8 डिसेंबर 2021 हा दिवस सैन्यदलासाठी अपरिमित हानीचा काळा दिवस मानला जाईल. सरसेनाध्यक्ष बिपिन रावत जे सैन्यदलात “बिरा’ या टोपण नावाने ओळखले जायचे, ते व पत्नी मधुलिका यांच्यासह अजून इतर जणांच्या आयुष्यावर काळाने अचानक झडप घातली. या भीषण अपघातात झालेली मानवी हानी हे देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान तर आहेच पण प्राणांची आहुती दिलेल्या या योद्ध्यांसारखे दुसरे कोणी होणे नाही, हेही तितकेच सत्य आहे. याच अपघातात लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह हेसुद्धा होते. त्यांच्याविषयीच्या आठवणी…
सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांना गमावणे म्हणजे शरीराचा एखादा महत्त्वाचा अवयव गमावण्यासारखे आहे. त्यांच्या बलिदानाबरोबरच त्यांच्या कन्यारत्नांवर कोसळलेले डोंगराएवढे दुःख कल्पनातीत आहे. लहान वयात मातृ आणि पितृ छत्र एकाच वेळी गमावणे याहून मोठे दुःख ते कोणते!
या हादरवणाऱ्या घटनेबरोबर त्यात त्यांच्यासोबत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांच्या आठवणींचा चित्रपट नजरेसमोर आला. लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह आणि त्यांचे कुटुंब मागच्या वर्षी आमच्याबरोबर भटिंडाला होते. त्यांची पत्नी हरजिंदर यांची आणि माझी तशी थेट ओळख नव्हती; पण भटिंडा छावणीतल्या पाच मॉंटेसरी शाळांपैकी एका शाळेत मी शिक्षिका होते आणि अशाच एका शाळेच्या त्या मुख्याध्यापिका होत्या.
सर्वांत प्रथम आमची भेट मी जेव्हा शाळेच्या नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेले होते तेव्हा झाली कारण त्या मुलाखत घेणाऱ्यांपैकी एक होत्या. खरेतर तेव्हा आम्ही अगदी काही मिनिटांसाठी भेटलो होतो; पण तेव्हाच त्यांचे मृदू बोलणे, साधे राहणे या गुणांमुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी आपोआपच आदर निर्माण झाला होता. त्यानंतर शाळेच्या निमित्ताने अनेकदा आम्ही भेटत असू.
शिवाय आमची घरे एकाच कॉलोनीत होती त्यामुळे संध्याकाळी फिरायला जाताना देखील नेहमी आमची गाठभेट होत असे. मी नेहमी बघायचे, त्या आपल्या कुत्र्याला फिरवायला नेत आणि नंतर स्वतः देखील काही वेळ धावत आपला व्यायाम करत. घामाने डबडबलेल्या असल्या तरी भेटल्या की चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असे. त्यांच्या या फिटनेसचे रहस्य नंतर कळले, की त्या स्वतः देखील पूर्वी सैन्यदलात अधिकारी होत्या.
शाळेची नोकरी चालू असतानाच काही दिवसांनी त्यांच्या यजमानांचे पोस्टिंग आले आणि त्यांना आठ एक दिवसातच दिल्लीला रवाना व्हायला सांगितले. हातात वेळ कमी आणि पत्नीच्या शाळेच्या नोकरीमुळे कुटुंबाला लगेच बरोबर नेणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे अर्थातच घराची आणि पॅकिंगची संपूर्ण जवाबदारी हरजिंदर यांच्यावर आली. पण अशा वेळी परिस्थितीचा जराही बाऊ न करता त्या लगेच कामाला लागल्या.
मुळातच शूर आणि स्वावलंबी असल्यामुळे हरजिंदरने सामानाच्या पॅकिंगपासून घर, गॅस कनेक्शन स्वाधीन करणे ते अगदी ट्रक बोलावून ट्रकमध्ये सामान व्यवस्थित लोड होतंय की नाही हे बघणे हे सगळे लीलया पार पाडले. त्यानंतर मुलीला घेऊन त्या एकट्या दिल्लीला रवाना झाल्या. त्यांच्या या धाडसी स्वभावाचे करावे तितके कौतुक कमीच होते.
मन विषण्ण करणारी ही घटना घडल्यापासून मात्र त्यांचा चेहरा सतत माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. कितीही हिमतीची स्त्री असली तरी नवऱ्यावर काळाने अचानक केलेल्या आघाताचे हे दुःख ती कशी पेलणार हेच विचार मनात येत राहिलेत. असे अधिकारी आणि त्यांची बरोबरीने साथ देणाऱ्या त्यांच्या शूर पत्नी आणि कुटुंबीय वेगळेच जन्माला येत असावेत बहुतेक.
लेफ्टनंट कर्नल हरजिंदर यांना एक धाकटा भाऊ आहे आणि तोही सैन्यात आहे. त्यांचे वडीलही सैन्यात होते. त्यांच्या वडिलांचे निधन तसे लवकर झाले आणि दुर्दैवाने त्यांच्या पाठोपाठ लगेचच 50 दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले. दोघेही भाऊ तेव्हा अगदी तरुण होते त्यामुळे आईवडिलांच्या निधनाचा धक्का पचवणे तसे त्यांच्यासाठी अवघड होते. पण परिस्थितीसमोर हार न मानता दोघे भाऊ जिद्दीने सैन्यात भरती झाले. सध्या त्यांचा धाकटा भाऊ त्यांच्या वडिलांनी नेतृत्व केलेल्या युनिटचेच नेतृत्व करत आहे.
एक विमान किंवा हेलिकॉप्टर गमावणे म्हणजे काही लाख किंवा करोड रुपयांचे नुकसान असेल फार तर, जे आज ना उद्या भरून निघू शकते, पण एक सैनिक गमावणे म्हणजे कित्येक वर्षांचे, अपरिमित मेहनतीचे, अगणित परिश्रमांचे, अनमोल ध्येयासक्तीचे भरपाई न होणारे नुकसान आहे…
अशा शूर सैनिकांना रणांगणावर वीरमरण येण्याऐवजी अशा दुर्दैवी घटनेमध्ये प्राण गमवावे लागले याची चुटपुट सदैव मनाला लागून राहील. शहीद झालेल्या सर्व अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांना देव हे दुःख पेलण्याची आणि त्यातून वाट काढण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.
– सायली साठे-वर्तक