आपण प्राणिसंग्रहालयात अनेकदा पिंजऱ्यातील प्राणी पाहतो. या प्राण्यांना पिंजऱ्याबाहेरच्या लोकांकडे पाहून काय वाटत असेल? तुमच्या मनातही हा विचार आला असेल. माझ्याही मनात आला. मर्यादित जागेत आयुष्य कंठताना बाहेरचे लोक मुक्त जीवन जगत आहेत हे ते नक्कीच पाहात असतील. त्यांच्या मनात काय येत असेल? चीड, संताप, असूया की हताश होऊन परिस्थितीचा स्वीकार करण्याची भावना?
हे सांगणं अवघड आहे; परंतु मी याबाबत घरी पोहोचेपर्यंत खोलवर विचार केला. माझ्या असे लक्षात आले की, आपण त्या प्राण्यांपेक्षा काही फार वेगळ्या पद्धतीनं जगत नाही आहोत. मी घरात आल्यावर दार ओढून बंद केले तेव्हाच माझ्या लक्षात आले की आपणही आपल्या घराच्या पिंजऱ्यातच आलो आहोत. हल्ली तर मुख्य दाराबाहेर लोखंडी भक्कम जाळी असलेला आणखी एक दरवाजा असतो.
हा पिंजराच नाही तर दुसरं काय आहे? माणसांना संरक्षित ठेवण्याकरता प्राणी बंदिस्त असतात आणि आपण? आपण इतर माणसांपासून संरक्षित राहण्यासाठी आपल्या घररूपी-फ्लॅटरूपी पिंजऱ्यात राहात असतो! बंगलेवाल्यांच्या बाबतीत तर गेट ही आणखी या पिंजऱ्याची एक जाळी असते. म्हणजे आपण आणि प्राणिसंग्रहालयातले प्राणी दोघेही संरक्षित राहण्याकरता पिंजऱ्यात बंदिस्त असतो.
आपल्या घरातही अनेक खोल्या असतात. प्रत्येक खोलीला एक किंवा अनेक दरवाजेही असतात. हे दरवाजे आणि खोलीच्या भिंती यामुळे आपण मोठ्या (म्हणजे घराच्या) पिंजऱ्यामध्ये आणखी लहान पिंजरे निर्माण करतो. आपल्या बेडरूममध्ये झोपताना आपण मच्छरदाणी लावून झोपतो. याचाच अर्थ डासांपासून सुरक्षित राहण्याकरता आपण आणखी एक पिंजरा लावून त्यात आपण झोपतो.
याशिवाय सर्व खिडक्यांना दारं, ग्रील, पडदे आणि बारीक जाळीही (कीटकांपासून संरक्षणाकरता) बसवून घेतो. पाहा, आपण आपल्याला किती छोटे-मोठे पिंजरे आणि उप-पिंजरे लावून घेतो ते! अर्थात आपण हे सगळं पाऊस, वारा, थंडी या सगळ्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याकरताही करतो. पण यात एक गोची आहे. समजा, आपण उकाड्यापासून त्रस्त झालो असलो तर आपण दारं-खिडक्या उघडत नाही.तर दारं-खिडक्या बंद ठेवून पंखा चालू करतो. याचा अर्थ आपण उकाडा आणि थंडी यांपासून संरक्षण मिळण्यापेक्षा इतर माणसांकडून दूर राहण्याकरताच स्वत:ला कोंडून घेतो.
जी गोष्ट घराची तीच ऑफिसची किंवा कामाच्या इतर जागांची. या सगळ्या जागा अशाच बंदिस्त केलेल्या असतात. कशासाठी तर संरक्षणासाठी-वस्तूंच्या किंवा माहितीच्या. अगदी मोठी वाहनं अशीच बंदिस्त असतात.
अर्थात, या सगळ्याला अपवाद आहेतच. खेडेगावातले लोक घराबाहेर अंगणात झोपतात. मजूर आणि कामगार उघड्या ट्रकमधून प्रवास करतात. म्हणजेच त्यांना आपल्यासारखी-शहरी लोकांसारखी-इतर माणसांपासून (किंवा प्राण्यांपासूनही) तितकी भीती वाटत नाही. त्यांची घरं म्हणजे खरोखरीच पाऊस-वाऱ्यापासून संरक्षणाकरता असतात-माणसांपासून संरक्षणासाठी नव्हे.
आपण आपल्याभोवती कितीतरी कवचं निर्माण केलेली आहेत. हे सगळे एक प्रकारचे पिंजरेच आहेत. धन सुरक्षित ठेवण्यासाठी तिजोरीसारखे दृश्य पिंजरे आहेत तसेच पासवर्ड, पिन नंबर असे अदृश्य पिंजरेही आहेत. हे पिंजरेही आपलं धन आणि माहिती सुरक्षित ठेवण्याकरता आपण वापरत असतो.
एवढं सगळं करून तिजोरीतील रकमांच्या चोऱ्या तर होत आहेतच पण आपली माहिती हॅक करून अदृश्यपणे आपल्या खात्यातून परस्पर पैसे काढूनही घेतले जात आहेत. सर्वात सुरक्षित असा गणला गेलेला पिंजरा म्हणजे एटीएम मशीन. पण तोही अजिबात सुरक्षित नाही. दर काही दिवसांनी एटीएम मशीनच चोरून नेलं किंवा त्यातून लाखो रुपये काढून घेतले गेले अशा बातम्या वाचायला मिळतात.
शरीराचं संरक्षण करण्याकरता चिलखतासारखी कवचं तर राष्ट्राची सीमा सुरक्षित ठेवण्याकरता कुंपण-अतिसुरक्षिततेकरता विद्युतप्रवाहितसुद्धा-वापरात आहेतच. आता तर सीमासंरक्षणाकरता अभेद्य कवचाची निर्मिती झाली आहे. एखाद्या अज्ञात वस्तूनं किंवा व्यक्तीनं सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केलाच तर तो हाणून पाडण्याकरता अदृश्य आणि गुप्त कवच तयार केलं गेलं आहे. हे सर्व पिंजरेच आहेत. मला वाटतं माणसा-माणसांत सौहार्दाची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली तर बऱ्याचशा पिंजऱ्यांची आवश्यकता भासणार नाही.
श्रीनिवास शारंगपाणी