कोपरगाव – शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील शासकीय जागेवर नागरिकांची अतिक्रमणे नियमाकूल करून त्यांना लवकरात लवकर उतारे देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली.
कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर परिसरात मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर जवळपास 465 कुटुंबे राहात आहेत. ज्या शासकीय जागेवर हे कुटुंब राहात आहेत. त्यांना जागा शासन नियमाकूल करून उतारे मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू होता. या जागा नियमित कराव्यात, यासाठी आ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवकांनी सातत्याने नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला आहे. वेळोवेळी सर्वसाधारण सभांत देखील आवाज उठविला आहे.
याप्रश्नी आज आ. काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी समितीची बैठक घेतली. आ. काळे म्हणाले, लक्ष्मीनगरमधील शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जागा शासकीय नियमाप्रमाणे नियमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून हे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी केली.
या बैठकीमध्ये कोपरगाव शहराच्या इतर भागांतील शासकीय जागांवरील अतिक्रमणे नियमाकूल करण्याबाबतही महत्त्वाची चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, नगररचना सहायक संचालक आकाश बागूल, जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघे, भूमिअभिलेख उपअधीक्षक पोळ, अभियंता वाघ, हर्षवर्धन सुराळकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक वीरेन बोरावके, राजेंद्र वाघचौरे आदी उपस्थित होते.