– किरण गुजर, बारामती
स्वर्गीय बबनराव गुजर यांनी सन १९५२ ते १९७३ पर्यंत व्यवसायीक नाट्यप्रयोगांचे बारामतीमध्ये आयोजन केले. त्यावेळी नाट्यप्रयोग हे अनेकांत खुले नाट्यगृह, शाम टॉकीज व दुर्गा टॉकीजमध्ये होत. नाट्यसाधना संस्थे मार्फतही अनेक नाटकाची निर्मिती करून राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविली. नाटकाच्या टोरेंटो येथील नाट्य प्रयोगाला साहेबांनी सर्वोतोपरी मदत केली, रिमांड होम कला विभागानेही निधी करिता नाटकाचे प्रयोग केले. १९७९ पासून नटराज नाट्य कला मंडळ या हौशी नाट्य संस्थेने, सांस्कृतिक कार्यात सहभाग घेतला.
१९८७ पासून ‘नटराज करंडक’ या एकांकिका स्पर्धांना मा. पवारसाहेबांनी सुरुवात करून दिली. आजही गेली ३५ वर्ष या अव्याहतपणे चालणा-या स्पर्धा आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री असतानाही साहेबांनी केले, एवढेच नव्हे तर नाट्य संस्था चालविण्यासाठी आवश्यक असणारी ससंस्थाना उपलब्ध करुन दिली. १९८७ मध्ये नगरपरिषदेने वसंतराव पवार नाट्यगृहाची निर्मिती केली व बारामतीला पहिले नाट्यगृह मिळाले. ते साहेबांच्या प्रेरणेनेच. नटराज नाट्य कला मंडळाने आतापर्यंत ५० मराठी व हिंदी नाटकांची निर्मिती केली व राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळविली.
राज्यनाट्य स्पर्धेमधील क-हाड केंद्रावर सलग पाच वर्ष पहिले पारितोषिक मिळविणारी ही एकमेव संस्था आहे. नटराजने राज्य नाट्य स्पर्धेत केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सागरा प्राण तळमळला या नाटकाची प्रशंसा झाली. मा. साहेबांनी ह्या नाटकाचा नाट्यप्रयोग नटराज मध्ये सहकुटुंब येवून पाहिला. यामधील सावरकरांच्या जीवनामधील अनेक प्रसंग पाहताना साहेब भावूक झाले होते. नटराजचे नाटक दिल्ली येथील वसंतनाट्य महोत्सवात साहेबांनी आयोजित करुन सर्व कलावंताना प्रोत्साहन दिले, एवढेच नव्हे तर प्रयोगानंतर सर्व कलावंताना स्वतःच्या घरी भोजना साठी निमंत्रित करून दिल्लीमधून विमानाने स्वतः बरोबर पुण्यापर्यंत प्रवासही घडवून आणला.
प्रायोगिक नाट्य चळवळीला प्रोत्साहन दिले पाहिजे, हौशी नाट्य संस्था जगल्या वाढल्या पाहिजेत म्हणून बारामतीमध्ये विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास योजने अंतर्गत नाट्य, नृत्य, गायन, वकृत्त्व शिबिरे घेतली जातात. २००२ पासून बारामतीमध्ये बारामती गणेश फेस्टीव्हल सुरु करण्यात आला त्याचा शुभारंभ ही साहेबांनीच केला तो आजही सुरु आहे. तर शास्त्रीय, उपशास्त्रीय संगिताचे कार्यक्रम व्हावेत या इच्छेतून शारदा संगीत महोत्सव २००५ पासून साहेबांनीच बारामतीमध्ये सुरु केला दिवाळी मध्ये दोन दिवस् ग. दि. मा. सभागृहामध्ये हे आयोजन केले जाते.
या महोत्सवामध्ये भिमसेन जोशी, पंडित राजन साजनमिश्रा, रसिद खान, कंकना बॅनर्जी, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे पर्यंत गायकांनी हजेरी लावली आहे. विद्या प्रतिष्ठानचे नाट्यगृह करुन त्यास ग.दी.मा. असे नाव दिले. यामधून स्व. ग. दी. माडगुळकरांवरील व साहित्यावरील साहेबांचे प्रेमच दिसून येते. शारदा व्याख्यानमालेमधून अनेक दिग्गजांची व्याख्याने दरवर्षी होत आहेत. तर सृजन महोत्सव व प्रतिबिंब व्याख्यानमाला कार्यक्रमातून नवोदित कलावंत व व्याख्याते यांना व्यासपीठ मिळाले आहे. नटराज नाट्य मंदिर, शारदानगरचे आप्पासो पवार नाट्यगृह व कविवर्य मोरोपंत नाट्यगृहे आता एकूण पाच नाट्यगृहे बारामतीत आहेत. यावरुन नाट्य, कला व सांस्कृतिक कार्याची बांधिलकी प्रतीत होते.
