राजस्थान कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदी शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलटपक्षी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील विसंवादाची दरी अधिकच रुंदावत चालली आहे. ताजा वादाचा मुद्दा पायलट यांनी काढलेली “जनसंघर्ष यात्रे’चा आहे. शिवाय, पायलट आणि गेहलोत या दोघांनी परस्परांवर भाजपशी सलगी करण्याचा आरोप केल्याने या सुंदोपसुंदीला हास्यास्पद स्वरूप प्राप्त झाले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत (2018) कॉंग्रेसला 200 पैकी 100 जागा जिंकता आल्या होत्या. तत्पूर्वीच्या म्हणजे 2013 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या 21 जागांवर समाधान मानावे लागले होते. तेव्हा त्यानंतर पाचच वर्षांत कॉंग्रेसने केलेली ही कामगिरी लक्षणीय होती आणि पायलट यांचे त्यात मोठे योगदान होते.
साहजिकच त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असण्यात गैर नव्हते. मात्र, कॉंग्रेस श्रेष्ठींनी मुखमंत्रिपदाची धुरा गेहलोत यांच्यावरच सोपविली. त्यानंतर येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानात कॉंग्रेस उत्तम कामगिरी बजावेल अशी अपेक्षा होती. मात्र, कॉंग्रेसचा अपेक्षाभंग झाला.
राज्यात सत्तेत असूनही कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत आपले खातेही उघडता आले नाही. हे गेहलोत यांचे अपयश आहे, असा दावा करीत पायलट यांच्या महत्त्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली. तेव्हापासून पायलट-गेहलोत असा कधी सुप्त तर कधी उघड संघर्ष होत आला आहे.
या वर्षी राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापासूनच तेथे ताकद ओतण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसमधील बेदिलीचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ असली, तरी राजस्थान भाजपची स्थितीदेखील एकजिनसी नाही. तेव्हा वरकरणी भाजपला संधी आहे असे वाटत असले तरी भाजपसमोर देखील आव्हाने कमी नाहीत.
सचिन पायलट यांनी 2020 साली गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारले होते. मात्र, मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडाने तेथील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले तसे पायलट राजस्थानात घडवू शकले नाहीत. किंबहुना गेहलोत यांनी ते बंड मोडून काढले आणि राजस्थान कॉंग्रेसवर आपलेच वर्चस्व आहे हे सिद्ध केले. त्या बंडाला भाजपचा अंतःस्थ पाठिंबा होता अशी वदंता होती. मात्र, पायलट यांच्यासह अठरा आमदारांनी बंड केले असताना आपले सरकार भाजपच्या वसुंधराराजे, कैलास मेघवाल आणि शोभारानी कुशवाह यांच्यामुळे वाचले असा “गौप्यस्फोट’ गेहलोत यांनी नुकताच केला.
त्यापूर्वीच सचिन पायलट यांनी भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीची पुनरुक्ती केली होती. त्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी आपल्या सरकारचे पतन रोखण्याचे श्रेय विरोधी पक्षनेत्यालाच दिल्याने पायलट यांना गेहलोत यांना लक्ष्य करण्याची संधीच मिळाली. गेहलोत यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधराराजे आहेत अशी टिप्पणीही पायलट यांनी केली. तथापि, त्या बंडाच्या वेळी पायलट यांच्यासह त्यांच्या अठरा सहकाऱ्यांनी भाजपकडून “अर्थ’पूर्ण सहकार्य मिळविले होते, असा आरोप गेहलोत यांनी नुकताच केला आहे. या कलगीतुऱ्याचा आता पुढचा अध्याय लिहिला जात आहे आणि तो म्हणजे पायलट यांनी आपल्याच सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेली पदयात्रा.
