आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एका नव्या आव्हानाचा सामना येत्या काळात करावा लागणार आहे. जगभरात सुरू असलेल्या आयपीएलसारख्या विविध टी-20 लीगच्या मालकांनी काही खेळाडूंना करोडो रुपयांचा एक प्रस्ताव दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडा व आमच्या संघाकडून वर्षभर सुरू असलेल्या विविध लीग खेळा आणि 25 ते 50 कोटी रुपयांचे करार स्वीकारा, असा हा प्रस्ताव आहे. जर देशाच्या संघात आपल्याला स्थान मिळत नाही हे पाहून जर नवोदितांसह संघातील वरिष्ठ खेळाडूंनीही हे प्रस्ताव स्वीकारले तर संपूर्ण जागतिक क्रिकेटलाच धोका पोहोचणार आहे.
ऑस्ट्रेलियात कॅरी पॅकर यांनी जेव्हा वर्ल्ड सीरिज सुरू केली व जगभरातील नामांकित क्रिकेटपटूंना आपल्या स्पर्धेत खेळण्याचा व प्रचंड कमाईचा प्रस्ताव दिला तेव्हाही गॅरी सोबर्स यांच्यापासून जगभरातील अव्वल खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्याची तयारी दर्शवली. तेव्हाच आयसीसीला धोका लक्षात आला होता व त्यांनी या स्पर्धेला मान्यता तर दिली नाहीच; परंतु या स्पर्धेत खेळाल तर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही, असा सज्जड दमही दिला होता.
त्यामुळे पॅकर यांना ही स्पर्धा गुंडाळावी लागली होती. त्याकाळी रंगीत कपडे, पांढरा चेंडू व प्रकाशझोतात होणारी स्पर्धा असे त्यामुळे पॅकर यांच्या स्पर्धेची लोकप्रियता वाढली होती. मात्र, आयसीसीने त्याला पॅकर सर्कस म्हणून हिणवले व ही स्पर्धाच बंद झाली. तेव्हा पॅकर यांनी म्हटले होते की, येत्या काळात अशाच स्पर्धा आयसीसीला घ्याव्या लागतील तरच क्रिकेट टिकेल. घडलेही तसेच.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये रंगीत कपडे आले, पांढरा चेंडू आला व सामने प्रकाशझोतात खेळले जाऊ लागले. मात्र, तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची लोकप्रियता टिकून होती. त्यानंतर टी-20 हा क्रिकेटचा नवा वेगवान प्रकार सुरू झाला. मात्र, तरीही कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेटला फारसा धक्का लागला नाही. कसोटीची लोकप्रियता कमी झाली; परंतु त्याची कारणे भिन्न होती. मात्र, आता विविध टी-20 लीगमध्ये जे संघ आहेत त्यांच्या संघमालकांनी विविध देशांच्या स्टार खेळाडूंना तसेच नवोदित खेळाडूंना करोडो रुपयांच्या कमाईचे गाजर दाखवले आहे. हा प्रस्तावच येत्या काळात रोखला गेला नाही, तर जागतिक क्रिकेटला धोका पोहोचणार, हे नक्की.
खेळाडूंना पर्याय मिळेल; पण…
भारतीय क्रिकेटबाबत बोलायचे झाले, तर सध्या भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी इतकी मोठी स्पर्धा आहे की, शेकडो असे खेळाडू आहेत की जे संघात दाखल होऊ शकतात. मात्र, त्यांची निवडच होत नसल्याने ते सीझनल फळांप्रमाणे आयपीएल ते आयपीएल खेळतात व वर्षभराची पुंजी एकाच स्पर्धेतून 52 ते 55 दिवसांत कमावतात. जर अशा खेळाडूंना या संघ मालकांनी कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव दिले तर हे खेळाडू हे प्रस्ताव निश्चितच स्वीकारतील. असे घडले तर खेळाडूंना पैसा मिळेल यात शंका नाही; परंतु भारतीय क्रिकेटला सेकंड बेंचच मिळणार नाही.
आता आयपीएल स्पर्धेद्वारे जे खेळाडू सरस कामगिरी करतात त्यांना टी-20 किंवा एकदिवसीय सामन्यांचा संघ निवडताना विचारात घेतले जाते; परंतु जर या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व अशा लीगमध्ये सहभाग घेतला तर बीसीसीआयला पर्याय मिळतील का व मिळाले तरी त्यांचा दर्जा काय असेल. देशभरात क्रिकेट हाच एक धर्म मानला जातो व त्याच्या प्रशिक्षण शिबिरात जितकी मुला-मुलींची गर्दी दिसते ती संख्या एखाद्या छोट्या देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तरीही केवळ 11 खेळाडूंनाच देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा लीगकडे सहज खेळाडू आकर्षित होतील. मात्र, त्याचा फटका पुढील काळात भारतीय क्रिकेटला बसल्याशिवाय राहणार नाही.
सशर्त परवानगी द्यावी
जगभरात सध्या आयपीएल स्पर्धेसह वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अमिराती या देशांतही टी-20 लीग खेळल्या जातात. त्यातील विविध संघांची मालकी ज्या कंपन्यांनी घेतली आहे त्याच कंपन्या आयपीएल
स्पर्धेतील विविध संघांच्याही मालक कंपन्या आहेत. शाहरुख खानचा कोलकाता नाइट रायडर्स, मुकेश अंबानींचा मुंबई इंडियन्स यांच्यासह अनेक असे आयपीएलमधील संघ आहेत की ज्यांचे संघ विविध देशांतील टी-20 लीगमध्येही खेळतात. त्यामुळे देशाच्या क्रिकेटचे नुकसान होऊ नये असे वाटत असेल, तर बीसीसीआयने योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. सध्याच्या बीसीसीआयच्या नियमानुसार अन्य देशांतील लीगमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना सहभागी होता येत नाही. त्यांना जर अशा लीगमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांना आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी लागते व बीसीसीआयची परवानगी घेऊनच अशा लीगमध्ये सहभागी होता येते.
