पुणे -राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या पुणे विभागात नवीन 20 ई-बस (शिवाई) दाखल होणार आहेत. पुणे विभागातून अहमदनगर नंतर आता औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि कोल्हापूर या मार्गांवर वातानुकूलित ई-बस धावणार आहेत. एसटी महामंडळाने 1 जून 2022 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.
याच दिवशी एसटीच्या ताफ्यात पहिली ई-बस दाखल झाली होती. पुणे ते नगर या एकाच मार्गावर सध्या शिवाई बस धावत आहे. ही बस वातानुकूलित आणि आरामदायी असल्यामुळे तिला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाने पुढील तीन वर्षांत आणखी पाच हजार ई-बस घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या बस टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 ई-बस दाखल होणार आहेत. या सर्व बस पुणे विभागाला मिळणार आहेत. यातील 20 बस फेब्रुवारीअखेर ताफ्यात दाखल होणार आहे. या ई-बस औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि कोल्हापूर या मार्गांवर धावतील.