पाच दिवसांची ही अजमेर ते जयपूर अशी सव्वाशे किलोमीटरची पदयात्रा 11 मे रोजी सुरू झाली आहे. भाजपच्या काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या तपासाचा आणि राजस्थान लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पेपरफुटीच्या प्रकरणाचा मुद्दा पायलट हे या यात्रेदरम्यान उपस्थित करणार आहेत. या दोन्ही मुद्द्यांवर उत्तरे देण्याची जबाबदारी गेहलोत सरकारचीच असल्याने “ही यात्रा कोणा व्यक्तीच्या विरोधात नसून मुद्द्यांवर आधारित आहे’ असा दावा पायलट यांनी केला तरी त्यांचा रोख गेहलोत यांच्याकडेच आहे हे लपलेले नाही. गेल्याच महिन्यात श्रेष्ठीची सूचना झुगारत पायलट यांनी आपल्याच सरकारवर दबाव टाकण्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले होते. आताही त्यांच्या यात्रेत हजारो समर्थक सामील होत असले तरी गेहलोत यांची पक्षावरील पकड सैल करण्यात पायलट यांना यश आलेले नाही.
राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ यात्रेच्या वेळी पक्षातील नेत्यांनी या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून दोघांना तंबी दिली होती. मात्र, तो समेट तकलादू आणि तात्पुरता होता हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास मात्र नकार दिला आणि त्यावरून घडलेल्या नाट्यात सुमारे ऐंशी आमदारांनी गेहलोत यांच्या समर्थनार्थ राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. गेहलोत यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली असती तर कदाचित पायलट यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग प्रशस्त झाला असताही; पण भाजपच्या मदतीने बंड करणाऱ्याला मुख्यमंत्रिपद नको या गेहलोत समर्थक आमदारांच्या हट्टापुढे कॉंग्रेस श्रेष्ठीना नमते घ्यावे लागले.
गेहलोत कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले तरी राजस्थानची सूत्रे आपल्याकडेच राहतील याची त्यांनी तजवीज केली. 2020 च्या बंडानंतर पायलट यांना प्रदेशाध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही गमवावे लागले होते. आपण राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांतील आहोत असा पायलट यांचा दावा असतो; तरीही राजस्थान कॉंग्रेसमध्ये खांदेपालट होऊ शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. पायलट आता करीत असलेले उपोषण किंवा यात्रा यांचा हेतू गेहलोत यांच्यावर दबाव टाकण्याबरोबरच श्रेष्ठींसमोर शक्तिप्रदर्शन करण्याचाही असू शकतो. मात्र, पंजाबात नवज्योतसिंग सिद्धू यांच्या आहारी जाऊन अमरिंदर सिंग यांना नाराज करून कॉंग्रेसने ते राज्य गमावण्याची जी चूक केली तिची पुनरावृत्ती राजस्थानात नको अशी कॉंग्रेस नेतृत्वाची धारणा असेल तर त्यात गैर नाही. पायलट यांच्या यात्रेपासून पक्षाने अंतर राखले आहे हेही पुरेसे बोलके आहे. पायलट यांची कोंडी करण्याची एकही संधी गेहलोत सोडत नाहीत. शिवाय गेहलोत यांची राजकीय उपयुक्तता संपली आहे असा कंठशोष पायलट यांनी केला तरी तसा पुरावा त्यांच्याकडे नाही.
गेल्या चार वर्षांत राजस्थानात झालेल्या सर्व पोटनिवडणुकांत अपवाद वगळता कॉंग्रेसला यश मिळाले आहे. तेव्हा आताच्या विधानसभा निवडणुकीत गेहलोत यांचे नेतृत्व लाभदायी ठरणार नाही हे पायलट सिद्ध करू शकलेले नाहीत. त्यामुळे पायलट यांची पक्षावर अधिकार सांगण्याची बाजू आणखीच लंगडी पडते. विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असताना गेहलोत-पायलट संघर्षावर तोडगा काढणे कॉंग्रेससाठी इष्ट ठरेल हे खरे; पण त्यात पायलट यांच्या वाट्याला किती अधिकार येईल हे सांगता येणे अवघड आहे. कॉंग्रेसमध्ये अपेक्षित स्थान मिळाले नाही तर पायलट भाजप किंवा आम आदमी पक्षात (आप) प्रवेश करतील अशाही चर्चा होत्या.
