भारतीय सिनेक्षेत्रात दीर्घ काळ आणि भरीव काम करणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत कुडाळकर यांची पंचविसावी पुण्यतिथी पंचवीस तारखेस आहे. त्यानिमित्ताने…
भारतीय रसिकांच्या श्रुती तृप्त करणाऱ्या लक्ष्मीकांत यांचा जन्म लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाला म्हणून त्यांचे नाव जरी लक्ष्मीकांत ठेवण्यात आले असले, तरी घरात मात्र दारिद्य्र ठाण मांडून बसले होते.
संगीताची ओढ असल्याने ते मेंडोलीन वाद्याकडे आकर्षित झाले. या वेळी बासरीवादक सुमंत राय यांनी मेंडोलीन तुला या क्षेत्रात पुढे घेऊन जाणार नाही. तू व्हायोलीन पण शिक, असा सल्ला दिला. लक्ष्मीकांतनी मग हुस्नलाल भगतराम यांचे शिष्यत्व पत्करले. त्याच वेळी काही सिनेमात बाल कलाकाराची भूमिका मिळवत, कसे बसे दिवस काढत होते.
एका ऑर्केस्टात लता मंगेशकरांनी त्यांचे वाजविणे पाहिले आणि त्या प्रभावित झाल्या. त्यांनी त्यांची शिफारस एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र इत्यादींकडे केली. फेमस स्टुडिओमध्ये काम करत असताना एकदा जेवणाच्या सुट्टीत ते सहज म्हणून बाहेर आले तर नजीकच काही मुले क्रिकेट खेळताना दिसली, तेही त्यांना सामील झाले आणि इथे त्यांची ओळख प्यारेलाल बरोबर झाली.
प्यारेलालही या क्षेत्रात संघर्ष करीत होते. दोघांना एकमेकांची साथ मिळाली. दोघे आता एकत्र काम करू लागले. दोन्ही किशोरावस्थेत होते. लतादीदींच्या कार्यक्रमात ते आवर्जून वाजवत. दीदींच्या सांगण्यावरून शंकर जयकिशननी त्यांना कामावर ठेवले.
“आवारा’ सिनेमातील घर आया मेरा परदेसी… गाण्यात मेंडोलीन वाजवून लक्ष्मीकांत यांनी आपली निवड सार्थ केली असल्याचे सिद्ध केले. कोई आया धडकन कहती है… या गाण्यात त्यांनी वाजविलेल्या मेंडोलीन पीस आज ही मर्मज्ञांना अचंबित करतो. दोघांनी पुढे मदन मोहन, जयदेव, कल्याणजी आनंदजी इत्यादी प्रख्यात संगीतकारांकडे तयारी केली.
एकोणीसशे साठमध्ये दोघांनी स्वतंत्रपणे संगीत देण्याचे निश्चित केले. पहिला सिनेमा मिळाला “हम तुम और वो’, पण तो पूर्णत्वाला पोहोचला नाही. सिंदबाद नावाचा सिनेमा, अभिनेता अजित यांची एलपींनी संगीत द्यावे अशी इच्छा नसल्याने गमवावा लागला. छैला बाबू वाट्याला आला, पण तो ही रखडला. बाबूभाई मिस्त्री यांनी पारसमणी सिनेमाचे संगीत त्यांच्यावर सोपविले.
सिनेमा दुय्यम दर्जाचा असला तरी सिनेमाची सारी गाणी हिट ठरली. हसता हुआ नुरानी चेहरा… हे गीत आज ही गुणगुणलं जातं. पारसमणीने त्यांच्या कारकिर्दीचं सोनं केले. खरं तर या सिनेमाआधी वैफल्यग्रस्त होते, प्यारेलाल यांनी आपले बस्तान युरोपमध्ये हलवायचे ठरविले होते. तेथील सिंफनी ऑर्केस्ट्राबरोबर नक्कीही केले होते. पण लक्ष्मीकांतनी त्यांचे मन वळविले. त्यानंतरच्या “दोस्ती’ सिनेमाच्या यशाने लक्ष्मीकांतचे ऐकले ते बरे झाल्याचे सिद्ध केले.
या सिनेमाने वो कौन थी, संगम, सिनेमाला मागे टाकत फिल्मफेअर ऍवॉर्ड मिळविले. गमतीचा भाग हा की, कार्यबाहुल्यामुळे “दोस्ती’ सिनेमा करण्यास प्यारेलाल इच्छुक नव्हते, पण लक्ष्मीकांत यांनी आग्रह करत सिनेमा घेण्यास भाग पाडले. पुढे फर्ज, मिलन, दो रास्ते, आन मिलो सजना, हाथी मेरे साथी अशा त्यांच्या अनेक सिनेमांच्या संगीताने रसिकांना वेड लावले. राज कपूरच्या बॉबीच्या संगीतामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाले. हम तुम एक कमरेमें बंद हो, हे गाणे आपल्या “पारसमणी’ बंगल्याच्या बांधकामात आनंद बक्षी हरविल्यामुळे लक्ष्मीकांत यांना सुचले.
बॉबीचे निमित्त होत लक्ष्मीकांतजींनी राज कपूर आणि लतादीदींमध्ये समेटही घडवून आणला. मनमोहन देसाईंपासून सुभाष घईपर्यंतच्या सर्व लहान मोठ्या सिने निर्मात्यांची ते पहिली पसंती ठरले. दाक्षिणात्य सिनेमातही एल. व्ही. प्रसाद यांनी त्यांना संधी दिली, पण तिकडचे मोठे प्रस्थ रामा नायडू यांच्याशी लक्ष्मीकांत यांचा बेबनाव झाला. नायडूच्या सांगण्यावरून तिकडच्या निर्मात्यांनी या जोडीवर बहिष्कार घातला, लक्ष्मीकांत यांच्या माफीने ही विषय निवळला नाही. नव्वदच्या दरम्यान त्यांचे प्यारेलालजींबरोबर मतभेद झाले, पण हे मतभेद पेल्यातील वादळ ठरले. चोली के पीछे क्या है? या गाण्यावरूनही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. लतादीदी, रफी यांनी सर्वांत जास्त गाणी यांच्याकडेच गायिली.
सहाशेहून अधिक सिनेमांत साडेतीन हजारांहून गाण्यांना संगीत देणाऱ्या या जोडीने सात फिल्मफेअर ऍवॉर्ड पटकाविले. संगीत देताना कोणती चाल कोणी बांधिली, हे त्यांनी कधी जाहीर होऊ दिले नाही. त्यांच्या अकरा चाली बिनाका गीत मालामध्ये टॉपवर राहिल्या. आदेश श्रीवास्ताव, इस्माइल दरबार, राजेश रोशन, आदीच्या जडणघडणीमध्ये एलपींचा मोठा वाटा. सुरेश वाडकर, अलका याग्निक, सोनू निगम इत्यादींचेही ते आधारवड ठरले. “बाळा जो जो रे’ या मराठी सिनेमास ही त्यांनी स्वर साज चढविले. पान खाण्याचा शौक असलेले लक्ष्मीकांतजी शेवटपर्यंत कार्यरत होते. एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मूत्रपिंडच्या विकाराने त्यांचे निधन झाले. रोशन तुम्हीं से दुनिया, रौनक़ तुम्हीं जहॉं की, असे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
– सत्येंद्र राठी