हा नियम बदलणे गरजेचे आहे, अन्यथा या लीगचे अतिक्रमण बीसीसीआयच नव्हे तर आयसीसीही रोखू शकणार नाही. यातून संयुक्तिक मार्ग म्हणजे ज्या भारतीय क्रिकेटपटूंना या लीगमध्ये खेळायचे असेल तर त्याने आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहून देशाकडून खेळण्याला प्राधान्य देत या लीगमध्ये खेळावे असा नियम केला, तर जागतिक क्रिकेटला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही. त्यातही भारताकडून खेळून निवृत्ती घेत सध्या अनेक भारतीय क्रिकेटपटू काही लीगमध्ये खेळतात; पण त्यांची कारकीर्द मुळातच संपलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने बीसीसीआयला काहीही फरक पडलेला नाही. मात्र, सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या व सरस कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या शिवम दुबे, व्यंकटेश अय्यर किंवा देवदत्त पडीक्कल यांसारख्या खेळाडूंनी निवृत्ती घेत अशा लीगमध्ये खेळण्याला प्राधान्य दिले, तर भारतीय संघाचे नुकसान अटळ आहे.
केवळ अहंकार नसावा
एकेकाळी बीसीसीआयने आपला अहंकार दाखवताना टी-20 क्रिकेटला जोरदार विरोध केला होता. मात्र, काळाच्या पुढे नमते घ्यावे लागले व भारतीय संघानेच टी-20 क्रिकेटच्या पहिल्यावहिल्या विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले. त्यानंतरच जगमोहन दालमिया व ललित मोदी यांच्या सुपीक डोक्यातून आयपीएलची मुहूर्तमेढ रोवली गेली व त्याचा आज वटवृक्ष बनला आहे. याच स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा जास्त पैसा बीसीसीआयला मिळत आहे. याच पैशाच्या जोरावर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख बीसीसीआयने मिळवली व जागतिक क्रिकेटवर संपूर्ण नियंत्रणही मिळवले. मात्र, प्रत्येक गोष्ट नश्वर असते हे विसरता कामा नये.
एकेकाळी इंग्लंडचे त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व होते ते भारताने मोडले. आता जर बीसीसीआयने आपला अहंकार बाजूला ठेवला नाही तर येत्या काळात अशा खासगी टी-20 लीगमुळे बीसीसीआयचे केवळ वर्चस्वच नव्हे तर मुख्य जागतिक क्रिकेटही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. टी-20 क्रिकेटला विरोध, मग डीआरएसला विरोध मग गुलाबी चेंडूवरील कसोटी सामन्यांना विरोध अशा भूमिका घेत नंतर बीसीसीआयने हे सर्वकाही मान्य केलेच ना. मग काही भारतीय क्रिकेटपटूंना भारताच्या संघात स्थान मिळत नसेल तर त्या काळात होत असलेल्या अशा लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली गेली तरच त्यांनाही स्थैर्य मिळेल, पैसा मिळेल व यातूनच भारतीय संघाला मॅचफिट सेकंड बेंचही मिळेल.
वेळेपूर्वीच निवृत्ती होईल
आयपीएल स्पर्धेतील काही संघांनी परदेशी लीगमध्येही सहमालकी हक्क मिळवले आहेत. यातील एका संघाने इंग्लंड संघातील तब्बल सात खेळाडूंना खासगी लीग टी-20 स्पर्धेत खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव 25 ते 50 कोटी रुपये इतक्या प्रचंड रकमेचा आहे. पैशाकडे आकर्षित होत आपल्या काही खेळाडूंनी देशाच्या संघात निवड होत नसल्याच्या नैराश्यामुळे असे प्रस्ताव स्वीकारले तर काय होईल याची कल्पनाही न केलेली बरी. रिंकू सिंगसारखे असे काही खेळाडू ज्यांना आपण उदयोन्मुख म्हणतो त्यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आपले वर्चस्व निर्माण केले.
मात्र, त्यांनाही येत्या काळात भारतीय संघात स्थान दिले गेले नाही तर ते वेळेपूर्वीच निवृत्ती जाहीर करत अशा लीगमध्ये खेळतील व आपण लोकेश राहुलसारख्या जावयांनाच खेळवत राहू. नवोदितांची कारकीर्द बहरण्यापूर्वीच संपुष्टात येईल व त्याचा सर्वात जास्त फटका भारतीय संघाला बसेल इतकी साधी गोष्ट बीसीसीआयच्या लक्षात येत नसल्याबद्दलच आता आश्चर्य वाटत आहे. असो, पॅकर सर्कसचे आव्हान त्यावेळी जरी आयसीसीने थोपवले होते तसे आता अशा लीगचे आव्हान थोपवणे कोणालाही शक्य नाही. केवळ अशा लीगमध्ये खेळण्यावर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. बीसीसीआयच्या हाती जर जागतिक क्रिकेटच्या नाड्या आहेत, तर त्यांनी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांना एकत्र आणून यावर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे अन्यथा आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासजमा होईल.
अमित डोंगरे