नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशाच्या सीमा भागात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीकडे प्राधान्याने लक्ष द्यायचे ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज येथे दिली.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना पदक प्रदान करण्याच्या समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, भारत सरकार, सीमा भागातील स्थानिक समुदायाला सीमा व्यवस्थापनातील एक प्रमुख भागधारक मानते. सीमेच्या सुरक्षेसाठी ते आवश्यकही आहे अशी सरकारची धारणा आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पात व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम हा नवीन कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमात आम्ही सीमावर्ती गावांकडे लक्ष दिले आहे, जिथे लोकसंख्या खूपच कमी आहे तेथे कनेक्टीव्हीटी आणि अन्य सुविधांसाठी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
ही गावे नवीन कार्यक्रमांतर्गत आणली जातील. गावातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पर्यटन केंद्रांचे बांधकाम, रस्ते जोडणी, विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जेची तरतूद,इत्यादी कामे त्यात समाविष्ट आहेत असे ते म्हणाले. या उपक्रमांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जाईल असेही त्यांनी नमूद केले.