कविवर्य मोरोपंत २०० वी पुण्यतिथी, अचार्य अत्रे जन्म शताब्दी महोत्सव, मराठी कलावंत संगीत रजनी, वसंत कानेटकरांचा अमृत महोत्सवी गौरव समारंभ व त्यांच्या नाटकाचा महोत्सव बारामती मध्येच साहेबांच्या हस्ते उपस्थितीत झाला, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, शबाना आझमी, सुरेश वाडकर, अशोक हांडे, अमिताभ बच्चन यांच्याही बारामती भेटी झाल्या. सांस्कृतिक विविधता साधणारा भिमथडी महोत्सव, भगिनी मंडळाचा शारदोत्सव,
एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या सांस्कृतीक कार्यक्रमाच्या स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा तमाशा महोत्सव, नाट्य महोत्सव, भजन महोत्सव, किर्तन महोत्सव, उच्चस्तरीय नाट्य प्रशिक्षण शिबीर, व्यवसायिक नाटकाची नाट्यस्पर्धा अंतिम फेरी, अपना उत्सव दक्षिण-मध्य संस्कृती केंद्र उदयपूरचा मुखवटे नृत्य युध्दकला महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय स्तरावरील प्रि. आर. डी. सिलेक्शन कॅम्प हे सर्व कार्यक्रम बारामतीच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्वाचे घटक आहे.
स्वस्त नाटक योजनेच्या प्रयोगाच्या निमित्ताने अभिनेते स्व. विनय आपटे बारामती मध्ये राहिले. त्यावेळी त्यांनी बारामतीच्या सर्वच विकास कामांना भेटी दिल्या बारामतीच्या सर्वागीण विकासावर ते एवढे प्रभावित झाले की, त्यांनी साहेबांना पत्र लिहून त्यामध्ये नमूद केले की, साहेब मला माहित नाही कोकणचा कॅलीफोर्निया होईल की नाही, परंतू नजीकच्या काळात बारामतीची सिलीकॉन व्हॅली झालेली असेल. त्यांच्या या पत्रास साहेबांनी पत्रोत्तर देवून ऋणाबंध दृढ केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बारामती शाखाच्या माध्यमातून बारामतीच्या इतिहासामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची दोन नाट्य संमेलनाची नोंद झाली आहे. पवारसाहेब हे नाट्य परिषदेचे तहयात विश्वस्त आहेत त्यांच्या संकल्पने मधून १९९५ चे ७५ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे बारामतीमध्ये आयोजन करण्यात आले होते.
संमेलनाचे अध्यक्ष राजा गोसावी हे होते यावेळी बारामतीला नाट्यपंढरीचे रुप आले अनेक दिग्गज कलावंतांची या संमेलनात उपस्थिती होती. मच्छिंद्र कांबळी, डॉ. रवी बापट, दामू केंकरे, विद्याधर गोखले, डॉ. जब्बार पटेल, यमुनाबाई वाईकर, काळू-बाळू, चित्तरंजन कोल्हटकर, छोटा गंधर्व, शरद तळवळकर आत्माराम भेंडे या सर्वांचा सन्मान हे वेगळे वैशिष्ट संमेलनाचे होते. तर २०१२ मध्ये दुस-यांदा ९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलन बारामती मध्ये झाले. डॉ. मोहन आगाशे संमेलनाध्यक्ष होते.
संमेलनास सुमारे ३००० प्रतिनिधींची उपस्थिती होती. काटकोन त्रिकोन, शंभुराजे या नाटकांचे प्रयोग झाले. हे संमेलन १२ दिवस चालले यामध्ये संगीत नाटक, बालनाट्य, तमाशा, किर्तन, दशावतारी, एकांकिका, दिर्घाक यासह अनेक भरगच्च कार्यक्रम झाले. महेश टिळेकरांचा मराठी नाट्यतारकांच्या कार्यक्रमामध्ये ५० नवोदित मराठी महिला पुरुष कलावंतानी भाग घेतला डॉ. अमोल कोल्हे, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, स्मिता तळवळकर, श्रीकांत मोघे, विनय आपटे,
लता नार्वेकर, अभिराम भडकमकर, लालन सारंग, किर्ती शिलेदार, जयमाला शिलेदार, मोहन जोशी, वंदना गुप्ते अशा अनेक कलावंताची उपस्थितीने बारामतीच्या सांस्कृतिक विकासाचा कळस गाठला. दोन्ही नाट्य संमेलनामध्ये सहभागी कलावंताना साहेबांनी स्वतःच्या घरी स्नेह भोजन देवून कलावंताप्रती आपली बांधिलकी नात्याने किती घट्ट आहे हे मराठी कलावंत नाट्यसृष्टीला दिसले.
