काही वर्षांपूर्वी एक जाहिरात लागायची, त्यात एका गृहस्थांचं चपळाईने जिना चढणं पाहून म्हणायचे “साठ सालके बुढे या साठ सालके जवान’. तरूणपणाची अवस्था प्रत्येकाला आवडते नव्हे भुरळ घालते. हे तरूणपण कधी संपूच नये असं वाटतं. यात स्त्रिया, पुरुष सगळेच आले. ती अवस्थाच अशी असते नाही का, मुक्त जीवन जगावं, आयुष्यात जे काही करावंसं वाटतं ते करावं. डोंगर, पर्वत चढावे, नवी आव्हाने स्वीकारावी, त्यात स्वतःला झोकून द्यावे. नवं शिकावं, आत्मसात करावं, पुढच्या आयुष्याचा पाया घालावा तो याच वयात.
या वयात अंगात रग असते ती जिरवण्यासाठी मैदानं गाजवावीत, रंगमंच गाजवावा. हिंडणे, फिरणं, धावणं, पळणं अगदी मनात आणू ते. पण हेच जर हाताबाहेर गेलं तर मात्र सगळचं बिनसतं. मनाची अवस्था लवचिक असते. एखादी गोष्ट मनाचा चटकन ताबा घेते. त्यामुळे कधी कधी मार्गही भरकटतो. तेव्हा मात्र आयुष्य घडणीच्या वयात हातातून सगळं निसटलेलं असतं. प्रेमात पडणं म्हणजे काय, मैत्री म्हणजे काय, हे स्पष्ट होणं गरजेचं असतं. नाहीतर सगळी गडबड होते. कधीकधी अनर्थ होतात. दिवसभर रिकामटेकडं बसून राहणं, निरर्थक गोष्टीत वेळ घालवणं, चकाट्या पिटत राहणं, पण काय असतं की घड्याळ आणि कॅलेंडर पुढे पुढेच जात असतात आणि आपल्या हातून खूप काही निसटून जात असतं.
काळ बदलला आणि केवळ ठराविक वय म्हणजे तरुणाई ही व्याख्या बदलली. एका विचारवंतांनी म्हटलं की, “ज्याला वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडतो तो म्हातारा आणि ज्याला दिवसाचे चोवीस तास पुरत नाहीत तो तरुण.’ किती खरं आणि सार्थ आहे, हो ना. आयुष्याला खरी सुरुवात चाळीशीनंतर होते, असं म्हटलं जातं कारण तोपर्यंत माणसाला स्वतःची ओळख होते. आयुष्यात आपल्याला काय कमवायचंय याची कल्पना आली असते. जगाची ओळख बऱ्यापैकी झालेली असते. मेहनत करायची तयारी असते.
नुकतेच वाचलं की, नव्याण्णव वर्षांचे एक गृहस्थ उपनिषदांच भाषांतर करतायंत. त्यामागे कुठलीही अपेक्षा नाही. आता यांना कोण म्हातारं म्हणेल? मोठ्या वयात माणसं डॉक्टरेट करतात, संगीत शिकतात, वाद्य शिकतात, गिर्यारोहण करतात, नवी क्षेत्र पादाक्रांत करतात, लेखन करतात, काहीजण चक्क नृत्य शिकतात. स्वयंसेवी संस्थांसाठी काम करणारे एक गृहस्थ इतके मनापासून काम करतात की, पूर्वी आपण कोणत्या पदावर काम करत होतो हे विसरून नव्या जोमाने सगळं सुरू केलंय.
तरुण म्हणजे सतत मोबाइल पाहणं, मोबाइलवर गेम्स खेळणं, हेडफोन लावून गाणी ऐकणं यातच सगळा वेळ घालवणं, आई-वडिलांशी संवाद न करणं किंवा उलट बोलणं, त्यांचा मान न ठेवणं, नोकरी छोट्या कारणांसाठी सोडून देणं, जबाबदारीने न वागणं, हेच आहे असं वाटतं. पण हेच वय मोठं झालं की, वाटतं हा जन्म एकदाच मिळतो तो वाया का घालवायचा आणि सुजाणता येते. तोच खरा क्षण असतो जेव्हा जगणं सुरू होतं. मन तरूण झालेलं असतं.
शरीरात आपोआपच जोश निर्माण होतो. जगणं अर्थपूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू होतात. अगदी “लाथ मारीन तिथं पाणी काढू’ ही वृत्ती अंगात येते. वय वाढलं म्हणून रडत बसणारे असतात. पण एक नक्की नवीन शिक्षण, सतत कामात राहणं या गोष्टी माणसाला तरुण ठेवतात. जगण्याची ऊर्जा देतात. अशावेळी मंगेश पाडगावकर यांच्या ओळी आठवतात,
“सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत का
गाणं म्हणत ते तुम्हीच ठरवायचं’
पेपरमध्ये जाहिराती असतात, तरुण राहण्यासाठी औषधे मिळतात. नवे नवे शोध लावण्याचे प्रयत्न केले जातात. पण खरंच अशाने तरुण होता येतं? काहीही असो आजपासून तरुणाईची व्याख्या बदलू, मनाने तरुण राहू, शरीर आपोआप तरुण होईल.
डॉ. नीलम ताटके