अमोल मतकर
संगमनेर -संगमनेर शहरासह तालुक्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून तालुक्यातीलच नव्हे तर अकोले, आळेफाटा, मंचर, सिन्नर भागातील अल्पवयीन मुलींना शहरातील लॉजवर घेऊन येत अत्याचार केल्याच्या घटना अनेक वेळा उघड झाल्या आहेत. शहरातील बरेच लॉज पोलिसांच्या हिट लिस्टवर आहेत. तसेच अनेक लॉजचे नाव गुन्ह्यात उघड झाले असून आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने त्यांना कुणाचा राजकीय पाठिंबा आहे का, असा प्रश्न सुज्ञ पालकांना पडला आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेत अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. अकोले तालुक्यातीलही एका मुलीवर संगमनेरातल्या लॉजवर अत्याचार केल्याची घटना ताजी असताना लॉज मालक अल्पवयीन मुलींना आत आणण्याची परवानगी कसा देऊ शकतो. त्याच्यावरही कठोर कारवाई व्हावी तसेच त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, असा सूर नागरिकांतून निघत आहे.
संगमनेर शहर तसेच उपनगरात अनेक लॉज आहेत. या लॉजवर कॉलेजचे मुलेमुलींची येण्याची संख्या जास्त प्रमाणात आहे. आपल्यामुळे कुणाचे आयुष्य बरबाद होऊ नये याची काळजी लॉज मालकाने घ्यावी तसेच पोलिसांनी वेळोवेळी या लॉजची चौकशी करून त्याठिकाणची तपासणी करावी, जेणेकरून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल.
फक्त गैरकृत्य करणारे तरुणच नाही तर महाविद्यालयीन मुले-मुली यांचे लॉजवर येण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. कमी तासासाठी हजार रुपये घेऊन लॉज मालक त्यांना खोली उपलब्ध करून देतो. प्रेमाची फूस लावून ग्रामीण भागातील तसेच बाहेरगावच्या अल्पवयीन मुलींना घेऊन येत त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतो. ज्यावेळी गुन्हे दाखल होतात त्यावेळी मात्र लॉज मालकावर कारवाई होत नसल्याने असे बेकायदेशीर कृत्य वारंवार घडत असते.
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. यामध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून, या प्रकारचे गुन्हे पालकांसोबत पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत.
असे लॉजकायमचे बंद करा
-लॉज मालक पैशाच्या हवासापोटी एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य अंधारात ढकलण्यात सामील होतो. त्यामुळे जे लॉज मालक अल्पवयीन मुलींना लॉजवर परवानगी देत असेल असे लॉज कायमचे बंद करून मालकांवर ही कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलिसांनी वेळच्या वेळी लॉजची तपासणी करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत.