सोनचाफा हलवला की पटकन फुले पडतात. तसेच प्रतिभाशाली व्यक्तीचे असते. प्रतिभाशाली व्यक्ती आपल्या लेखणीतून मोरपिसाप्रमाणे आपल्या विचारांची अभिव्यक्ती करत राहतो आणि ही फुले समाज वेचत राहतो. ही फुले कधी कथेच्या, कधी कादंबरीच्या रुपाने तर कधी नाटकाच्या रुपाने समोर येत असतात. याच कलाकृती पुढे कालचक्राच्या प्रवाहबरोबर अमर ठसा उमटवतात. त्यास नोबेलसारख्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या सोनचाफ्याचा परिचय.
शतकाच्या पलीकडे डोकावते ते खरे साहित्य, असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. कारण मानवी भावभावना आणि साहित्यातील आनंद हा श्रेष्ठ स्वरूपाचा असतो. पुनःप्रत्ययाचा आनंद देते तेच खरे अक्षरसाहित्य, अशीही अभिजात साहित्याची व्याख्या केली जाते. या दृष्टीने विचार करता दरवर्षी घोषित होणाऱ्या विश्वसाहित्याच्या नोबेल पुरस्काराचा मान कोणाकडे जातो, याकडे जगातील सर्वांचे लक्ष असते.
यावर्षी 2023 सालचा साहित्यातील नामांकित असा नोबेल पुरस्कार नॉर्वे या छोट्याशा देशातील प्रतिभाशाली साहित्यिक, नाटकार, कवी आणि अनुवादक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या जॉन फोस यांना हा देण्यात येणार आहे. त्यांनी लिहिलेली नवनवीन नाटके आणि त्यांची जीवंत अशी गद्य शैली यामध्ये लोकअभिव्यक्ती ओतप्रेत भरलेली असते. विशेषतः त्यांच्या साहित्यामध्ये जे मूल्य आहे ते अकथनीय आणि अतुलनीय अशा स्वरुपाचे आहे. कारण त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मुक्या माणसाला आवाज देण्याचा प्रयत्न केला आहे. तेच त्यांच्या साहित्याचे खरे वेगळेपण आहे, असे त्रिसदस्यीय जुरी समितीने म्हटले आहे.
जॉन फोस यांच्या साहित्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की ते नार्वेतील ज्या ग्रामीण भागात राहतात त्यापैकी 10 टक्के लोकांची जी भाषा आहे, त्या भाषेला त्यांनी इंग्रजी भाषेचा साज चढविला आणि त्या भाषेमध्ये त्यांनी आपले साहित्य लिहिले आहे. आपल्याकडे ज्याला देशी साहित्य म्हणतो किंवा मातीतील साहित्य म्हणतो अशा मातीतील साहित्याची परंपरा जपणारा हा एक साहित्यकार आहे. त्यांच्या गाजलेल्या कलाकृतीमध्ये काही नाटकांचा समावेश आहे. काही काव्यात्मक कलाकृतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक दोन नाही तर सुमारे 40 नाटके त्यांनी लिहिली आहेत. त्यापैकी अनेक नाटके रंगमंचावर सादर केली जातात.
तसेच त्यांनी लोकांच्या हृदयाशी नाते जोडणाऱ्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. “व्यथा जाणते ती कथा’ असे म्हणतात. या लोककलांच्या पटांवरही त्यांनी सुक्ष्म असे आलेख काढले आहेत आणि मानवी भावभावनांचे पदर उलगडून दाखवले आहेत. पु. ल. देशपांडे यांनी असे म्हटले आहे की मुलांच्या भावना जो जाणतो खरा लेखक. मोठ्यांसाठी लिहिणे सोपे, पण लहान मुलांसाठी लिहिणे त्याहून अवघड; परंतु फोस यांनी जसे नाटक, काव्य, निबंधातून साहित्य रंगवले आहे तसेच त्यांनी बालसाहित्यसुद्धा विपूल प्रमाणात लिहिले आहे. त्यांच्या निवडक कवितांचे 2-3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यातून त्यांची मानवतावादी जीवनमूल्ये आणि दु:खी माणसाविषयीचा त्यांचा कळवळा दिसून येतो. मरणाविषयी माणसाला भय आणि कुतूहल असते. परंतु या भावनांचे साहित्यात रुपांतर करणे तसे अवघड असते. हे आव्हान त्यांनी लिलया पेलले आहे हे महत्त्वाचे आहे.
नॉर्वेतील लेखकाला हा पहिल्यांदाच पुरस्कार मिळाला आहे. 1925 साली हे पुरस्कार सुरू झाल्यापासून खुद्द या मातीतील लेखकाला हा पहिल्यांदाच पुरस्कार प्राप्त झाला आहे. बहुप्रतिक्षित असा हा साहित्याचा पुरस्कार त्यांना लाभल्यामुळे नार्वेतील लेखकांच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचे समाधान पसरले आहे. जॉन फोस यांची एक मुलाखत नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मी जे लिहितो ते मानवाला केंद्रबिंदू मानून लिहितो. मी मानवतेच्या श्रेष्ठ मूल्याबद्दल लिहितो. मानवी जीवनाच्या सुख-दु:खाबद्दल लिहितो. फोर्स यांचे कार्य सांगताना नोबेल पुरस्काराच्या सचिवांनी जे 50 मिनिटांचे निवेदन केले ते अत्यंत महत्त्वाचे आहे. या निवेदनात तीन गोष्टी त्यांनी प्रामुख्याने मांडल्या.
