“सौंदर्य’… शब्द उच्चारताच डोळ्यात चमक ही येतेच. “सुंदरता’ ही सगळ्यांनाच आकर्षित करणारी व्याख्या आणि हा क्षेत्र स्त्रियांची मक्तेदारी. पुरुषांना नटण्या थटण्याची गरज ती काय? असा प्रति सवालही विचारला जातो. खरं पाहिलं तर प्रकृतीने पुरुष वर्गालाही सौंदर्याचे लेणे दिले आहे. या विषयावर विचारक ओशों छान भाष्य करत. त्यांच्या मते, पुरुष वर्गाने सुंदर दिसावे म्हणून निसर्गाने त्याला काही विशिष्ट गोष्टी बहाल केल्या आहेत.
उदाहरण द्यायचं झालं तर त्याने लांडोरीला ओकी बोकी ठेवलं आणि पिसाऱ्याचा भरजरीतपणा मोराकडे दिला. वसंत ऋतूत कानाला सुखावणारे कूजन नर कोकीळ काढतो, मादा कोकिळाच्या वाट्याला हे स्वर सौंदर्य दिले गेले नाही. सिंहाला आयाळांचा रुबाब देताना सिंहिणीला मात्र यापासून वंचित ठेवण्यात आले. कोंबड्याच्या माथी तुऱ्याचे तोरण बांधले आणि मादा कोंबडीला बोडकी ठेवले.
एकदा महात्मा गांधीजी रवींद्रनाथ टागोरांकडे मुक्कामी होते. कवी मनाचे रवींद्रनाथ सौंदर्याचे उपासक, ते वृद्धावस्थेकडे झुकलेले असले तरी टापटीप राहणे पसंत करीत. एका सायंकाळी गांधीजींनी पाय मोकळे करायला जाऊ या, असे सुचविले. रवींद्रनाथ यांनी होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाले, थांबा! मी आवरून, केस विंचरून येतो. गांधीजी चमकले. आता या वयात कशाला हे, या आशयाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. रवींद्रनाथ ऐकणार नाहीत हेही त्यांना माहीत होते… ते त्यांची वाट पाहत ओसरीवर थांबले.
बराच वेळ झाला त्यामुळे गांधीजींनी कंटाळून आत डोकावून बघितले तर त्यांचे आवरणे चालू होते. गांधीजींनी आवाज दिला तेव्हा कुठं ते बाहेर आले. थोड्याशा नाराजीच्या सुरात गांधीजी म्हणाले, आता या वयात हे सारे किती उचित आणि किती गरजेचे आहे? रवींद्रनाथ क्षणभर थबकत म्हणाले, जेव्हा मी तरुण होतो, आकर्षक होतो, तेव्हा केस विस्कळीत राहिले तरी चालत; पण या म्हातारपणात केस, पोषाक नीट असणे जास्त गरजेचे आहे असे मला वाटते. टागोरांनी याला जोडून उधृत केलेले वाक्य खास समजण्यासारखे आहे.
“असे समजू नका की, माझा हा आटापिटा सुंदर दिसण्यासाठी आहे, किंबहुना बघणाऱ्याला मी कुरूप किंवा अजागळ दिसू नये, मी केवळ याची काळजी घेत असतो. ओंगळवाणा दिसून मी मला बघणाऱ्या कोणाच्या दुःखाचा कारण बनू इच्छित नाही. जाणीवपूर्वक कुरुपता बाळगणे ही दुसऱ्याच्या प्रती एका प्रकारची हिंसाच ठरते. समजण्यास थोडी सूक्ष्म असली तरी ही महत्त्वपूर्ण अशी बाब आहे.’
सुंदरतेचा एक साधकच असा विचार करू शकतो.केवळ “सुंदर’ या शब्दाची व्याख्या जरी विस्तारली तरी समजून येईल की, सुंदरतेचा ध्यास बाळगणारी, सौंदर्याच्या मार्गावर असणारी, त्याची उपासना करणारी अशी व्यक्ती बाह्यस्वरूपाच्या सौंदर्याबरोबर आपल्या अंतर्मनालाही सौंदर्याची झाक देईल. भारतीय दर्शनशास्त्र याच धर्तीवर “सत्यं शिवं सुंदरम्’ या बोधवाक्याची कल्पना मांडतो.
सौंदर्याची साधना प्रकृतीच्या निरागसपण्याचे प्रतिनिधित्व करत असते. सृष्टी सुंदर आहेच, ही सुंदरता आपल्या दृष्टीतही यावी यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्नशील राहायला हवे. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंगात सौंदर्य स्थळे शोधायला हवीत. आपण जस जसे सुंदरतेच्या निकट जाऊ तस तसे आपल्या जगण्यातून अशुद्धी, विकृती व इतर दुर्गुण विरळ होऊ लागतील. आपण आचार विचार आणि विहारमध्ये सौंदर्याची ही निरागसता जपायला हवी. अशाने केवळ आपले जगणेच नव्हे तर हे जग सुंदर होण्यासही मदत होईल.
-सत्येंद्र राठी