नगर – जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 अन्वये ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष या सारख्या बंद जागा खेरीज , जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत सन 2020 या वर्षामध्ये 15 दिवसांकरिता ध्वनीप्रदूषणाची पातळी विहित मर्यादेमध्ये राखून सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास सवलत जाहीर केली आहे.
सन 2020 या वर्षाभरात दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवजयंती (शासकीय), दि. 14 एप्रिल 2020 रोजी डॉ.आंबेडकर जयंती, दिनांक 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र दिन, गणपती उत्सव कालावधीमध्ये दिनांक 23 ऑगस्ट 2020 रोजी दुसरा दिवस, दि. 26 ऑगस्ट 2020 रोजी पाचवा दिवस, दि. 27 ऑगस्ट 2020 रोजी गौरी विसर्जन व दि. 1 सप्टेंबर 2020 रोजी अनंत चतुर्दशी असे चार दिवस , नवरात्री उत्सवात दि. 24 ऑक्टोबर 2020 रोजी अष्टमी, व दि.25 ऑक्टोबर 2020 रोजी नवमी असे दोन दिवस, दि. 30 ऑक्टोबर 2020 रोजी ईद ए मिलाद, दि.14 नोव्हेंबर 2020 रोजी लक्ष्मीपूजन, दि. 25 डिसेंबर 2020 रोजी खिसमस, दि. 31 डिसेंबर 2020 व उर्वरित दोन दिवस जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार दिली जाणार आहेत.
वरील कालावधीत प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाच्या ध्वनीप्रदूषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 नुसार पालन करण्यात येणार असून ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरण यांच्याकडे प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शांतता क्षेत्राची माहिती घेवून या भागातील ध्वनीमापक संयंत्राद्वारे ध्वनीचे कंट्रोल नमुने घेऊन त्याबाबत पंचनामा व पोलिस स्टेशनला दैनंदिनीमध्ये शांतता क्षेत्र , मिरवणुकीचा मार्ग व महत्वाच्या ठिकाणांची नोंद करण्यात येईल.
एखाद्या ठिकाणी ध्वनीप्रदूषण होवून आजूबाजूच्या लोकांना या सर्व सामान्य जनतेस त्रास होत आहे अशी तक्रार आल्यास ती लिहून घेवून त्या तक्रारीचा खरे खोटेपणा पाहण्यासाठी घटनास्थळी भेट द्यावी. घटनास्थळी गेल्यावर दोन पंचांच्या समक्ष ध्वनीची तीव्रता मोजण्याच्या उपकरणाच्या सहाय्याने ध्वनीची तीव्रता किती आहे. याची नोंद करण्यात येईल. घटनास्थळाचे छायाचित्रण करुन मोजलेली तीव्रता ही मानद मर्यादेपेक्षा अधिक असल्यास उचित प्राधिकरणाकडे पाठविण्यात येईल.
घटनास्थळी जाणा-या पोलिस अधिकाऱ्यांने आपल्या अहवालासोबत चौकशीचे सर्व कागदपत्रे त्वरित पर्यावरण (सरंक्षण) कायदा 1986 व ध्वनीप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) मधील तरतुदीप्रमाणे निर्माण करण्यात आलेल्या प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचा नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.