उद्योगनगरी, कामगारनगरी अशी ओळख असलेल्या या शहरात लाखोंच्या संख्येने असंघटित कष्टकरी आहेत. या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून काम सुरू ठेवले. हे करत असताना कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना राजकीय पाठबळ मिळवून देण्याची आवश्यकता त्यांना प्रकर्षाने भासू लागली. मविआ सरकारच्या काळात नखाते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी संलग्न झाले. शहरात पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसला कष्टकऱ्यांचे बळ मिळाले तर असंघटित कष्टकऱ्यांनाही पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या थेट सरकारपर्यंत पोहचविण्याची संधी मिळाली.
ऊन, पाऊस आणि थंडीत काबाडकष्ट करुन आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांची सर्वांत मोठी समस्या होती ती म्हणजे ते असंघटित असल्याने त्यांच्या समस्या, प्रश्न नेहमीच दुर्लक्षित राहिले. परंतु गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या या कष्टकऱ्यांसाठी काशीनाथ नखाते वारंवार रस्त्यावर उतरु लागले. पाहता-पाहता कष्टकऱ्यांच्या संघटना निर्माण झाल्या आणि या संघटनेच्या माध्यमातून काही प्रश्नांवर तोडगाही निघाला. परंतु कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे, यासाठी आग्रही असलेल्या नखाते यांनी यासाठी राजकीय पाठबळाची आवश्यकता ओळखली. महाराष्ट्रात प्रभावीपणे कष्टकऱ्यांचे पक्ष मांडू शकेल आणि त्याच्यासाठी संघर्ष करु शकेल, असा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाटला आणि त्यांनी या पक्षाशी नाते जोडले. राष्ट्रवादीला देखील हजारो कष्टकऱ्यांचे बळ पहिल्यांदाच मिळाले.
हातावर पोट असणारे मजूर, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाला, सफाई कामगार, कंत्राटी कामगार अशा असंघटित कामगारांना न्याय मिळावा म्हणून काशिनाथ नखाते यांनी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांना संघटित केले. गेल्या एक ते दीड दशकात नखाते यांनी केवळ संघर्षच केला नाही तर सरकारच्या या वर्गांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभही हजारो कष्टकऱ्यांपर्यंत पोहचविला. त्यातच नॅशनल हॉकर्स फेडरेशन इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेवर सचिवपदी काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावरदेखील पोहोचले आहे.
अविरत, अथक प्रयत्न
नखाते यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील 5200 पथारी, हातगाडी स्टॉलधारकांना स्वच्छतेचे धडे दिले आहेत. त्यातून शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरणात भर पडली आहे. यासाठी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्मातून ते अविरत प्रयत्न करत आहेत.
अन्नसुरक्षाबाबत प्रमाणपत्र
स्वच्छ आणि सुरक्षित अन्न ही सर्वांत महत्वाची बाब आहे. त्यावरच ग्राहकांचा ओघ अवलंबून असतो. तसेच पदार्थ
बनविताना तसेच तो कसा हाताळावा याचे ज्ञान आवश्यक असते. अन्न विक्रेता विकास कार्यशाळेअंतर्गत अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी, सुरक्षित अन्न कसे द्यावे, आपण बनवत असलेल्या अन्नाची सुरक्षा कशी ठेवावी, त्याचबरोबर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत प्रशिक्षण दिले जाते. शरीराला घातक असणाऱ्या पदार्थांची ओळख विक्रेत्यांना व्हावी म्हणून प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणात प्रात्यक्षिक दाखविले जाते. या प्रशिक्षणात सहभाग घेणाऱ्या विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र विक्रेते आपल्या स्टॉलवर, हातगाडीवर लावून अभिमानाने व्यवसाय करीत आहेत. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. त्याचबरोबर विविध ठिकाणी दोन रंगाच्या बकेटचे वाटप करण्यात आले.
फेरीवाल्यांचे स्थान टिकून
सध्याचे युग हे ऑनलाइन, स्मार्ट आणि सोशल मीडियाचे आहे. या स्पर्धेत पथ विक्रेते, फेरीवाले यांना यांना टिकून राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार, याची जाण नखाते यांना आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संघटनेत असणाऱ्या हजारो विक्रेत्यांच्या व्यवसाय पद्धतीमध्येच बदल घडवून आणला. गुणवत्ता आणि मार्केटिंग या दोन्ही महत्त्वपूर्ण बाबींवर भर देत फेरीवाल्यांना आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण दिले. तसेच पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांना अटकाव करण्यासाठी नखाते यांनी शहरातील विविध ठिकाणी दौरे केले. त्यात त्यांना स्वच्छ, सुरक्षित खद्यपदार्थांबरोबरच विक्रेत्यांनाही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले. वापरण्यात येणाऱ्या प्लेट्स,भांडी यांची स्वच्छता याची प्रत्यक्ष भेट पाहणी केली.