मंचर -अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या तीन गावांसाठी तलाठी कार्यालय आहे; परंतु या कार्यालयात प्रिंटर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा व आठ-अ उतारा काढण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामध्ये जावे लागत आहे. या ठिकाणी त्यांना एका उताऱ्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालयात तात्काळ प्रिंटर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत असणाऱ्या स्थानिक सोसायटीमार्फत तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. त्यासाठी अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी येथील प्रत्येक शेतकऱ्याला सातबारा उताऱ्याची गरज असते, परंतु गेली अनेक वर्षे अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालयात प्रिंटर उपलब्ध नाही.
भाजप, शिवसेना यांची सत्ता असताना राज्यातील शेतकऱ्यांना घरबसल्या सातबारा, आठ-अ उतारा काढता यावा किंवा पाहता यावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. त्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी यांना दोन वर्षे संगणक ट्रेनिंग देऊन राज्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची सातबारा, आठ-अ अपलोड केले. त्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा आठ-अ मिळू लागल्याने पुणे, मुंबई व बाहेरगावी राहणारे शेतकरी समाधानी झाले.
मात्र, स्थानिक, शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात गेले अनेक महिने प्रिंटर नसल्याने सर्रास महा ई-सेवा केंद्रात ऑनलाइन उतारे काढण्याशिवाय पर्याय नाही. महा-ई-सेवा चालक सातबारा, आठ-अ उताऱ्यासाठी जास्त पैसे घेत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालयात संगणक व प्रिंटर उपलब्ध कन द्यावा व शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तहसीलदार रमा जोशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे प्रिंटरची मागणी केली आहे, थोड्याच दिवसात अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालयात प्रिंटर उपलब्ध होईल.
– संकेत गवारी, तलाठी, अवसरी बुद्रुक