आसीसीआयने आता महिला क्रिकेटकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे याचे सर्वाधिक समाधान आहे. त्याचाच भाग म्हणून आधी जाहीर केल्याप्रमाणे महिलांच्या आयपीएल स्पर्धेचाही नारळ फुटला आहे. यात पाच संघ पहिल्या वर्षी खेळणार असले तरीही त्यासाठी आयोजित केलेल्या खेळाडूंच्या लिलावात जी रक्कम खेळाडूंना मिळाली ती पाहिल्यावर डोळे फिरले हे मात्र नक्की. भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला 3.40 कोटी रुपयांचा करार करून रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने आपल्याकडे घेतले. ये तो सिर्फ झांकी है, अब बहोत कुछ बाकी है, असेच म्हणावे लागेल. मात्र, या सगळ्यातून एख गोष्ट दिसली ती हीच की आता महिलांच्या क्रिकेटलाही सुगीचे दिवस येणार असल्याचीच ही नांदी आहे.
भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने आयसीसीच्या पहिल्याच टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद पटकावले व त्यात सरस कामगिरी केलेल्या शफाली वर्मासह अनेक खेळाडूंना कोटींची रक्कम करार म्हणून देत विविध संघांनी आपल्याकडे घेतले. आता त्यांचा खेळाचाच नव्हे तर आर्थिक स्तरही उंचावणार आहे. जागतिक स्तरावर जेव्हापासून महिलांचे क्रिकेट सुरू झाले तेव्हापासून हे क्षेत्र तसे दुर्लक्षितच होते. एकतर अन्य देशांच्या महिला क्रिकेट मंडळाप्रमाणे आपल्याही महिला क्रिकेटची चूल वेगळीच मांडली गेली होती. मात्र, बीसीसीआयवर सौरव गांगुली यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली व बीसीसीआयने महिला क्रिकेटही आपल्याच छत्राखाली घेतले व त्याचक्षणी महिला क्रिकेटच्या सोनेरी वाटलालीला सुरुवात झाली. मुख्यत्वे त्यांच्या स्पर्धा वाढल्या, सामन्यांची संख्या वाढली, परदेश दौरेही वाढले व मुख्य म्हणजे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार याची खात्री मिळाली.
मानधनाचा ब्रॅंड व्हावा
आयपीएल स्पर्धा (पुरुषांची) जेव्हा सुरू झाली तेव्हा आयपीएल समितीने आयकॉन खेळाडू ही संकल्पना राबवली. त्यामुळे या स्पर्धेला सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग असे आयपीएल ब्रॅंड मिळाले. त्यातही सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणापासूनच ब्रॅंड होता परंतु बाकी खेळाडूंच्या विविध संघातील सहभागामुळे स्पर्धेला ग्लॅमर आले. त्यामुळे ही स्पर्धा केवळ यशस्वीच नव्हे तर सातासमुद्रापारही लोकप्रिय ठरली. आता हेच काम बीसीसीआयला महिलांच्या आयपीएलमध्ये घडले तर स्पर्धेला ग्लॅमर मिळेल. सध्या भारतीय संघात कितीही स्टार खेळाडू असले तरीही जे स्थान सचिनचे पुरुष संघात आहे त्याच स्थानाकडे सध्या स्मृती मानधनाची वाटचाल सुरू आहे. आता बीसीसीआयला तिचीच लोकप्रियता कॅश करायची आहे. मानधनाला पदार्पणापासूनच नॅशनल क्रश म्हणत असल्याने तिच्याकडून प्रेरणा घेत कितीतरी खेळाडू पुढे आल्या व आज त्या 19 वर्षांखालील किंवा राष्ट्रीय संघात तिच्याबरोबरच खेळतात ही वस्तुस्थिती आहे.
