जनतेवर दररोज कराचा बोजा वाढवून त्यांना तडफडून मारण्यापेक्षा आम्ही जो अणुबॉम्ब बनवला आहे ना, तोच आमच्यावर टाका एकदाचा. पाकच्या ग्रॅंड डेमोक्रॅटिक अलायन्सच्या खासदार सायरा बानो यांनी पाक संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना अशी वाट करून दिली. त्यांचा हा त्रागा जणू पाकच्या जनतेची प्रातिनिधिक भावना म्हणावी लागेल.
पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. प्रतिदिन महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ झाली आहे किंवा बाजारात त्याची ददात तरी आहे. जगण्यापेक्षा मरणे स्वस्त होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. पाक या स्थितीला का पोचला याचा उहापोह वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. सामान्य जनतेचे जीवन किती यातनामय आहे याबाबत सत्ताधारी फारसे गंभीर दिसत नाही. संसदेत नुकतेच मिनी बजेट सादर करताना अर्थमंत्री डॉ. इसहाक दार यांनी या अवस्थेला आधीच्या इम्रान खान सरकारला जबाबदार धरले. त्या आधी नवाज शरीफ समर्थक सरकार अन् स्वतः शरीफ हे पंतप्रधान होते.
दार हे तेव्हापण अर्थमंत्री होते, मग एकटे इम्रान खान यांना जबाबदार धरणे बेजबाबदारपणा आहे, असो. पाककडे सध्या तीन अब्ज डॉलर एवढाच परकीय चलनाचा साठा उरलाय. तो पंधरा दिवस पुरेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)द्वारा तत्काळ पॅकेज मिळाले नाही तर पाकिस्तान दिवाळखोर होईल. आयएमएफ पाकला मदत देण्यास तयार असला तरी त्यांनी लादलेल्या वाढीव कराच्या अटीमुळे पाकमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईस आयएमएफचे पॅकेज जबाबदार असल्याचा बचाव पाक सरकार करीत आहे, अन् त्याशिवाय पर्याय नसल्याची हतबलता शाहबाज शरीफ व्यक्त करताना दिसतात.
नुकतेच पाकमध्ये दोन रांगांची माध्यमातील छायाचित्रे तेथील वास्तव दाखवून गेली. एकात नैराश्यग्रस्त नागरिक व रापलेले चेहरे असलेले असंख्य लोक जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लांबलचक रांगेत उभे आहेत. दुसरीकडे पाक स्थित पंजाबच्या लाहोरमध्ये कॅनेडियन कॉफी शॉप टीम हार्टन्झच्या बाहेर सहाशे रुपयांची कॉफी घेण्यासाठी एक मोठी रांग लागलेली आहे. कोण म्हणतंय पाकिस्तान गरीब आहे, असा उपरोधिक प्रश्न या दुसऱ्या छायाचित्राला उद्देशून विचारला आहे. त्याला नेटीझन्सद्वारा प्रत्युत्तर देताना पहिले छायाचित्र दाखवून मग हे काय आहे? असा प्रतिसवाल केला आहे. पेशावरमधील बाजारात एका कामगाराची प्रतिक्रिया एका चॅनलने दाखवली. तो म्हणतो, कठीण प्रसंगात मी कांदा-भाकरी खाऊन जगू शकतो. मात्र, आता मला कांदा घेणे दुरापास्त झाले आहे. 250 रुपये किलो कांद्याचा दर झाला आहे. कांदा खाणे चैनबाजी झाली आहे. सामान्य जनतेला कमी पैशात पोटाला आधार देणारी बाब म्हणजे समोसा. तो पन्नास रुपयांपेक्षा अधिक महाग झाला आहे. समोसा हा पेट्रोलपासून तयार होतो का? असा तिरकस प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. एका भारतीय नेटिझन्सने त्यावर मार्मिक टिप्पणी केली आहे. दिल्ली आईये, आपको केवल पंधरा रुपये मे समोसा खिलावूगा, वो भी पेटभर.
