निहिलिझम हा तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे. मराठीत त्याला शून्यवाद, विनाशवाद अशा अनेक संज्ञांनी ओळखलं जातं; परंतु मला स्वत:ला “निरर्थवाद’ हा शब्द त्यासाठी सुचवावासा वाटतो. जे जे आपल्याला दिसत आहे, ज्या ज्या गोष्टींचा बोध होतो आहे त्या सर्वांचा काहीही उपयोग नाही- ते सर्व निरर्थक आहे. मानवी जीवनालाही शून्य अर्थ आहे, असा विचार निहिलिस्ट तत्त्वज्ञ मांडतात. हे विश्व सगळं माया आहे- यातील काहीही अस्तित्वात नाही, असंही हे तत्त्वज्ञ म्हणतात. म्हणून या तत्त्वज्ञानाला “मायावाद’ असंही म्हणता येईल.
आपल्यापैकी काही जणांनी पूर्वीच्या काळी “देवदास’, “उडन खटोला’ यासारखे निराशावादी चित्रपट पाहिले असतील. त्यातील नायक किंवा नायिका यांचं प्रेम असफल होऊन ते मृत्यूला सामोरे जाताना दाखवलं गेलं आहे. हे निराशावादाचंच प्रतीक आहे. काहीच चांगलं होऊ शकत नाही किंवा नशीब कायम आपल्याला पारखंच होत असतं अशी विचारधारा अशा कलाकृती प्रकट करतात. “ओ दूरके मुसाफिर’ यांसारखी गाणी निहिलिझम व्यक्त करतात.
मात्र अशा चित्रपटांचा/गीतांचा आणि निहिलिस्ट तत्त्वज्ञांच्या लेखनाचा मनावर कायमचा आणि खोलवर परिणाम होऊ देणं अतिशय घातक आहे. कारण तसं झाल्यास हातून चांगलं काम घडण्याची शक्यता नाही.
लॅटिन शब्द “निहिल’ म्हणजे “अभाव’ या शब्दापासून “निहिलिझम’ हा शब्द तयार झाला आहे. आधुनिक काळात जर्मन तत्त्ववेत्ता फ्रीडरिक नीत्शे याला शून्यवादाचा प्रणेता समजलं जातं. ज्या मार्गानं मानवजात चालली आहे त्याचा परिणाम सर्व मूल्यांची झीज होऊन मानव रसातळाला जाण्यात होईल असं त्याचं मत होतं. याशिवाय जॅकोबी, किर्कगार्ड या युरोपिअन आणि तुर्गेनेव्ह या रशियन विचारवंतांनी शून्यवादाचा पुरस्कार केला. जॅकोबीचं म्हणणं तर असं होतं की शासनं/सरकारं म्हणजे सैतानाशी करार केलेल्या संस्था आहेत. इतका तो निराशावादी होता. किर्कगार्ड म्हणायचा की, पूर्वजीवनाचा अर्थ लागू शकतो पण उत्तर जीवन फक्त जगणं आपल्या हातात आहे. तुर्गेनेव्हच्या मताप्रमाणे, आपण चिखलात बसून ताऱ्यांचा पाठपुरावा करीत आहोत आणि सुखाची प्राप्ती उशिरा होण्यासारखी दुःखदायक गोष्ट दुसरी कोणतीही नाही.
आचार्य विनोबा भावे यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. एकदा विनोबा मौनात असताना कुणीतरी त्यांना भेटायला गेलं. विनोबाजी, आपल्या संपूर्ण जीवनाचा मथितार्थ काय? असं त्या व्यक्तीनं विचारलं. मौनात असल्यानं विनोबा तोंडानं उत्तर देणं शक्यच नव्हतं. त्यांनी जवळची स्लेट पाटी ओढली आणि पेन्सिलीनं तीवर शून्य काढलं. याचा अर्थ जीवनाला (निदान त्यांच्या) काही अर्थ नाही असाच होतो.
आपल्या समाजात सुप्त निराशावादी लोक खूप आहेत. म्हणूनच परीक्षेत किंवा प्रेमात अयशस्वी झालेल्या व्यक्ती आत्महत्या करताना दिसून येतात. समाधानाची बाब एकच म्हणता येईल की जागतिक सर्वेक्षणात भारतीय लोक बऱ्यापैकी आशावादी आहेत. फ्रेंच सर्वात जास्त निराशावादी तर नायजेरियन सर्वात जास्त आशावादी आहेत.
– श्रीनिवास शारंगपाणी