कुरकुंभ -दौंड तालुक्यातील अर्थकारणाला गती देणाऱ्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीचा मोठा वाटा आहे, त्यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी परिसरात वाहतूक, दळणवळण, व्यवसायाची चाके गतिमान झाली आहेत. येथील परिसरात सुमारे 7 हजारांच्या आसपास खोल्या आहेत. मात्र, लॉकडाऊननंतर चार महिन्यांत 50 टक्के खोल्या धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे घरमालकांना साडेतीन कोटी रुपयांचा भुर्दंड बसला आहे, तसेच यावरील आधारित बॅंका, व्यावसायिकांना झळ बसली आहे. ही स्थिती आणखी वर्षभर तरी राहणार आहे.
करोना विषाणूने देशभरात थैमान माजविल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. यात जीवनच्रक ठप्प झाल्याने अनेकांच्या रोजगाराच्या संधी बंद झाल्या आहेत. महामारीच्या भीतीने गलितगात्र झालेल्या अनेक परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. काही महिन्यांत हजारो परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे, त्यामुळे परिसरातील अनेक खोल्या ओस पडल्या असून, शेकडो घरमालकांना यामुळे आर्थिक झळ बसली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) परिसरात 1993 मध्ये एमआयडीसी स्थापन झाली, त्यामुळे तालुक्याचा आर्थिक चेहरामोहरा बदलून गेला. औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला येणाऱ्या कामगारांना वास्तव्यास खोल्या मिळाव्यात, यासाठी स्थानिक नागरिकांनी विविध बॅंका, पतसंस्थांकडून कर्ज काढून खोल्या बांधल्या आहेत. यातून घरमालकांचे अर्थकारण गतिमान झाले आहे. मंदीच्या वातावरणातही घरमालकांची स्थिती सक्षम होती. मात्र, करोनाचे वादळ घोंगावल्यानंतर परप्रांतीयांच्या जीवावर सुरू असलेली घरमालकांची रोजीरोटी मंदावली आहे. किराणा दुकान, बॅंका, वित्तीय संस्थांचे व्यवहारचक्र थंड पडले आहे. 24 मार्चपासून कुरकुंभची दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून गेली आहे.
साधारणपणे एका खोलीला 2 हजार रुपयांच्या आसपास, तर 2 किंवा 3 रूमला 3 हजार 500 रुपये इतके भाडे मिळत आहे. मात्र, यातील 50 टक्के रूम रिकाम्या पडल्या आहेत, त्यामुळे घरमालक धास्तावले आहेत. खोल्या बांधण्यासाठी अनेक घरमालकांनी पतसंस्था व बॅंकांकडून कर्जांची उभारणी केली आहे. हे कर्ज कसे फेडायचे, याचीच चिंता घरमालकांना भेडसावत आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगार किंवा परगावातून आलेल्या कामगारांना कुरकुंभ परिसरात राहण्याची व्यवस्था चांगली आहे. अनेकांनी परिसरात खोल्या बांधल्या आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांचे स्थलांतर झाल्याने काही खोल्या ओस पडल्या आहेत. माझ्या स्वतःच्या 80 खोल्या आहेत. त्यापैकी 40 ते 50 खोल्या रिकाम्या आहेत. त्यामुळे घरभाड्यातून जे आर्थिक उत्पन्न मिळत होते, ते आता कमी झाले आहे.
– विशाल झुंबर जाधव, घरमालक, पांढरेवाडी.