पाकमध्ये कट्टरवाद्यांनी मागील अनेक वर्षे जिहाद (कथित धर्मयुद्ध)चा प्रचार केला. त्याचा संदर्भ देत एका न्यूज चॅनेलवर पॅनेलिस्टने जिहादवाद्यांचे वाभाडे काढले. गरिबांसाठी रोजी रोटी प्राप्त करणे हाच आता एकमेव जिहाद उरला आहे. गरिबांचे युद्ध रोटीने सुरू होते व रोटीवरच त्याची सांगता होते, असे सूनवायला हा पॅनेलिस्ट विसरला नाही. “सरकार हमारा बचा कुचा खून भी चुस रही है’, अशी खिन्न तक्रार एका कष्टकऱ्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या पेट्रोल दरवाढीनंतर व्यक्त केली. पाकमध्ये महागाई गगनाला भिडत असताना जनतेच्या सहनशीलतेचा केव्हाही कडेलोट होऊ शकतो. एका ठिकाणी संतप्त नागरिकांनी निदर्शने करताना “जालीमो हमे जिने दो’, असे पोस्टर फडकविले. इंपोर्टेड महंगाई ना मंजूर म्हणत सरकारचा उद्धार केला जात होता.
आयएमएफने पॅकेज देण्यापूर्वी पाक सरकारला दिलेल्या सूचनामध्ये सबसिडी रद्द करणे, वीज दरवाढ करणे, व्याजदर तीन टक्के वाढवणे, पेट्रोल, गॅस व डीझेलवर कर वाढवणे, आयातीवर मर्यादा आदी अटी लादल्या आहे. पाकचे सरकार आयएमएफ द्वारा चालविणार का? असा सवाल सामान्यजन विचारताना दिसतात. एक बाब ध्यानात घेतली जात नाही, आयएमएफ ही वित्तीय संस्था आहे. कर्ज देताना त्याच्या परतफेडीची रूपरेषा ठरवणे त्यांचा अधिकार आहे. दिलेला पैसे ही मदत नसून देय कर्ज आहे. याचे भान सरकारला असले तरी सामान्य जनतेला नाही. पाकची सध्याची महागाई पाहिली तर येणारा काळ त्यांच्यासाठी किती कठीण आहे याची जाणीव होते. पेट्रोल, डीझेलच्या किमतीत फारसे अंतर उरले नाही. 270 रुपये लिटर त्याचा दर आहे. कांदा 250 रुपये किलो. गहू 104 रुपये, आटा 120, मैदा 130, बासमती तांदूळ 240, टोमॅटो 240, डाळी 260, दूध 160, केळी 220 रुपये डझन.
पेट्रोलमध्ये झालेली दरवाढ म्हणजे जनतेवर सरकारने फेकलेला “पेट्रोल बॉम्ब’ असल्याची जळजळीत टीका आरिफ हबीब या पत्रकाराने केली.गोहर एजाज या अर्थतज्ज्ञाने तर आयएमएफ पॅकेज हे पाकसाठी “डेथ वॉरंट’ असल्याचा इशारा दिला आहे. सौदी अरेबिया, यूएई, चीन आदी देशांकडे पाकने हात पसरले आहेत. कोणाही राष्ट्रप्रमुखाला पाक पंतप्रधानांनी फोन केला तर तो पैशासाठीच केला असेल असे तर्क आधीच लावले जातात. ही माहिती स्वतः पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जाहीरपणे दिली आहे. पाकची पत जगात किती घसरलेली आहे याची ही कबुली म्हणावी लागेल.