भाजप राजवटीतील कथित भ्रष्टाचाराच्या तपासाच्या मुद्द्यावरून गेहलोत यांना लक्ष्य करायचे आणि स्वतः त्याच भाजपमध्ये प्रवेश करायचा हा ढळढळीत दुटप्पीपणा ठरेलच; शिवाय पायलट यांनी भाजपमध्ये येण्यास वसुंधराराजे किती अनुकूल असतील हाही प्रश्न आहेच. मुख्यमंत्रिपदावर वसुंधराराजे यांचाच दावा असताना पायलट उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये जातील ही शक्यता कमी. ते तर त्यांना कॉंग्रेसनेही दिले होते. तेव्हा उरला “आप’. पायलट यांच्यासारखा नेता मिळाला तर त्या पक्षाला हवाच असणार. मात्र, तेथेही प्रश्न पायलट हे केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर काम करतील का, हा उरतोच. तेव्हा कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदीचा पुढचा टप्पा कोणता हे ठरविणे कठीण असले तरी या सगळ्या घडामोडींत गेहलोत यांचे स्थान भक्कम होत आहे यात शंका नाही.
अर्थात, कॉंग्रेसमधील बेदिलीचा लाभ घेण्यासारखी भाजपची स्थिती आहे का, हीही शंकाच आहे. मोदींनी नुकताच मेवाडचा दौरा केला आणि आदिवासी समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. याच भागात भारतीय ट्रायबल पक्षाने आपले बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला दोन जागांवर विजय मिळाला होता. राजस्थानात सुमारे पंचवीस जागांवर आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे; मात्र त्या पट्ट्यात भाजपला सध्या फारसे स्थान नाही.
भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी गेल्या वर्षी आदिवासी गौरव यात्रा काढली होती. राजस्थानात आदिवासींचे प्रमाण 24 टक्के आहे; तेव्हा त्यावर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले असल्यास नवल नाही. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदी निवडून आणल्याचा दाखला भाजप तेथे सातत्याने देणार यातही शंका नाही. मात्र, वसुंधराराजे आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यांच्यातील दुरावा पुरेसा उघड आहे. तेव्हा एकीकडे मोदींनी गेल्या आठ महिन्यांत राजस्थानचा पाच वेळा दौरा केलेला असताना आणि विकासकामांचा धडाका लावलेला असताना प्रत्यक्ष राजस्थान भाजप संघटनेत एकवाक्यता आहे का, हा खरा प्रश्न आहे.
भैरवसिंह शेखावत आणि वसुंधराराजे हे दोनच मुख्यमंत्री भाजपला आजपावेतो त्या राज्यात ठाऊक होते. मात्र, आता वसुंधराराजे यांना आव्हान मिळू लागले आहे आणि त्या पर्यायांना केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा नसलेच असे सांगता येत नाही. गुलाबचंद कटारिया यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील एक स्पर्धक भाजपने कमी केला असे मानले जात असले तरी वसुंधराराजे यांना अंतर्गत विरोधक आहेत यात शंका नाही.
सतीश पुनिया आणि वसुंधराराजे यांच्यातून विस्तव जात नसल्याने भाजपने पुनिया यांच्या जागी चंद्रप्रकाश जोशी यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे हे खरे; तथापि याचा अर्थ वसुंधराराजे यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व सर्व सूत्रे बहाल करेल असा नाही. अशा वेळी वसुंधराराजे यांची भूमिका काय असेल हेही पाहणे औत्सुक्याचे. एक खरे, राजस्थानात कॉंग्रेसमधील दुफळीमुळे भाजपला सत्तांतराची संधी असली तरी भाजपही तशाच गटबाजीपासून त्रस्त असल्याने ती संधी सत्यात उतरविणे आव्हानात्मक आहे.
राहुल गोखले