पिंपरी, (प्रतिनिधी) – १५ वर्ष पूर्ण होऊनही पर्यावरण कर न भरणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाइला सुरूवात केली आहे. हा कर न भरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाइ करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात तब्बल ५६ लाखांची दंडात्मक कारवाइ आरटीओने केली आहे. एकूण २ हजार २०५ वाहनधारकांवर ही कारवाइ करण्यात आली आहे.
वाहनाला १५ वर्षे पूर्ण झाल्यास शासनाचा पर्यावरणकर भरणे आवश्यक आहे. अन्यथा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहनचालकांकडून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यासोबतच दंडदेखील आकारण्यात येत आहे. विहीत मुदतीत पर्यावरणकर भरल्यास दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षांकरिता 2 हजार रुपये, तर चारचाकी (पेट्रोल) 3 हजार रुपये व डिझेल वाहनांसाठी 3 हजार 500 रुपये तसेच रिक्षासाठी 750 रुपये पर्यावरणकर म्हणून आकारला जातो.
जुन्या वाहनांचा पर्यावरणकर भरून घेताना त्या वाहनामुळे प्रदूषण होत आहे किंवा नाही याची खात्री करून घेतली जाते. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठीचे निकष ते पूर्ण होत असतील तरच हा कर भरून घेतला जात आहे.
डिसेंबर महिन्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही जणांनी पर्यावरण कर न भरल्याचे आढळले त्यांच्यावर नियमानुसार कारवाइ करण्यात आली. डिसेंबर महिन्यात एकूण 23 हजार 770 रुपये पर्यावरणकर व दंड 29 हजार रुपये असा सुमारे 52 हजारांचा कर वसूल करण्यात आला होता. सध्या ही संख्या ५६ लाख १२ हजार रुपयांवर पोचली आहे. तर २ हजार २०५ वाहनांवर ही कारवाइ करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.
१५ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांसाठी पर्यावरण कर आकारला जात आहे. या वाहनाद्वारे प्रदुषण होऊ नये असा उद्देश आहे. असा कर न भरणाऱ्यांवर कार्यालयाच्या वतीने कारवाइ केली जात आहे. – अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.