पाकमध्ये मध्यमवर्गावर अजून एक संकट घोंगावत आहे. सुमारे दोन कोटी मध्यमवर्गीय हे दारिद्य्ररेषेखाली जातील अशी भीती पाकचे माजी अर्थमंत्री व अर्थतज्ज्ञ हाफिज पाशा यांनी व्यक्त केली. आयएमएफच्या निकषांनुसार दररोज दहा डॉलर कमाई असणारा घटक हा मध्यमवर्ग मानला जातो. पाक रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने डॉलर महाग होत आहे. सध्याचा त्याचा विनिमय दर दोनशे सत्तर पाकिस्तानी रुपये असा आहे. गत दोन दशकांपासून मध्यमवर्ग वाढत होता. 2018 नंतर त्यात घसरण सुरू झाली आहे. तीस ते चाळीस हजार रुपये प्राप्ती असणारा वर्गसुद्धा आपल्या दैनंदिन गरजा आता भागवू शकत नाही.
पाकसाठी आणखी भीतीदायक बाब म्हणजे झिशान उस्मानी या तज्ज्ञाने व्यक्त केलेले भाकीत. उस्मानी यांनी पाकच्या आर्थिक स्थितीबाबत यापूर्वी दर्शविलेले धोके खरे ठरले होते. उस्मानी यांच्या भाकितानुसार पाक जर खरोखर दिवाळखोर झाला तर श्रीलंका व लेबनानप्रमाणे त्याची स्थिती होईल. डॉलरची किंमत आज दोनशे सत्तर रुपये आहे, ती चारशे रुपये होईल. पेट्रोल, डीझेल चारशे ते पाचशे रुपये प्रतिलीटरवर जाईल. शिवाय पेट्रोल भेटणार देखील नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळणे बंद होईल. चार महिन्यांतून दहा ते पंधरा दिवसांचा पगार मिळेल. पेन्शन बंद होतील.
सेव्हिंगवरील व्याज (पाकच्या भाषेत प्रॉफिट) थांबवले जाईल.बॅंकेतून पैसे काढण्यावर बंधने येतील. उद्योगधंद्याच्या नाईट शिफ्ट विजेअभावी बंद पडतील. परदेशी औषधे व आयात वस्तू गायब असतील. जनतेची क्रयशक्ती कमजोर होत जाईल. यावर आणीबाणीचा उपाय म्हणून किमान तीन महिन्यांचे जीवनावश्यक साहित्य व औषधे आदींची साठवणूक केली जावी, वेळ पडल्यास शहरातून खेड्याकडे प्रयाण करावे, शेतात राहावे, गरजा कमी कराव्यात, कॉस्ट कटिंग करा, येणाऱ्या रमझान महिन्यात अधिक कठीण दिवस असतील याची भीती उस्मानी यांनी व्यक्त केली आहे.
गवत खाऊ; पण अणुबॉम्ब बनवू
पाकिस्तानातील ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर सुमारे 45 वर्षांपूर्वी पाकचे तत्कालीन प्रमुख झुल्फिकार अली भुट्टो यांचे एक प्रसिद्ध विधान आठवले. वेळ प्रसंगी आम्ही उपाशी राहू, गवत खाऊ, पण अणुबॉम्ब बनविणारच आता अणुबॉम्ब बनविला आहे. तो शत्रूवर नव्हे तर महागाईने तडफडून मरणाऱ्या आपल्याच लोकांवर वापरण्याचा उपरोधिक सल्ला पाक खासदाराने नुकताच दिला आहे. दुसरीकडे पाक जनतेवर उपाशी राहायची वेळ दूर नाही. भुट्टो यांचे तेव्हा टाळ्या मिळवणारे वक्तव्य आज खरे ठरण्याचा धोका आहे.
तुर्कीला मदत?
पाकिस्तानमध्ये एवढे सारे अनर्थ होत असताना तुर्कीतील भूकंपग्रस्तांना एका अज्ञात पाक नागरिकाने चक्क तीस मिलियन डॉलर मदत दिली. अमेरिकेतील तुर्की दूतावासात ही मदत दिल्याची शेखी पाक पंतप्रधान मिरवत होते. ते पाहून घरात नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा ही म्हण आठवली. स्वतः शरीफ तुर्कीत मदतकार्यासाठी जाऊ इच्छित होते, त्यांना तुर्कीने मनाई केली. उशिरा का होईना ते तुर्कीला गेले.
– आरिफ शेख