संघांची संख्या वाढली पाहिजे
महिलांच्या आयपीएल स्पर्धेचा हा पहिलाच मौसम आहे. त्यामुळे केवळ पाचच संघ यात सहभागी होत आहेत. मात्र, येत्या काळात पुरुष संघांप्रमाणे महिलांचेही किमान 8 संघ व्हावेत. कारण तरच स्पर्धेची व्याप्ती वाढेल व बीसीसीआयलाही जास्त पैसा मिळेल व त्यातूनच भारतीय महिला संघाचा विकास, प्रसार व प्रगती साध्य होणार आहे. आज भारतीय महिला संघात जे खेळाडू दिसतात त्यांच्याशीच स्पर्धा करू शकतील, असा सेकंडबेंचही सज्ज आहे. आपण 19 वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेतही हेच पाहिले. याच संघाने यंदाची विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. तसेच आता दक्षिण आफ्रिकेतही वरिष्ठ गटाची महिला विश्वकरंडक स्पर्धा सुरू आहे व त्यात भारतीय महिला संघ चमकदार कामगिरी करत आहे. ज्याप्रमाणे पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेतील संघांची संख्या 7 वरून 10 झाली तेच महिलांच्या स्पर्धेतही व्हायला पाहिजे. महान गोलंदाज व माजी कर्णधार कपील देव एकदा म्हणाले होते की, जितकी जास्त विद्यापीठे उभी राहतील तितके यशस्वी विद्यार्थी देशाला मिळतील. त्याच धर्तीवर असे म्हणायला हवे की जितके संघ वाढतील तितका समर्थ सेकंड बेंच बीसीसीआयला मिळेल. भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटींच्या घरात आहे. हीच लोकसंख्या आपली ताकद आहे ते बीसीसीआयने पक्के ओळखले व त्यानुसार नियोजन करत राष्ट्रीय खेळ असलेला हॉकी झाकोळला गेला व क्रिकेट हाच या देशाचा जणू धर्म बनला. आज या धर्माचे करोडो अनुयायी पुरुष संघात तसेच सेकंड बेंचवर बसलेले दिसतात. आता हेच चित्र महिला क्रिकेटमध्येही दिसले पाहिजे.
प्रेक्षकांना मैदानात आणा
जागतिक स्तरावरची सर्वात प्रतिष्ठेची महिलांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. मात्र, त्यातील सामने पाहिल्यावर सहज लक्षात येते की स्पर्धेला पाहिजे तसा प्रेक्षकवर्गच लाभत नाही. आता जर महिलांच्या क्रिकेटची व्याप्ती वाढवायची असेल तर प्रेक्षकांना मैदानात आणण्याची जबाबदारीही बीसीसीआयला घ्यावी लागेल. आज भारतात सर्वात मानाची देशांतर्गत स्पर्धा असलेली रणजी करंडक स्पर्धाही अनेकदा प्रेक्षकांशिवाय केळवली जाताना दिसते. हेच जर आयपीएलच्याबाबतीत घडले तर ती स्पर्धाही बंद पडण्याचा धोका आहे. असे होऊ नये यासाठी खास नियोजन केले पाहिजे. शालेय, महाविद्यालयीन युवकांना तसेच युवतींना मैदानात हे सामने पाहण्यासाठी ठराविक संख्येने मोफक व्यवस्था केली गेली तर फरक निश्चितच दिसेल. यातून बीसीसीआयला तिकीट विक्रीत काही फटका बसेल पण दूरचा फायदा लक्षात घेता हे नुकसान बीसीसीआय सहज सहन करेल. देशातील अशा मैदानांवर ही स्पर्धा खेळवली गेली पाहिजे जिथे आजवर आंतरराष्ट्रीय सामनेही झालेले नाही व देशांतर्गत सानेही होत नाहीत. असे घडले तर ज्या चाहत्यांना आपल्या शहरात सामने होत नसल्याने पाहता येत नाहीत तो वर्ग निश्चितच मैदानांवर मोठ्या संख्येने येईल. जे महेंद्रसिंह धोनीच्या रांचीत घडले तसेच खचाखच भरलेली मैदानेही महिलांच्या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी दिसून येतील. स्मृती मानधनाच नव्हे तर हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्रकार, रिचा घोष, रेणूका सिंग व जेमिमा रॉड्रीक्स यांचे ब्रॅंड तयार करत नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी.
