परमेश्वर कधी कधी पराकोटीचा निष्ठुर का होतो तेच कळत नाही. मी अनुभविलेली सहा वर्षांपूर्वीची ही घटना…
गेल्या आठवड्यात मी राहत असलेल्या परिसरातील गणपती मंदिरासमोर मंडप उभारण्याचे काम सुरू झाले होते. माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती असते. यंदाच्या गणेश जयंतीनिमित्त हे काम चालू होते. याच तिथीला सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली नियतीने माझ्या कुटुंबीयांवर केलेल्या निष्ठुर आघाताची आठवण झाली.
मनाने पार कोलमडून गेलो. मनाच्या वटवृक्षावर असंख्य आठवणींच्या मधमाश्यांनी तयार केलेल्या मोहोळावर एखाद्याने दगड भिरकावल्यामुळे सैरावर धावत सुटलेल्या मधमाश्यांप्रमाणे मनाची अवस्था झाली. त्या पोळ्यामधून बाहेर पडलेल्या, डिवचल्या गेलेल्या मधमाश्या हळव्या काळजाला अधाशासारख्या डसू लागल्या. तो दिवस जसाच्या तसा डोळ्यांसमोर साकारला.
सहा वर्षांपूर्वी याच तिथीला माझं चाळीस वर्षाचं लेकरू हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाच्या बंद दरवाजाच्या पलीकडे साक्षात मृत्यूशी झुंज देत होतं. हॉस्पिटलमधील निष्णात डॉक्टरांची टीम माझ्या पाडसाला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होती. यश मिळाले नाही. माझं लेकरू आम्हाला दुख:सागरात लोटून निघून गेलं. ज्याला चाळीस वर्षे तळहातावरच्या फोडासारखे जपले होते, त्या माझ्या बछड्याने याच दिवशी शेवटचा श्वास घेतला.
त्या दिवशी माझ्या निवासस्थानाच्या परिसरात गणेश जयंतीनिमित्त मांडव घातला होता. लेकराला निरोप देताना प्रत्येकाच्या मनाला एकच प्रश्न भेडसावीत होता, कधीकधी परमेश्वर एवढा का बरे निष्ठुर होतो? लेकराच्या आठवणीने जेव्हा जेव्हा काळीज गलबलून जाते तेव्हा तेव्हा कित्येक वेळा मनाची अवस्था समुद्रातील वादळात भरकटलेल्या होडीसारखी होत राहते. त्या होडीवर मी स्वार झालेला असतो. निराश झालेले विषण्ण मन बिथरून जाते. मनाच्या भरकटलेल्या अवस्थेत नजरेसमोर वरील प्रश्न दिसू लागतो. उत्तर असे मिळतच नाही. थकून भागून विदीर्ण तथा विषण्ण अवस्थेत गेलेले मन कधीतरी झोपेच्या आधीन होते.
गेली सहा वर्षे अधूनमधून मनाची अवस्था अशीच होत होती. गेल्या आठवड्यात गणेश जयंतीसाठी टाकला जाणारा मंडप पाहूनही अगदी हेच घडले. लेकराची आठवण झाली. मनभूतकाळाच्या अवाढव्य पोकळीत शिरले. त्याचा जन्म, नामकरण विधी, त्याच्या शाळेचा पहिला दिवस, त्याच्या कॉलेजचे दिवस, त्याने पदवी प्राप्त केली तो दिवस, त्याच्या विवाहाचा सोहळा असे कितीतरी प्रसंग ओल्या डोळ्यांपुढे उभे ठाकले. अनेक प्रकारच्या घटनांची मालिका संपली ती त्याने शेवटचा श्वास घेतला त्या प्रसंगाने. हव्याहव्याशा वाटणाऱ्या तर काही जीवघेण्या आठवणींमुळे थकून गेलेले मन झोपेच्या आधीन कधी झाले ते कळलेच नाही.
उत्तररात्री अचानक जाग आली ती माझं लेकरू स्वप्नात आल्यामुळे. स्वप्नात घराच्या दारावरील बेल कुणीतरी वाजवत होतं. कोण आलंय ते पाहण्यासाठी मी दरवाजा उघडला तेव्हा लेकरू दाराबाहेर उभं होतं. बाबा, मी ठीक आहे. काळजी करू नका. तब्येत सांभाळा. एवढंच म्हणालं आणि पायऱ्या उतरून निघून गेलं. स्वप्नच होतं ते. भानावर येऊन मी घड्याळ पाहिलं. पहाटेचे पावणेचार झाले होते. उठून समोरची खुर्ची ओढून मी टेबलाशी बसलो. समोरचा कागद ओढला. त्यावर एक एक शब्द आपोआपच पाझरू लागला.
माणसाचं आयुष्य म्हणजे काही निसटत्या क्षणांची गोळाबेरीज. मिटल्या डोळ्यांनी जे केलं ते भरल्या काळजाने बोलणं म्हणजे जीवनाचं सार. भूतलावर जन्म घेणारा प्रत्येकजण एक जळता दिवा असतो. वादळाला कुठवर तोंड देणार? आयुष्याच्या खडतर मार्गावरून प्रत्येकालाच जावं लागतं. क्षितिजापर्यंत. खरं म्हणजे क्षितीज भेटेपर्यंत कुणीही जाऊ शकत नाही. किंबहुना क्षितीज ही एक संकल्पनाच मृगजळासारखी आहे. आपण सारे कठपुतळी बाहुल्या आहोत. दोरी त्या विधात्याच्या हातात. तो म्हणेल तसं आणि त्याच्याच तालावर नाचायचं. आल्या प्रसंगाला तोंड देत राहायचं. जगत राहायचं. चालत राहायचं.
एखादी संध्याकाळ अशीच येईल. साऱ्या भावना उबगलेल्या असतील घराबाहेर पडायचा कंटाळा आलेला असेल. स्वत:च्या खोलीतला दिवा मालवून गप्प पडून राहावेसे वाटेल. रिकामे मन नको नको त्या विचारांनी भरून जाईल. बरे वाईट सुख आणि दु:खाचे अनेक प्रसंग काळजाभोवती पिंगा घालू लागतील. काळीज गलबलून जाईल. डोळे आपोआपच ओघळू लागतील. एखादा अनावर हुंदका दबलेल्या ओठांमधून बाहेर पडू पाहील. व्रणाव्रणातून जखमा जाग्या होतील. जीवनात एखादी भयानक पोकळी निर्माण झाल्याचा भास होत राहील. मग वैफल्याचे वारेही वाहू लागतील.
सध्या मी याच अवस्थेतून जात आहे. पुत्र वियोगाचं दु:ख सहन होत नाही तरीही जगतोय. गणेश जयंतीच्या दिवशीच नव्हे तर कित्येकदा त्याचे पार्थिव डोळ्यांसमोर येते. ओठ थरथरू लागतात. पापण्या उडू लागतात. दोन्ही डोळ्यांच्या जड झालेल्या पापण्यांमधून वळीव बाहेर पडू पाहत असतो. मोठ्या कष्टाने मी त्याला अडविण्याचा प्रयत्न करीत राहतो. कुंद नजरेसमोर उभ्या ठाकलेल्या लेकराच्या निर्जीव देहाकडे एकटक बघत माझ्याच मनाची समजूत घालताना पुटपुटत असतो, राजहंस माझा निजला…
– बबन पोतदार