सुशील कुमारकडून आदर्श घेत देशात नवनवे कुस्तीपटू नावारूपाला आले आहेत, पण आता ते त्याच्याकडून कोणता आदर्श घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजधानी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात हरियाणाच्या सागर धनखड या कुस्तीपटूचा खून झाला. या खुनाचा आरोप ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याच्यावर झाला.
एक खेळाडू जेव्हा अफलातून कामगिरी करतो तेव्हा त्याच्याकडून आदर्श घेत नवनवे खेळाडू नावारूपाला येतात. सुशीलकडून आता कोणता आदर्श घेणार, अलौकिक प्रतिभेचा की आपल्या मार्गात अडथळा ठरू शकत असलेल्यांना मारण्याचा.
कुस्ती स्पर्धांमध्ये होत असलेले वाद किंवा भांडणे नवी नाहीत; पण त्यातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. अतिअक्रमकता कधी कधी अंगाशी येते याचेच हे उदाहरण आहे. मुळातच सुशील कुमारबाबतचे वादही नवे नाहीत. त्याच्या वर्तनावरून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा टीका झालेली आहे. खरेतर दोन ऑलिम्पिक पदके मिळवत सुशीलकुमार देशाचा पहिलाच कुस्तीपटू ठरला होता.
2012 सालच्या लंडन स्पर्धेत व त्यापूर्वी 2008 सालच्या बिजिंग स्पर्धेत त्याने अनुक्रमे रजत व ब्रॉंझपदक पटकावत हा विक्रम साकार केला होता. भारताचा सर्वात गुणवान व अत्यंत आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेला सुशील कुमार फ्रिस्टाइलमध्ये आजही अजोड आहे. 2010 साली त्याने जागतिक स्पर्धेचे विजेतेपद पदकावल्यानंतर तर त्याच्याकडून प्रेरणा घेत देशात कुस्ती आणखीनच प्रसिद्ध झाली.
केवळ 37 व्या वर्षीच त्याला खेलरत्न, अर्जुन व पद्मश्री असे देश पातळीवरील अत्यंत मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. आता त्याच्याकडून पुरस्कार काढून घेतले जायला हवेत. खेळाडू कोणताही असो त्याच्याकडून अपराध घडल्याचे सिद्ध झाले तर त्याची आधी जितकी प्रसिद्धी केली गेली तितकीच निंदाही होणारच. ऑलिम्पिक पदक विजेत्या खाशाबा जाधव यांच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर सुशील कुमारनेच या खेळात देशाचे नाव उंचावले हे मान्य मात्र, आता तो एक खेळाडू नव्हे तर खूनी म्हणून चर्चिला जात आहे.
सत्य बाहेर येईपर्यंत सुशील कुमारवर खेळण्याची बंदीही लावली गेली पाहिजे व तो दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याची कामगिरी रद्द केली पाहिजे. तरच येणारी पिढी चुकीचा आदर्श ठेवणार नाही. आपल्या देशात आजवर अनेक गुन्हेगारांचे उदात्तीकरण झाले आहे, तसेच सुशील कुमारचे होऊ नये. देशात गाजलेल्या गुन्हेगारांचे चित्रपट संतापाऐवजी उत्सुकतेने पाहणारी ही पिढी सुशील कुमारच्या बाबतीत कठोर होईल का, हाच काय तो प्रश्न आहे.
यशवीर, रामपाल तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू सत्पाल यांच्या अलौकिक कामगिरीने गाजलेला छत्रसाल आखाडा सुशीलच्या गुन्ह्यामुळे बदनाम झाला आहे. खुद्द सत्पाल यांचाच जावई असलेला सुशीलकुमार देशाचाही जावई होऊ नये व दोषी असला तर एका सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्यालाही शिक्षा झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे.
“मी म्हणजेच भारतीय कुस्ती’ हा अहंपणा राखलेल्या सुशील कुमारला आयुष्यभर लक्षात राहील अशी चपराक मिळणे, नव्या खेळाडूंवर धाक ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अमित डोंगरे