ज्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्यांचा मला अभिमान आहे… हे विधान आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे. ते आज जवळपास 28 वर्षांनी आठवण्याचे कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षात साक्षात शिवसेना भवनासमोर झालेला राडा.
तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण, राम जन्मभूमी न्यासच्या जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार प्रकरणात आपचे संजय सिंह यांनी आरोप केला. तसाच आरोप समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केला. मात्र, त्यांच्या कार्यालयापुढे ना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले. ना त्यांनी आंदोलन केले.
मग, त्या व्यवहाराबाबत संबंधितांनी बोलावे, मोदी यांनी त्याची चौकशी करावी, ही सामनातून झालेली मागणी भाजपा नेत्यांना का झोंबावी? शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिवसेना भवन पुढे निदर्शने करायचे धाडस भारतीय जनता पक्षाने दाखवले याची दोन कारणे.
पहिले म्हणजे काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका. भारतीय जनता पक्षाच्या मनात महापालिकेवर कमळ फुलावायचे स्वप्न कायम राहिले आहे. आम्ही तुम्हाला पराभूत करू शकतो. हे त्यांनी जवळपास शिवसेनेएवढ्याच जागा जिंकून गेल्यावेळी दाखवून दिले आहे. 1993 च्या दंगलीत मुंबईची झालेली होरपळ मुंबईकर आजही विसरला नाही.
सामान्य माणसाला वाचवण्यासाठी रस्त्यात शिवसैनिक उतरला नसता, तर आणखी होरपळ झाली असती. ही मुंबईतील तमाम हिंदू बांधवांची भावना आजही काही प्रमाणात कायम आहे. तसेच शिवसेनेचा आजही मुंबईत दरारा कमी झाला असला, तरी कायम आहे.
शिवसेनेचा हा दरारा संपवल्याशिवाय आपण महापालिकेत आजही सत्ता मिळवू शकत नाही, याची जाणीव भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांना नक्की असणार. त्यामुळे शिवसेना भवन पुढे निदर्शने केली, तर हा दरारा संपेल आणि समजा जर शिवसैनिकांनी हल्ला केला तर कायद्याचे राज्य राहिले नाही, अशी हकाटी पिटत राज्य सरकार बरखास्त करायची मागणी करता येईल, अशी ही योजना असावी.
राज्य सरकारमधील राजकीय चाणाक्षांनी हा डाव ओळखला असावा आणि हा मोर्चा शिवसेना भवनाच्या अलीकडेच अडवला. मात्र तरीही काही कार्यकर्ते पोलिसांचे बॅरिकेड तोडून शिवसेना भवनच्या दिशेने धावले आणि हाणामारीला सुरुवात झाली. त्यात मुळातच आक्रमक असणाऱ्या शिवसैनिकांचा आवेश नक्कीच जास्त असणार हे निश्चित.
बाळासाहेब वारल्यानंतर निवडणूक प्रचारात “मी शिवसेनेविषयी काही कटू बोलणार नाही’, असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला शिवसैनिकांच्या या भूमिकेविषयी एवढा संताप करायचे कारण काय? याचे कारण शिवसेना आज विरोधात गेली एवढ्या पुरतेच मर्यादित नाही. त्याचे कारण प. बंगालमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही दडले आहे. तेथे आक्रमक प्रचार करूनही भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तोंडावर आप आणि समाजवादी पक्षाने रामजन्मभूमी मंदिरातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर काढल्याने भाजपा अडचणीत आली हे खरेच. पण, समाजवादी आणि आप या दोन्ही पक्षांना हा मुस्लीम लांगूलचालनाचा प्रकार आहे. रामलल्लाच्या मंदिराला विरोध करून आणखी किती खालची पातळी गाठणार, असा उलट प्रचार त्यांना करता आला असता. पण…
या पण मध्येच शिवसेनेच्या विरोधाने भारतीय जनता पक्षाच्या संतापाचे कारण दडले असावे. कारण बाबरी मशिदीच्या पतनानंतर ज्यावेळी सर्व तथाकथित हिंदुत्ववादी नेते ही तोडफोड शिवसेनेने केली, असे सांगत स्वत:ची कातडी बचावण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, “बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे.’ त्यामुळे शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वावर शंका घेणे कोणालाही शक्य नव्हते. त्यामुळेच या मुद्द्यावर शिवसेनेला बदनाम करणे या हेतूने हा मोर्चा काढला होता. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेला ही वसंत सेना किंवा कॉंग्रेस सेना अशी टीका प्रजा समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट करत असत. त्याचीच आवृत्ती म्हणजे सोनिया सेना नावाने फडकावलेले फलक.
आता या मुद्द्याची दुसरी बाजू…
2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे झाल्यास मोदी यांच्या विरोधात हिंदुत्ववादी चेहरा समोर आणण्याची गरज आहे, असा एक मतप्रवाह व्यक्त होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी विरोधातील उमेदवार म्हणून आणण्याची रणनीती आखली जात आहे. पण त्यांच्यावर पुन्हा मुस्लीम लांगुलचालन करणाऱ्या नेत्या, असा आक्षेप घेतला जाऊ शकतो.
तोच चेहरा उद्धव ठाकरे असेल तर असा आक्षेप घेता येणार नाही. शिवसेनेने मध्यंतरीच्या काळात पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरे कसे सक्षम आहेत, याबाबतचे लेख काही दैनिकांत प्रकाशित केले होते. त्याचाही धसका भाजपाने घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ठाकरे यांचा असणारा हिंदुत्ववादी चेहरा विद्रुप करण्याचे प्रयत्न सुरू झाले असावेत, अशीही चर्चा राजकीय विश्लेषक करत आहेत.
सलग तीस वर्षे असणाऱ्या युतीला तडे गेले. आम्हाला गुलामासारखे वागवल्याचे शिवसेना सांगत आली. त्यामुळे या दोन्ही पक्षात असणारे मतभेद सत्तेत असतानाही काही लपून राहिले नव्हते. सत्तेचा उपयोग शिवसेना वाढण्यासाठी होणार नाही, याची दक्षता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्याचा वचपा शिवसेना प्रत्येक ठिकाणी काढत आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या वापराचा प्रयत्नही झाला. मात्र शिवसेना काही बधली नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाले नाही, तर सहयोगी पक्ष लागतील या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी खास 30 मिनिटे चर्चा केली, असे राजकीय निरीक्षकांत बोलले जात होते. त्या पार्श्वभूमीवर, बुधवारच्या हाणामारीकडे पाहावे लागेल. त्यावेळी महापालिका ताब्यात घेऊन शिवसेनेची आर्थिक सत्ता कमकुवत करायची. त्याचवेळी हिंदुत्ववादी मतदारांचा असणारा पाठिंबा काढून घेण्याचा प्रयत्नही करायचा अशी दुहेरी चाल होती, असेही मानले जाते.
जाता जाता…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्याच्या बातम्यांना न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रात पुरेसे स्थान मिळू नये आणि हे आंदोलन बारगळावे, यासाठीच ही हाणामारी घडवली अशी शंकाही काही शंकासूर व्यक्त करत आहेत. अर्थात प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा, त्याला आपण काय करणार?
श्रद्धा गोखले