बारामतीमध्ये कविवर्य मोरोपंतांचे निवासस्थानाचा विकास करण्यात आला असून यामध्ये मोरोपंतांच्या जीवन कार्यावर आधारित प्रसंग साकारले आहेत. तर शिवलिला – अमृतकार श्रीधर स्वामींचे लिखानस्थळ, काशिविश्वेश्वर मंदिराचा विकास झालेला आहे. श्रीमंत बाबुजी नाईकांच्या निवास स्थानाच्या विकासाचा प्रकल्प कार्यान्वीत होत आहे. बारामतीकरांसाठी कविवर्य मोरोपंत ग्रंथालय व विद्या प्रतिष्ठानचे ग्रंथालय तुळजाराम चतुरचंद कॉलेजचे ग्रंथालय आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सुसज्ज असे ग्रंथालय व संदर्भ ग्रंथ दालन उपलब्ध होत आहे. ६० वर्षामध्ये बारामती हे सांस्कृतिक वाटचालीतील महाराष्ट्रामधील एक अग्रणी शहर म्हणून देखील विकसित झाले आहे. कवी ख.म. खंडागळे यांनी काव्यपंगतीमध्ये महती वर्णिली आहे.
वाहे पापहरा कहा झुळूझुळू काशिराजापदी ॥ श्रीसिध्देश्वर भव्य मंदिरी वसे श्रीराम गावामधी । सिमारक्षीत भारुती निवसते माळावरी देवी ती ॥ मोरोपंत कवी श भूषण जिचे ती धन्य बारामती ॥बारामतीला सांस्कृतिक इतिहास आहे. कविवर्य मोरोपंतानी केकावली मधील लिखानामध्ये नमूद केले आहे की, धातूत जसे हाटक । नाटक वर सर्व सुप्रबंधात || म्हणजे धातूत जसे सोने श्रेष्ठ आहे. तसे साहित्यात नाटक नाट्यशास्त्राचे यतार्थ वर्णन करणारे मोरोपंतच, बारामती मध्ये गणेशोत्सवात होणारे मेळे, ब्रिटीश राजवटीला घालविण्याकरिता नाटकाच्या माध्यमातून जनजागृती हा विषय तत्कालीन बारामतीकर नाट्य कलावंतांनी हाती घेवून कार्य केले.
विकासाच्या बारामती पॅटर्नचे देशभर कौतुक होत असताना. यामधील बारामती तालुक्याच्या सर्वांगीन विकास कार्यामधील सांस्कृतिक विकासही एवढाच महत्वपूर्ण आहे. पवारसाहेब नेहमी म्हणतात की, एकदा समाज सुसंस्कृत झाला आहे हे आपण कधी समजावे तर त्या समाजाची सांकृतिक उंची मोजल्यानंतर. याकरिता सांस्कृतिक विकासाचे योगदान देखील महत्वपूर्ण ठरते, साहेबांनी त्यांच्या विद्यालयीन जीवनामध्ये याबाबतचा पाया घातला, आचार्य अत्रे लिखित ‘वंदे-मातरम’ या नाटकामध्ये त्यांनी कल्याण या सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका केली आहे.
विकासाचा बारामती पॅटर्न पाहताना नमूद करावेसे वाटते की, पवार साहेबांनी पाया रचला व अजितदादांनी त्यावर कळस चढविला. बारामती सारखा विकास जर प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या भागामध्ये केला तर खऱ्या अर्थाने एकाचवेळी देशाचा विकास झालेला असेल. तो सर्वांना शक्यही आहे. परंतू गरज आहे ती प्रबळ इच्छा शक्ती व समाजाचे आपण देणे लागतो या जाणिवेची व ती सर्वत्र पूर्ण झाली तर संपूर्ण जग विकासाचा भारतीय पॅटर्न पहायला भारतात येतील त्यादिवशी भारत एक महासत्ता झालेला असेल.