मुलांनो, अगदी खरंखरं सांगायचं हं… तुम्हाला जर कुणी काही काम करायला सांगितलं तर तुम्ही ते लगेच करता का? कुणी हाक मारली तर लगेच त्याच्यापुढे जाऊन तुम्ही उभे राहता का? पहा बरं आठवून!
आमच्या शेजारी एक राजू नावाचा मुलगा राहतो. त्याला काहीही काम सांगितलं ना, तर तो म्हणायचा, “दोन मिंटं …’. समजा, त्याची ताई म्हणाली, “ए राजू, मला जरा ते पुस्तक दे ना आणून. बाहेरच्या खोलीत आहे बघ.’ तर हा म्हणणार, “दोन मिंटं…’ आणि नंतर तो विसरूनच जायचा. मग ताई चिडायची. त्याला रागवायची. राजू तेवढ्यापुरतं सॉरी, सॉरी म्हणायचा. पुन्हा पुढच्या वेळी तेच करायचा.
कधी त्याला आज्जी म्हणायची, “राजू, मला पाणी आणून दे रे भांडंभर.’ राजू म्हणायचा, “दोन मिंटं हां आज्जी!’ आज्जी वाट बघून कंटाळून जायची. त्याला कोणीही काहीही सांगा; हा काही पटकन ती गोष्ट कधी करायचाच नाही.
राजूला अजून पोहता येत नव्हते. पण त्याला असे झाले होते की, कधी एकदा त्या पाण्यात जाऊन आपण मस्त माशासारखे पोहतोय. परीक्षा संपली की, पोहण्याच्या क्लासमधे त्याचे नाव घालायचे त्याच्या आईने कबूल केले होते. परीक्षा संपली आणि राजूची गडबड सुरू झाली, “आई, चल ना, पोहण्याच्या क्लासमधे नाव घालायला जाऊ या.’
आई म्हणाली, “दोन मिंटं हं राजू …’ राजूला झाली होती घाई. पण आईचं आपलं ठरलेलं उत्तर, “दोन मिंटं…’ राजू वैतागला. तेव्हा आई म्हणाली, “अरे, तू तर आम्हाला नेहमीच असं दोन मिंटं म्हणून उशीर करतोस. मग मी एक दिवस तुला तसं म्हटलं तर काय बिघडलं?’ राजू म्हणाला, “आता मी लक्षात ठेवेन. पण तू चल ना लवकर.’ शेवटी आईला राजूनं बाहेर जायला तयार केलंच आणि त्यांनी पोहण्याच्या क्लासला ऍडमिशन घेतली.
राजू एकदम खूश झाला. दुसऱ्या दिवशी राजूचे बाबा ऑफिसला निघाले. जिना उतरून खाली गेले आणि त्यांच्या लक्षात आलं, आपलं पैशाचं पाकीट घरात विसरून राहिलं. त्यांनी खालूनच राजूला हाक मारली. राजूनं खिडकीतून डोकावून पाहिलं. बाबांनी त्याला सांगितलं, “माझं पैशाचं पाकीट पटकन खाली आणून दे.’
“हो, दोन मिंटं…’ राजूनं नेहमीच्या सवयीनं उत्तर दिलं. बाबा बसले खाली वाट पहात. शेवटी वर येऊन त्यांनी पाकीट घेतलं आणि घाईघाईनं जात ते म्हणाले, “ह्याला चांगला धडा शिकवायला हवा. त्याशिवाय याची ही दोन मिंटाची सवय जाणार नाही.’
संध्याकाळी राजूची आई त्याला घेऊन पोहण्याच्या क्लासला गेली. राजू अजून पोहायला चांगला शिकलेला नव्हता. पोहत असताना तो दमला आणि आपण बुडतोय असं त्याला वाटू लागलं. तो ओरडला, “सर, मी बुडतोय.’ सरांचं राजूवर लक्ष होतं पण तसं न दाखवता ते म्हणाले, “दोन मिंटं हां राजू…’ राजू घाबरला होता. तो पुन्हा ओरडला, “स।ऱ, लवकर या.’ सर म्हणाले, “अरे येतो राजू, दोन मिंटं…’ आता मात्र राजूचा धीर सुटला. तो रडतरडत ओरडला, “सर, मी बुडून जाईन. लगेच या.’ शेवटी सर त्याच्याजवळ गेले. त्याला हात धरून काठापाशी आणलं. म्हणाले, “तू बुडशील कसा? तीन फुटाचंच पाणी आहे या टॅंकमधे.’
राजू थंडीनं आणि भीतीनं थरथर कापत होता. म्हणाला, “सर, पण मी किती घाबरलो! तुम्ही लगेच का नाही आलात?’
सरांनी राजूचं अंग कोरडं केलं. त्याला कपडे घालायला मदत केली आणि म्हणाले, “राजू, आता कळलं ना? दोन मिंटं किती महत्त्वाची असतात ते? तू प्रत्येक वेळी घरच्या माणसांना दोन मिंटं थांबायला सांगतोस आणि खूप उशीर करतोस किंवा कधीकधी तर तू हाक मारल्यावर दोन मिंटं म्हणतो आणि जातही नाहीस त्यांच्याकडे. मी जर आज असंच केलं असतं तर?’ राजूला त्या कल्पनेनंही कापरं भरलं.
राजू घरी आला तेव्हा त्यानं कायमचा निश्चय केला, कोणतंही काम लगेच करायचं. दोन मिंटं म्हणून लांबणीवर टाकायचं नाही. पण त्याला हे मात्र कळत नव्हतं की, सरांना त्याची ही सवय कशी कळली?
पण मुलांनो, तुम्हाला तर कळलंच असेल ना? राजूच्या आईनंच त्याच्या सरांना ही युक्ती सांगितली होती. त्यानंतर “दोन मिंटं…’ हे शब्दच राजू विसरून गेला. कोणीही हाक मारली, काम सांगितलं, तर तो ते काम चटकन करू लागला.
– माधुरी तळवलकर