नवकाव्य कळते म्हणता? सांगा तर मग अनिलांच्या “धडकी’ या कवितेचा अर्थ-
सत्ताविसांतून जाऊन नऊ
शून्यच राहिले बाकी
तर…?
चिंता जडून धडकी भरे सांगा नं? जाऊ द्या. वर्षांची एकूण नक्षत्रं सत्तावीस, त्यांतली नऊ नक्षत्रे पावसाची. नऊ नक्षत्रं पाऊस पडला नाही, याचा अर्थ सत्ताविसातून नऊ गेले; बाकी अले शून्य! असे हे विचित्र गणित आहे. आपला कृषिप्रधान देश सर्वस्वी मॉन्सूनवर अवलंबून आहे. म्हणून पावसाळा हा सगळ्यात महत्त्वाचा ऋतू आहे. वर्षा ऋतू. वर्ष हा शब्दच मुळी “वर्षा’पासून आला. आपलं सगळं पावसावरच आहे. म्हणून आपण बारा महिन्यांच्या कालखंडाला “वर्ष’ म्हणतो.
संस्कृतामध्ये महाकवी कालिदासाचे “ऋतुसंहार’ हे अप्रतिम निसर्गकाव्य आहे. आधी मी या नावाला दचकलो होतो. ‘संहार’ या शब्दाचा मराठीत अर्थ नकारात्मक, विध्वंसक असा आहे आणि संस्कृत हा माझा कधीच विषय नव्हता. संस्कृतामध्ये संहार या शब्दाचा एक अर्थ- संघ, जमाव असा असून दुसरा संचय किंवा गोळा करणे असा होतो. म्हणून कालिदासाचे ऋतुसंहार- ऋतूंचा संघ कालिदासाने आपल्या ऋतुसंहाराचा आरंभ पावसाळ्यापासून केला आहे.
आणखी एक गमतीची गोष्ट इथे नोंदवली पाहिजे. महाकवी कालिदासदिन जुलै महिन्यातच सहसा येतो, आषाढ शुद्ध प्रतिपदेला, पण आषाढ शुद्ध प्रतिपदा ही काही कालिदासाची जन्मतिथी नव्हे. तर, “मेघदूत’ या त्याच्या सर्वश्रेष्ठ कवितेचा आरंभ ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दांनी होतो, म्हणून हा कालिदासदिन. कालिदास हा माझाही अत्यंत आवडता कवी. त्याचे आणि वर्षा ऋतूचे नाते मला मोठेच वेधक वाटते, म्हणून पुन्हा एवढे विषयांतर!
जुलै महिन्यात आषाढी एकादशी येते आणि सगळ्या महाराष्ट्राचे हृदय पंढरीकडे धाव घेते. याच महिन्यात ‘चातुर्मासारंभ’ होतो. गटारी अमावास्या मनसोक्त साजरी करून पुढचा महिना मद्य आणि मांस वर्ज्य करणारे मोठ्या संख्येचे लोक इथे अजूनही आहेत. याच महिन्यात इथले देव चार महिन्यांसाठी झोपायला जातात. जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे मध्यवर्ती महिने. “बरसात की बहार है’ ही सुंदर गझल माहीत आहे नं?
क्या भुरी भुरी छाई है
मैखाने पर घटा
यह ऋतही खुशगॅंवार है
साकी शराब ला…
पावसाळ्यासारखा आनंददायी ऋतू खरोखर कोणता नाही. जुलै आणि आगॅस्ट या दोन शब्दांचे भाषांतर करत मर्ढेकर लिहितात,
“आला आषाढ, श्रावण,
आल्या पावसाच्या सरी,
किती चातक चोचीने,
प्यावा वर्षाऋतू तरी!’
चातकाचा जुलै महिन्याशी संबंध असल्यामुळे पुन्हा थोडे विषयांतर करणे आले. आतापर्यंत चातक हा चकोरासारखा काल्पनिक पक्षी म्हणून ललित साहित्यामध्ये भेटत होता. चकोर हा चांदण्याशिवाय काही खात नाही आणि चातक हा पावसाच्या पाण्याखेरीज काही पीत नाही, अशी कवीची कल्पना. अगदी संतसाहित्यापर्यंत चकोर आणि चातकाचे या अर्थाने उल्लेख येतात. आतापर्यंत त्यांना कविसंकेत म्हणून मानण्याची पद्धत होती.