परदेशी खेळाडूंची संख्याही वाढावी
आज जागतिक महिला क्रिकेटचे चित्र पाहिले तर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांचेच संघ सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. त्यात वेस्ट इंडीजही आहे परंतु त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही तसेच त्यांच्या मंडळाकडेही त्यांच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठी काहीतरी करण्याची इच्छाही दिसत नाही. दक्षिण आफ्रिकेत विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेतही हेच दिसले. बेभरवशाची कामगिरी हा पाकिस्तानप्रमाणे त्यांच्याही क्रिकेटवर बसलेला शिक्का अद्याप त्यांना मिटवता आलेला नाही. मात्र भारत वगळता वर नमूद केलेल्या अन्य चारही संघांकडे बलाढ्य संघ म्हणूनच पाहिले जाते. त्यातही ग्लिंड व ऑस्ट्रेलिया हे संघ तर संपूर्ण वर्चस्व राखून आहेत. या संघांना आव्हान देण्याची ताकद केवळ भारतीय संघात आहे. आता प्रश्न कामगिरीचा येतो व तिथेच आपण कमी पडत आहोत. महिलांच्या आयपीएल स्पर्धेत याच परदेशी संघांच्या खेळाडूंची संख्या सुरुवातीला वाढवली तर आपल्या देशातही महिलांच्या क्रिकेटकडे वळणाऱ्या मुलींची संख्या वाठेल व परिणामी देशाला उत्तोत्तम खेळाडू गवसतील.
सामन्यांची वेळ महत्त्वाची ठरेल
पुरुष क्रिकेट संघांचे सामने एकेरी असतील तर ते संध्याकाळी 8 वाजता सुरू होतात. डबल हेडर सामने असतील तर पहिला सामना दुपारी 4 तर दुसरा सामना संध्याकाळी 8 वाजता सुरू होतो. ही वेळ माध्यमांच्या दृष्टीने अत्यंत किचकट ठरते. मात्र, या स्पर्धेला लाभलेला प्रेक्षकवर्ग पाहता ते चालून जाते. बातमी प्रसिद्ध होण्यासाठी जे काही निकष असतात त्यातील पहिला निकष असतो ते म्हणजे ती बातमी कधी मिळते व त्याचे प्रकाशन करण्यासाठी किती वेळ हाती मिळतो. यावरच ती बातमी कशी प्रकाशित होते हे पाहिले जाते. हाच प्रश्न महिलांच्या सामन्यांच्या बाबतीतही येणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजन करताना संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू झाला तर तो 10ः30 पर्यंत संपला तर त्याचे कव्हरेजही चांगल्या प्रकारे देता येईल. आजवर बीसीसीआयने याबाबत काहीही केलेले नाही. कारण माध्यमांमध्ये स्पर्धा इतकी प्रचंड आहे की यावर टीकाही करता येत नाही व निषेध करत बातम्याच छापायच्या नाहीत असा दृष्टिकोनही ठेवता येत नाही. मात्र, महिलांच्या सामन्यांना प्रतिसाद मिळेल का याची आत्ता तरी कोण खात्री देऊ शकत नसल्याने किमान या स्पर्धेचे सामने तरी संध्याकाळी 7 वाजता सुरू करावेत म्हणजे त्याची प्रसिद्धीही चांगल्या प्रकारे करता येईल.
आता येत्या 4 ते 26 मार्च या कालावधीत यंदाची पहिलीच महिला आयपीएल स्पर्धा होत आहे. यंदा स्पर्धेचे सर्व सामने केवळ मुंबईतील ब्रेबॉन व डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. पाचही संघ आपापल्या खेळाडूंच्या जीवावर स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज बनले आहेत. येत्या काळात पुरुषांच्या स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेनेही लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित करावेत व बीसीसीआयनेही टीकेला कोणताही वाव न देता त्याचे सर्व निकष पूर्ण करावेत हीच अपेक्षा आहे.
अमित डोंगरे