वैशाखाचा तप्त उन्हाचा वणवा भडकतो. अशावेळी एखादी गार वाऱ्याची झुळूक देखील हवीहवीशी वाटते. तापलेल्या मनाचंही असंच असतं. त्यालाही अशी शब्दरूपी झुळूक हवीशी वाटते. आज बऱ्याच दिवसांनी अशाच शब्दांच्या झुळुका गोळा करतेय. अव्यक्तात साठलेलं असं व्यक्त करण्यासाठी.
कधीकधी ना, मनाचे सारे सांदीकोपरे पिंजून काढावेत, कोने झाडावेत, कपारी झटकाव्यात आणि पाहावं आडोशाला उभे राहून. वळचणीला जमलेले पारवे जसे घुमतात ना? तसेच या मनाच्या सांदीकोपऱ्यांत लपलेले अनेक शब्दपारवे घुमू लागतात आणि मग मी मांडत जाते शब्दांचा जिगसॉ…
वैशाखातल्या तप्त दुपारी उन्हातून भटकताना रस्त्याच्या कडेला उभा एखादा पलाश, गुलमोहर अगर बहावा नजरेला सुखावतात. मनावर थंडगार झुळकीचं गारूड करतात अगदी तसंच असतं या शब्दांचं गारूड… फक्त शब्दच नाहीत तर जगण्यातला प्रत्येक छोटा मोठा अनुभवलेला क्षण गारूड करतो. मनाला जरा खळखळ विसळून निथळवता यायला हवं. प्रामाणिकपणे, कोणतीही भिडभाड न ठेवता स्वत:ला फेकूनही देता यायला हवं. स्वत:तील रितेपण मांडताना शब्दांचे टोचणारे कोपरे घासून घ्यायला हवेत, गुळगुळीत करता यायला हवेत. इतके स्वभावाचे मोकळेपण तर हवंच हवं. आपलं स्वत्व ही फार सुंदर अभिव्यक्ती आहे. ती प्रत्येकाने आपल्याला हवी तशी फुलवावी. जे आपल्याला आवडतं त्या छोट्या छोट्या गोष्टी देखील मनाला हुरूप देतात. या अशा छोट्या छोट्या गोष्टींनाच मी “वैशाख सरी’ म्हणते.
मी एक कथा लिहिली होती. कथेची नायिका होती एक घराची स्वच्छता तसेच इतर घरगुती जसे की, धुणी भांडी वगैरे करणारी बाई, जी इतर चार चौघींसारखी असूनही भरभरून आयुष्य जगते. ते या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी अनुभवूनच. आता प्रश्न हा आहे की, मी ज्यांना वैशाख सरी म्हणतेय त्या गोष्टी नेमक्या काय आहेत? तर, ज्या गोष्टी केल्याने आपला स्ट्रेस रिलीफ होतो, मनावरचा ताण हलका होतो, अशा गोष्टी आणि त्या म्हणजे हिरवळीवर अनवाणी चालण्यापासून ते लॉन्ग ड्राइव्हपर्यंतची, ज्यातून मन ताजंतवानं होईल अशी कोणतीही गोष्ट. त्याच त्याच सततच्या रुटीनला रोजच्या त्याच त्या माणसांना, गोष्टींना सामोरे जाताना मन थकून जातं बरेचदा. अशावेळी मनाला वेगळ्या वळणावर घेऊन जाणंच खऱ्या अर्थाने गरजेचं असतं.
भरभरून जगलेल्या क्षणांच्या वैशाख सरी तना-मनाचा दाह शांत करतात. उन्हाळ्याच्या काहिलीत फुलणारे गुलमोहर, बहावा, निलमोहर, आकाशनिम मनाला त्यांच्या बहरानं, रंगानं, सुवासानं मोहरून टाकतात. उन्हाच्या त्या काहिलीत देखील त्यांच्या बहरलेल्या पालवीने त्यांच्या पाकळ्यांच्या अलवारतेने सारा उन्हाचा तडाखा शांत होतो. मनानं जपलेल्या काही आठवणीच काही क्षणांचंदेखील असंच असावं. बहुतेक म्हणून त्यांच्या हलक्याशा शिडकाव्यानंही मनाचा दाह कमी होतो. आयुष्याची धावती गाडी कायमच चौथ्या गिअरवर ठेवायची काहीच आवश्यकता नसते खरंतर. जाणारे क्षण कधीच परतून येत नाहीत. म्हणून हा प्रत्येक क्षण रंगवावा आपल्या आवडीनुसार.
असे क्षण म्हणजे इंधन, ऊर्जा असतात जे आयुष्याला गती मिळवून देतात नव्या स्वप्नांना, ध्येयांना ऊर्जा देतात. जगणं सुखावह बनवतात. खूप काही असतं करण्यासारखं. आपण मात्र कारणांच्या बाहुल्या चिकटवत बसतो. कितीतरी स्वप्नं प्रत्यक्षात उभी राहतात ती या वैशाख सरींना मनात रुजवल्यामुळेच. मग ती आदिवासी पाड्यांवर आयुष्य जगलेल्या आमटे कुटुंबाची असोत की आजही एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकरी कुटुंबाची असो. आपल्या छंदाचे रुपांतर आर्थिक मिळकतीत करणारे कितीतरी जण आपण आजूबाजूला बघतो, तेव्हा मला त्यांचे खूप कौतुक वाटते. बेरोजगारी, गरिबी यांचा बागुलबुवा अशा व्यक्ती झुगारून देतात आणि वेगळ्या वाटेवर चालताना स्वत:लाच एक आदर्श म्हणून सिद्ध करतात.
आजची तरूण पिढीही आता नोकरीची मळलेली वाट न धरता अशा वेगळ्या वाटांवर चालायचा प्रयत्न करताना दिसते तेव्हा अभिमान वाटतो त्या पोरांचा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आई-बापांचादेखील. जे आपली स्वप्नं आपल्या पोरांवर न लादता त्यांना फुलपाखरासारखं फुलू देतात. असे आई-बापदेखील त्यांच्या पोरांच्या आयुष्यातल्या वैशाख सरीच जणू. “कालिंदी’ नावाची जगन्नाथ कुंटे लिखित कादंबरी आहे, ज्यातली नायिका कालिंदी ही सर्वसामान्य संसारी बाई, जगण्याच्या एका वळणावर निर्णय घेते, नंतर संन्यासिनी होते आणि आपल्या अनुभव, आत्मियता आणि कष्टाच्या जोरावर एका पूर्ण मागासलेल्या तालुक्याचा कायापालट करते. सारंच विलक्षण. ती कथेतली कालिंदी काय किंवा नर्मदा मैथ्याच्या पुनरूजीवनाची स्वप्नं पाहणाऱ्या मेधा पाटकर काय; त्या परिस्थितीतल्या वैशाख सरीच.
कधी भर उन्हात बाहेर पडलात, तर रस्त्याच्या कडेला फुललेला एखादा बहावा, पळस किंवा गुलमोहर नक्की पाहा. आपल्या तजेलदार मोहरलेल्या बहरांची स्वप्ने घेऊन फुललेला तो एकसी बहावा, वाऱ्याच्या एका झुळकीबरोबर टपटपणारी त्याची फुले अलगद मातीत रेखतो. त्या फुलांच्या सकवार बहराचा थंडावा मातीला मिळतो. हा थंडावा देताना ती फुलं सुकण्याचा विचार करत नाहीत. तापलेल्या, उसासणाऱ्या धरतीला पाहून कोणी प्रवासी मेघ थपकतो. धरणीची आर्तता समजून घेऊन आपल्याकडच्या क्षणांचा, भर वैशाखातल्या एखाद्या तप्त दुपारी वर्षाव करतो. हा अमृत थंडावा म्हणजेच वैशाख सर. मग ती पावसाची असो, एखाद्या आशेची असो, आनंदी क्षणाची असो की, आवडत्या व्यक्तीच्या सहवासाची असो. या सरींत चिंब भिजावे आणि साजरे करावेत क्षण.
– मानसी चिटणीस