अशी एक बॅंक आहे, जी दररोज आपल्या खात्यावर 86 हजार 400 रुपये जमा करते. परंतु त्या बॅंकेची एक अट असते आणि ती म्हणजे 86 हजार 400 रुपये त्याच दिवसात संपवायचे असतात. आपण एका दिवसात त्यातील जेवढा उपयोग करून घेऊ तेवढे ठीक उर्वरित शिल्लक बॅलन्स मात्र त्या रात्रीच संपून जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढीच रक्कम तुमच्या त्या खात्यावर जमा होते. आता अशी बॅंक आणि असे खाते असल्यास आपण काय कराल? साहजिकच आपण त्या दिवसात मिळणाऱ्या त्या पूर्ण रकमेचा वापर करू. हे उत्तर अपेक्षितच आहे. पुढे प्रश्न पडेल, “परंतु असे करणारी बॅंक नेमकी आहे तरी कोणती?’ अशी एक बॅंक आपल्या प्रत्येकाकडे आहे. त्या बॅंकेचे नाव आहे “वेळ’.
ही वेळेची बॅंक दररोज सकाळी आपल्या जीवनाच्या खात्यात 86 हजार 400 सेकंद जमा करते. परंतु ते वापरण्यासाठी एक ठराविक वैध्यता किंवा अवधीही देते. त्या अवधीतच आपल्याला त्यातील प्रत्येक सेकंदाची आपल्याला योग्य गुंतवणूक करायची आहे. ज्यातून आपल्याला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावायचा आहे. याला कसलीही ओव्हरड्राफ्ट सुविधा नाही. प्रत्येक दिवस आपल्या खात्यात जमा करेल.
आजच्या ठेवीला आजचीच मुदत आहे. आजची मुदत संपल्यावर त्या ठेवीचा काहीही उपयोग होणार नाही आणि प्रत्येक दिवसाचा शेवट हा क्लोजिंग बॅलन्स शून्य करेल. आयुष्यात या वेळेच्या खात्याला खूप महत्त्व आहे. माणसाचे आयुष्य हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावतं. सेकंद, मिनिटे आणि तास हे मानवी जीवनाला नियंत्रित करीत असतात. त्याला त्याच्या जबाबदारीची सतत जाणीव करून देत असतात. म्हणूनच म्हणतात की, आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. एकदा गेलेली वेळ कितीही किंमत दिली तरी परत आणता येत नाही. त्यामुळे वेळेचा हा महिमा समजून घेऊन वेळेचे नियोजन आपल्याला करता आले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे.
एका व्यक्तीने आयुष्यात सर्वकाही कमावले. अमाप संपत्ती कमावली. परंतु ज्यावेळी तो जीवनाच्या अखेरच्या घटका मोजत होता त्यावेळेस यमदूत त्याच्याकडे आला.आपल्याकडे सर्वकाही विकत घेता येईल एवढा पैसा आहे. आता त्या यमदूताशी एक डील करूया, असा विचार त्याने केला. यमदूताकडून वेळ खरेदी करण्याचा प्लॅन केला. परंतु यमदूताने त्याला नकार दिला. तो यमदूताला म्हणाला, “मला माझ्या आयुष्याचा फक्त एक तास द्या, जेणेकरून मी शेवटच्या क्षणी सर्वांचे आभार मानू शकेन.
कोणी दुखावले असल्यास त्यांची माफी मागू शकेल आणि माझ्या मुलांना काही धडे देऊ शकेल.’ पण यमदूताने पुन्हा नकार दिला. शेवटी, त्या मनुष्याने विचारले की, मला एक मिनिट तरी द्या त्यांनतर मी अवश्य निरोप घेईल. त्याची इच्छा मंजूर झाली आणि त्या एका मिनिटात त्याने आप्तस्वकीयांसाठी एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्याने लिहिले, “तुमचा वेळ योग्य वेळी, योग्य गोष्टींसाठी व्यतीत करा. मी माझी अगणित संपत्ती देऊनही आयुष्याचा एक तासदेखील विकत घेऊ शकत नाही. आपल्या मनाचे ऐका. सर्वांशी सलोख्याने वागा. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाची काळजी घ्या.
आपल्याला वेळेचे योग्य नियोजन करता आले पाहिजे. वेळेचे नियोजन करताना आपल्याला त्याची चार भागांत विभागणी करायची आहे. 1. अतिमहत्त्वाची कामे 2. दैनंदिन जबाबदाऱ्या 3. ऐनवेळची कामे 4. कमी महत्त्वाची कामे (अनावश्यक). आपल्याला प्रत्येक दिवसाचे नियोजन करताना वरील चार विभागांत वेळेची विभागणी करायची आहे. ज्याचे आपल्याला आदल्या दिवशी रात्रीच नियोजन करायचे आहे. परिस्थितीप्रमाणे त्यात थोडाफार बदल होणे अपेक्षित आहे. मात्र प्राधान्यक्रम ठरविणे अतिशय महत्त्वाचे आहे. या प्राधान्यक्रमाच्या सुस्पष्टतेसाठी आपले ध्येय, स्वप्ने, उद्दिष्टे यांची निश्चिती असणे गरजेचे आहे.
अतिमहत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्यक्रम हवा. दैनंदिन जबाबदाऱ्यांचा वेळ वजा करून अतिमहत्त्वाच्या आणि ऐनवेळच्या कामांसाठी आपल्याकडे पुरेसा वेळ शिल्लक असायला हवा. यासाठी आपणच डेडलाइन निश्चित करायला हव्यात. कार्यालयीन जबाबदाऱ्या, आरोग्य, कुटुंब आणि सामाजिकता यासाठी दररोज वेळ काढायलाच हवा.
आजपासूनच याची सुरुवात करा. आधी कागदावर आणि मग प्रत्यक्षात उतरवा. त्या दिवसाचे तुमच्या जीवनातील मोल नक्कीच तुम्हाला समजेल आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानाची तुलना होऊ शकत नाही. वेळेला सांभाळा. वेळही वेळोवेळी तुम्हाला सांभाळून घेईल.
-सागर ननावरे