पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ऑलिम्पिकमध्ये आता वुमनपॉवर दिसू लागली आहे. आता टोकियोत मिळालेल्या यशाने हरखून जाण्यापेक्षा पुढील तीन वर्षे अथक मेहनत घेत 2024 सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णयश मिळवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. स्वप्न नेहमी आकाशाला गवसणी घालण्याची पाहावीत. जर आकाश कवेत आले नाही तरी चालेल; पण तिथवर गेल्याचा अभिमान तरी मिरवता येतो.
मीराबाई चानू पदक जिंकण्याच्या क्षमतेची होती यावर कोणाचेही दुमत नव्हते. मात्र, गेल्या दोन मोसमात तिचे नाव फारसे ऐकिवात आले नव्हते, त्यामुळे ती खरेच पदक पटकावेल हा विश्वास कोणी व्यक्तही केला नव्हता. “अनहोनी को होनी कर दे’ म्हणतात तसेच तिने पदक जिंकत सगळ्यांचेच अंदाज खोटे ठरवले. सिंधूनेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच बॅडमिंटनपटू ठरली.
तिला खरेतर सुवर्ण किंवा रजतपदकाची संधी होती. मात्र, काहीवेळा आपले खेळाडू महत्त्वाच्या सामन्यात अत्यंत सहज टाळता येतील अशा चुका करतात व मोठी संधी गमावून बसतात. अर्थात तरीही सिंधूने मिळवलेल्या ब्रॉंझपदकाचे मोल कमी होत नाही; पण तरीही सुवर्णपदक जिंकू शकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूला ब्रॉंझपदक मिळाले याची हूरहूर पुढील तीन वर्षे वाटत राहील, यात शंका नाही.
दुसरीकडे सुपरमॉम मेरी कोमलाही स्पर्धेच्या अनाकलनीय नियमांचा फटका बसला. तिने पदकाच्या शर्यतीत असलेल्या सामन्यात तीनपैकी दोन फेऱ्या जिंकूनही ती पराभूत झाल्यामुळे केवळ तीच नव्हे तर संपूर्ण देश हळहळला. मेरी कोमप्रमाणेच भारताच्या अनेक महिला खेळाडू थोडक्यात अपयशी ठरल्या असल्या तरीही त्यांनी ऑलिम्पिकच्या पदार्पणात केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे, यात शंका नाही.
कमलप्रीत कौर, मनू भाकर, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, दीपिका कुमारी, भवानी देवी, पूजा राणी, द्युती चंद, सोनम मलिका व मनिका बात्रा यांच्या कामगिरीला पदकाची झालर मिळाली नसली तरीही जागतिक स्तरावर भारतीय महिला खेळाडूंकडे आता गांभीर्याने पाहू लागले जात आहे, याचा आनंद होतो.
मीराबाईने रजतपदक जिंकून दिले, पाठोपाठ सिंधू व लोवलीनाने ब्रॉंझपदक मिळवून दिले. या सगळ्यात स्वप्नवत कामगिरी केली ती भारताच्या महिला हॉकी संघाने. तब्बल चार दशकांनंतर महिला संघाने यंदा उपांत्य फेरी गाठून इतिहास घडवला. त्यांना पदक कोणते मिळाले किंवा त्यांना महत्त्वाच्या सामन्यात अपयश आले यावर समीक्षक तोंडाची वाफ दवडायला सज्ज आहेतच. पण त्यांनी गेल्या चार दशकांचा वचपा काढताना बलाढ्य संघांवर मात केली, हे कसे विसरता येईल.
तेदेखील या स्पर्धेच्या सुरुवातीचे सलग तीन सामने गमावल्यावर थाटात विजयी पुनरागमन करणे सोपे नसते. मात्र, ते भारताच्या महिला हॉकी संघाने करून दाखवले. संघातील गोलकीपर सविता पुनिया तर “द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ ठरली. तिने या स्पर्धेत तब्बल 21 गोल वाचवले व संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. एकट्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 14 वेळा भक्कम बचाव सिद्ध केला.
नेमबाजांचे अपयश सलते
भारतीय नेमबाज 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवू शकले नाहीत. जी स्थिती महिलांची तीच पुरुषांचीही झाली. अपूर्वी, इलावेनिलला, तर पुरुषांच्या गटात दिव्यांशसिंह पन्वर आणि दीपक कुमार यांनाही काहीही चमक दाखवता आली नाही. स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या नेमबाजांनी गेल्या 25 वर्षांतील सर्वांत सुमार कामगिरी केली.
1996 सालानंतर पहिल्यांदाच पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत भारताचे आव्हान संपुष्टात आले.
ही नाचक्की का आली, याचा शोध आता भारतीय नेमबाजी संघटना घेणार आहे म्हणे. याला म्हणतात वरातीमागून घोडे. गेली चार वर्षे ही संघटना कुंभकर्ण बनली होती व आता स्पर्धेपूर्वी काही दिवस आधी त्यांना जाग आली. त्यांना सुविधा देता, त्यांचा दर्जा तपासून पाहिला आहे का कधी. त्यांच्या बंदुका आयत्यावेळी दगा देतातच कशा. पात्रता फेरीतच गाशा जेव्हा गुंडाळावा लागतो त्यात खेळाडूंसह तांत्रिक चुकाही झालेल्या असतात. मनू भाकर आणि यशस्विनी देस्वाल यांना अंतिम 10 मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.
मनूच्या पिस्तुलात बिघाड झाल्याने तिचा विरस झाला. पुरुष गटात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांनीही निराश केले. या सौरभचे नामांकन तर टाइम्स या मासिकानेही केले होते व तोच देशाला सुवर्णपदक जिंकून देईल अशा वल्गनाही केल्या होत्या. खरेतर त्याच्याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पेडन्यूज असावी अशी दाट शंका येते.
काहीवेळा नेमबाजांना तांत्रिक चुकांचा फटका बसला, पण काहीवेळा विनाकारण यातील काही खेळाडूंना “लार्जर दॅन लाइफ’ केले जाते व आयत्या वेळी ते अपयशी ठरतात. हे काही याच खेळात व केवळ यंदाच्या स्पर्धेत घडले आहे, असे नाही तर अनेकदा ज्याला कारणहार समजले जाते तोच दगा देतो. ऑलिम्पिकच्या पूर्वी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत सौरभ व मनू यांच्यासह कित्येक खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली होती. मात्र, टोकियोत त्यांना यश मिळाले नाही.
याची कारणे आता शोधली जातील; पण त्याने यंदाच्या स्पर्धेची संधी पुन्हा मिळणार नाही.
2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्येही भारताला नेमबाजीत एकही पदक मिळवता आले नाही. आतापासूनच 2024 सालच्या पॅरिस स्पर्धेची तयारी सुरू केली पाहिजे. आयत्या वेळी जाग आली तरी मग त्याचा उपयोग होत नाही हे टोकियोत आपण पाहिले. महाराष्ट्राच्या खेळाडू म्हणून नेमबाजीत राही व तेजस्विनी यांचे कोडकौतुक आपण करतो. मात्र, आता त्यांना पुढील ऑलिम्पिकला संधी द्यावी का याचाही विचार केला जावा.
प्रत्येक स्पर्धेत सहभागी होतात व अपयश घेऊन परत येतात. आता त्यांच्या जागी नव्या खेळाडूंना संधी दिली गेली पाहिजे, तर कदाचित यश मिळेल. क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने बळकट सेकंड बेंच आहे, त्याच धर्तीवर अन्य सगळ्याच खेळात असा बेंच तयार करण्यासाठी पुढील तीन वर्षे खर्ची घातली गेली पाहिजेत तरच ऑलिम्पिक ग्लोरीचे स्वप्न पाहता येईल.