एक म्हणजे जिवंत अभिव्यक्ती, श्रेष्ठ मानवतावादी मूल्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकभाषेतील साहित्य. या तीन गोष्टीमुळे ते या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. बऱ्याचदा लोक कृत्रिम लिहितात, अवजड लिहितात. ते हृदयाला भिडत नाही. पण हा लेखक मात्र इतका प्रभावी आहे की त्यांच्या कलाकृती जगातील 50 हून अधिक भाषेमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे प्रकाशक नॉर्वेप्रमाणेच अमेरिकेसह जगाच्या कानाकोपऱ्यातही आहेत. त्यांचे नार्वेजियन प्रकाशक शॅमल गेट यांनी असे म्हटले आहे की त्यांची नाटके ही जगभरात हजाराहून अधिक वेळा ते रंगभूमीवर आलेली आहेत. नाटके असो कथा कांदबऱ्या असो की कविता असो त्यामुळे त्यांचे साहित्य प्रकाशन करण्यात प्रकाशक मंडळी पुढे सरकतात.
फोस यांनी 2003 मध्ये एका फ्रेंच पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते की नाट्यलेखक म्हणून मला पुरस्कार मिळेल असे वाटते. पण तो पुरस्कार कधी मिळेल आणि कुठे मिळेल हे मला सांगता येत नाही. कदाचित पुरस्काराने मला अनेक वेळा हुलकावणी दिली आहे तशी तो पुढेही देत राहिल. त्यांच्या पुरस्काराबद्दल सट्टेही लावण्यात आले. त्यामुळे त्यांना चिंता वाटत होती. पण यावेळी त्यांना हुलकावणी मिळाली नाही.
फोस यांनी 2013 मध्ये त्यांनी रोमन कॅथालिक धर्म स्वीकारला आणि त्यांच्या जीवनात बरेच बदल झाले. साहित्याचा अभ्यास केल्यानंतर आणि आपल्या वाचनाचा आवाका वाढवल्यानंतर 1983 मध्ये रेड ब्लॅक या कांदबरीद्वारे त्यांनी पहिल्यांदा साहित्यविश्वात पदार्पण केले. एकदा पदार्पण केल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते कधीही एका चौकटीत राहणारे लेखक नव्हते. नवनवीन पुस्तके वाचावित, नवनवीन पुस्तकांचा अनुभव घ्यावा, जगाकडे नव्या मुक्त दृष्टीने पहावे, असे ते सांगतात. काळानुसार त्यांची मते आणि दृष्टीकोन यात बदल झालेले दिसून येतात. पण हे बदल त्यांनी विचारपूर्वक केले आहेत. आत्मचरित्रपर लेखनाच्या पलिकडे जाऊन आपण काहीतरी लिहावे अशा प्रकारची एक खुली दृष्टी घेऊन त्यांनी तीन खंडामध्ये पसरलेल्या एका माणसाबद्दल एक आत्मकथन लिहिले आहे. जो स्वतःची दुसरी आवृत्ती म्हणून भेटतो. त्यातील जे काही चिंतन आहे ते एकाही पूर्णविरामाशिवाय 1250 प्रश्नांवर तो चालत राहतो. अशा प्रकारचा त्यांचा साहित्याचा दृष्टीकोन आहे.
समारोप
जॉन फोस यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा मोठा उद्बोधक आहे. तेवढाच नव्याने मंथन करायला लावणारा आहे. जग आज एका युद्धाच्या उबंरठ्यावर उभे आहे. ताणतणाव वाढत आहेत. पण या कालखंडामध्ये आपणास मानवी जीवन सावरायचे असेल तर साहित्यातून मोठा आशावाद द्यावा लागतो. अनेकांना आश्चर्य वाटते की भविष्यकाळत मानवी जीवनाचे कसे होणार? तेव्हा आजच्या या कालखंडात माणसाला वाचवण्याचे काम रंगभूमीच करू शकते. शेक्सपिअर म्हणाला होता जग हा वेड्यांचा बाजार आहे. प्रत्येक माणूस या रंगभूमीवर क लाकार म्हणून वावरत आहे. प्रत्येक माणसांच्या बदलत्या भूमिकांची आणि बदलत्या कामांची नोंद घेत घेत स्वत: फोस एक अव्वल नाटकार, कथाकार आणि कवी बनले. जे काही लिहवयाचे आणि सांगावयाचे ते श्रेष्ठ दर्जाचे,
पुनःप्रस्थापनाचा आनंद देणारे. त्यामुळे नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या नॉर्वेमधील लेखकाचे जीवन हेच सांगते की कवितेपासून मुलांच्या साहित्यापर्यंत काहीही लिहा; पण लिहिण्यासाठी जीवनाचा शोध, बोध घ्या आणि सत्याचा मंत्र जपा. जो कोणी हा मंत्र जपेल तोच लोकांच्या आदराला प्राप्त होईल, तोच सरस्वतीपुत्र होईल. तोच विश्वसाहित्याचा खरा तारणहार होईल.
– प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर