बंगळुरू – भारतीय जनता पक्षाच्या अच्छे दिनाच्या दाव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे जेडीएस पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. काल संघाचे प्रमुख पदाधिकारी दत्तात्रय होसबाळे यांनी देशात गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता वाढत असल्याबद्दल स्पष्टपणे चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यांकडे कुमारस्वामी यांनी ट्विटरद्वारे लोकांचे लक्ष वेधले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच सरकारला आरसा दाखवला आहे. देशातील 20 कोटी लोक दारिद्य्रात ढकलले गेले आहेत आणि देशातील चार कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत असे जर होसबाळेच म्हणत असतील तर गेल्या सात वर्षात देशात नेमके कोण श्रीमंत झाले आणि या सरकारचा नेमका लाभ कोणाला झाला याचा विचार करण्याची वेळ आली आहे. देशातील जनतेच्या मनातील असंतोष आणि खदखद दिवसेंदिवस वाढत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.