि इतर फळपिकांच्या उत्पन्न वाढीबाबत राज्यातील शेतकरी अग्रेसर राहावा. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. तसेच ऊस तोडणी कामगारांच्या टंचाईवर उपाय म्हणून भविष्यात सुमारे 900 हार्वेस्टर घेण्यासाठी कारखान्यांना मदत केली जाईल. यापूर्वी ज्या कारखान्यांनी ते घेतले आहेत त्यांनाही मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.
मांजरी बुद्रुक येथे शुक्रवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सतेज पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, माजी मंत्री राजेश टोपे, विशाल पाटील, आमदार दिलीप देशमुख, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, बाळासाहेब पाटील, व्हीएसआय संस्थेचे सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू-पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रात पारंपरिक शेतीबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती केली जात आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर साखर उत्पादनाचा विचार केला तर भारत, ब्राझिल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
देशाच्या ग्रामीण भागाच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रथमच केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. आम्ही महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला मदतीची आवश्यकता असल्याची चर्चा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यांशी केली असून राज्याबरोबरच केंद्र सरकारही आपल्या राज्याच्या मागे खंबीरपणे आणि सकारात्मक दृष्टिने मदत करील, असा आम्हाला विश्वास आहे.
राज्य सरकारने 18 सिंचन प्रकल्प मार्गी लावले असून मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजनाही पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभापोटी 7 लाख 19 हजार शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच पुढच्या टप्प्यातही 7.20 लाख शेतकऱ्यांना सुमारे सतराशे कोटी रुपयांचे वाटप होत असल्याचे ते म्हणाले.
पवार यांच्यावर स्तुतीसुमने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यांनी व्हीएसआय संस्थेसह पवार यांच्या कार्याचाही गौरव केला. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी कायम मार्गदर्शन केल्यास त्याचा कृषि व सहकार क्षेत्राला आणि राज्यालाही फायदाच होईल. संशोधन, विकास, प्रशिक्षण आणि विस्तार हे व्हीएसआयचे उद्दिष्ट असून याबाबत संस्थेकडून होत असलेल्या कामामुळे सहकार क्षेत्राला फायदा होत असल्याचेही शिंदे म्हणाले.
सोनहिरा साखर कारखाना अव्वल
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हीएसआयच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये मानाचा असलेला कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सांगली-कडेगांव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला. रोख 2 लाख 51 हजार, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.