थोडक्यात यश हुकले
कमलप्रीत कौरल, दीपिका कुमारी, भवानी देवी, पूजा राणी, द्युती चंद, सोनम मलिका व मनिका बात्रा यांना अपयश आले याची काही कारणे असतील. मात्र, तरीही त्याचे समर्थन का केले जात आहे याचेही आश्चर्य वाटते. एकीकडे महिला खेळाडूंमधील काहींनी पदक पटकावले तर ज्यांची खरेच क्षमता होती त्यांनी अपयश पाहिले. अर्थात यातील कित्येक खेळाडूंना यंदाचे अपयश 2024 साली पॅरिसमध्ये धुऊन काढता येईल. मात्र, त्यासाठी पुढील तीन वर्षे प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.
लोवलीना बनली आयडॉल
भारताची नवोदित महिला मुष्टियोद्धा लोवलीना बोरगोहेनने ब्रॉंझपदक पटकावताना देशाला या खेळात पदक जिंकून देण्याची स्वप्नवत कामगिरी केली. मेरी कोमने या खेळात वर्चस्व गाजवताना ऑलिम्पिक पदकही जिंकले होते. तिच्यानंतर अशी कामगिरी करणारी लोवलीना भारताची दुसरी महिला तर तिसरी खेळाडू ठरली. यंदा मेरी कोमला अपयश आले असले तरीही तिला स्पर्धेतील अनाकलनीय नियमांचा तसेच सुमार पंचगिरीचा फटका बसला तसे लोवलीनाबाबत घडले नाही. त्याच्या आधी विजेंदर सिंगने 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये, तर मेरी कोमने 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदकाची कमाई केली होती.
लोवलीनाचे जास्त कौतुक याचसाठी कारण ती तिच्या कारकिर्दीतील पहिलेच ऑलिम्पिक खेळली व त्यातच पदक प्राप्त केले. लोवलीना आज केवळ 23 वर्षांची आहे. तिच्यासममोर खूप मोठी कारकीर्द आहे, त्यामुळे यंदाच्या कामगिरीवर समाधानी न राहता तिने पॅरिसचे स्वप्न पाहायला हरकत नाही. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्धात तिने 14 सामने जिंकण्याची कामगिरी केली असल्याने तिच्या कामगिरीकडे गांभीर्यानेच पाहिले जात असून, आता ती देशातील नव्या गुणवत्तेसाठी आयडॉलही बनली आहे. तिच्या खेळातून प्रेरणा घेत नवे खेळाडू समोर यावेत हीच अपेक्षा आहे.
असो, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष खेळाडूंपेक्षा महिला खेळाडूंनीच आपला दबदबा प्रस्थापित केला यात शंका नाही. पुरुषांनीही सरस कामगिरी केली. मात्र, आज एकूण परामर्श घेतला तर महिलाच सरस ठरल्या हे कोणीच नाकारणार नाही. आता टोकियोत जे कमावले त्याचा गर्व न करता जे मिळाले नाही ते पॅरिसमध्ये मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी व पदकसंख्या दोन अंकी व्हावी यासाठी खेळाडूंनी, माध्यमांनी, देशातील सर्व क्रीडा संघटनांनी व त्यांना सातत्याने मदत करताना राज्य सरकार व केंद्र सरकारनेही प्रयत्न केले पाहिजेत.जरी प्रत्यक्ष मैदानावर खेळाडू खेळत असले तरीही त्यामागे या सगळ्यांचाच सहभाग असला पाहिजे.
खेळाडूंना त्यांच्या आयुष्यात स्थैर्य मिळावे, यासाठी खेळाच्या माध्यमातून जितकी मदत करणे शक्य आहे ती संघटनांनी करावी. त्यांच्या कामगिरीची आयत्या वेळी दखल घेण्यापेक्षा सातत्याने त्यांना प्रसिद्धी देण्याचे काम माध्यमांनी करावे व खेळाडूंना निधी कमी पडणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. “हम साथ साथ है’ असे वातावरण मिळाले तरच देशाचे खेळाडू ऑलिम्पिकमध्येही भारताचे वर्चस्व निर्माण करतील यात शंका नाही.
अमित डोंगरे