वास्तवात चातक हा एनसायक्लोपीडियामध्ये ज्याची माहिती “पाइड क्रेस्टेड ककू’ या नावाने येते, तो पक्षी आहे. पावसाळा सुरू झाला की, हे पक्षी उत्तरेकडून भारतात येतात आणि सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास ते भारत सोडून जातात. फक्त पावसाळ्यात निर्माण होणारे किडे, अळ्या, सुरवंट आणि झाडांची पाने हे चातकाचे खाद्य आहे. पंख फुटलेले वाळवीचे किडे उडू लागताच झडप घालून चातक त्यांना टिपतात. हे टिपताना अर्थातच चातक पक्ष्यांची चोच आकाशाच्या दिशेने असते. चातक हा पक्षी आणि त्याचे हे खाणे फक्त पावसाळ्यातच दृष्टोत्पत्तीस येते. म्हणून चातक हा फक्त पावसाचे पाणीच पितो, असे पाहणाऱ्याला वाटते.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने जुलै हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. सृजनाचा नवनिर्मितीचा हा महिना आहे. या महिन्यात सगळं गाव आपापल्या शेतात उलथलेलं दिसेल. अबक पेरणीचं बी एव्हाना तरारून उगवलेलं असतं. लोकगीतांमधून पेरणीची सुंदर-सुंदर चित्रं उमटलेली पाहायला मिळतात-
शेताला जाईन
उभी ऱ्हायीन धुऱ्यावरी
कंथ पेरीतो जवारी।
तीनी तासनी बरोबरी
तासणी म्हणजे पेरलेल्या दोन ओळींच्या मधली काळी पट्टी. पेरलेले वर आले की, या पट्ट्या उठून दिसतात.
लोकगीतामधली ही कृषिकन्या पेरणी करायला गेलेल्या नवऱ्यासाठी शेतावर जाते. धुऱ्यावर म्हणजे बांधावर उभी राहून ती नवऱ्याकडे पाहते. तेव्हा दूरवर पेरणी करत असलेला तिचा नवरा तिला दिसतो. त्याच्या अलीकडे पेरणी केलेल्या पिकांच्या रांगा दिसतात. दोन ओळींमधल्या अत्यंत रेखीव अशा जमिनीच्या पट्ट्या समांतर गेलेल्या तिला दिसतात. सर्जनाच्या या दृश्याने ती हरखून जाते.
इंदिरा संतांना ग्रामीण व कृषिजीवनाचे अत्यंत आकर्षण होते आणि ते त्यांच्या लेखनातूनही उतरले आहे, असे म्हटले तर कुणाचा फारसा विश्वास बसणार नाही. शेती, सुगी आणि पावसाळ्याचे अन्योन्य संबंध वर्णन करताना त्यांची लेखणी कशी बहरून येते! पाहा जुलै महिन्याचे त्यांच्या शब्दांतील वर्णन-
शेतीची भरपूर मशागत मोठ्या हौसेने करावी. बी-बियाणे काळजीपूर्वक पेरावे. पावसाच्या नऊही नक्षत्रांचा हवा तेवढा पाऊस पडावा आणि शेतकऱ्याने आपल्या शेतात पावले टाकत येणाऱ्या हिरव्या लक्ष्मीकडे डोळे भरून पाहत राहावे. शेतकऱ्याच्या जीवनातील ही मोठी रम्य स्वप्नमाला- त्याच्या जीवनातील हा पुत्रजन्मोत्सवासारखा जीवनाला व्यापून टाकणारा आनंद! प्रथम हिरवे पांढरे कोंब… मग दुपानी-चौपानी अशी दिसामाशी वाढत जाणारी ती बाळरोपे…
नंतर सळसळणारे हिरवेगार शेत- त्याचा फुलोरा- त्याला धरलेली कणसे, शेंगा… किती पाहू, किती नकोसे होते. इंदिरा संतांना वाटते- जिच्या शेतात हा सोहळा चालला आहे, त्या कृषिकन्येला काय वाटत असेल? आपल्या शिवारात उभ्या असलेल्या धानलक्ष्मीला बघत असताना तिचा ऊर भरून येत असेल. त्या भरात या हिरव्या चैतन्याने तिच्या मनात हिरवी गाणी उमलत असतील. ज्या पावसाने तिला साथ दिली, तो अधूनमधून पडत असेल. तिला उत्स्फूर्त ओव्या सुचत असतील. ही तिची गीतं वर्षागीताची भैरवीच गातात. तितकीच प्रसन्न – समृद्ध आणि रसरशीत!
जून महिन्यात आपण छोटी-छोटी आळी तयार करून आपल्या अंगणात आणि परसात भोपळा, दोडके, तोंडले कारले, काकडी, पडवळ यांच्या बिया लावल्या. त्यात शेळ्या वगैरेंनी तोंड घालू नये म्हणून तुऱ्हाट्यांचे गोल आणि गोड कुंपण तयार केले. महिनाभरात रोपे वाढली. चांगले सशक्त रोप शिल्लक ठेवत हळूहळू, एकेक करत प्रत्येक आळ्यातले दुर्बल रोप कमी करत गेलो. आता प्रत्येक आळ्यात भाजीचा एकेकच वेल वाढत आहे.(क्रमशः)
– विश्वावसू काशिकर