कधीतरी नात्यांचाही अनोखा सण असावा. समज, गैरसमज यांची जळमटं स्वच्छ करावीत, नव्या संवादाचा उपसा करावा, पुन्हा नव्या भेटींचे वाफे करून नव्याने रुजवण करावी. चिंच-मिठाने घासलेल्या तांब्या पितळेच्या भांड्यांसारखी चमकतात मग नाती. लाट सागरात उंच उठते, आकाशाला गवसणी घालेल असे वाटते, पण जोर ओसरला की तळाशी असलेल्या किनाऱ्यावर विसावते. किनारा कुठेच जात नाही. त्याचा जन्मच लाटांना सांभाळण्यासाठी झालाय.
लाटेनं भाळायचं अन् किनाऱ्यानं सांभाळायचं. हेच त्यांचं जगणं म्हणू हवं तर. आपण काय करतो खरंतर, अपेक्षांचे बंधारे बांधून नात्यांचे झरे अडवतो आणि पाणी साचलं की संवाद संपल्याची ओरड करतो. जेवढं प्रवाही तेवढं ते नितळ असतं हे साधं गणित आपण विसरतो.
पूर्वी दूरदर्शनवर एक ऍनिमेटेड गोष्ट दाखवायचे. त्यात चार लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना एका हत्तीजवळ आणून उभे केले जायचे.
एकाला हत्तीच्या कानाजवळ, एकाला सोंडेजवळ, एकाला पायाजवळ आणि एकाला शेपटीजवळ. त्यानंतर त्यांना हत्तीचे वर्णन करायला सांगितले जायचे. तेव्हा एकजण हत्ती खांबासारखा आहे असे म्हणतो, दुसरा सुपासारखा, तिसरा मुसळासारखा तर चौथा हत्ती दोरीसारखा आहे असे म्हणतो. त्यानंतर त्यातील प्रत्येक जण हत्ती आपण सांगतोय तसाच आहे हे आग्रहाने सांगू लागतो.
चर्चेचे रूपांतर वादात आणि पुढे वादाचे पर्यवसन भांडणात पर्यायाने मारामारीत होते. आपलेच खरे कसे हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात प्रत्येक जण स्वतःचा विवेक हरवून बसतो. मग त्यांच्यामधे पाचव्याला हस्तक्षेप करावा लागतो. हा पाचवा खूपच धोरणी असतो. तो चौघांच्या डोळ्यांवरची पट्टी काढतो आणि हत्ती खरा कसा दिसतो ते चौघांना दाखवतो. आपली चूक समजल्यावर पाचव्यासह सर्वजण हत्तीभोवती नाचू लागतात.
गोष्ट इथे संपते. वास्तव मात्र काही वेगळेच असते. खऱ्या परिस्थितीतही बऱ्याचदा एखादा प्रसंग हत्तीच्या जागी असतो तर आपण आंधळ्यांच्या जागी. कोणत्याही घटनेकडे सारासार विचारदृष्टीने न बघता आपण त्याच्यावर बऱ्याचदा पूर्वग्रहदूषित मते व्यक्त करतो किंवा जरी मानले की प्रत्येकाची विचारसरणी, विचार करण्याची पद्धत वेगळी असली तरी जेव्हा सामुदायिक लाभाचा मुद्दा येतो तेव्हा आपण लवचिकता ठेवायला हवी. नाहीतर आहेच की ये रे माझ्या मागल्या. आपण पुन्हा आपल्या गोलात जाऊन उभे राहतो. आपापले कोष आपल्याला प्रिय असतात.
आयुष्य जगताना आपण सुटसुटीत जगण्यापेक्षा गुंतागुंतच जास्त करून घेतो बऱ्याचदा. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच की. तसंच आहे आयुष्याचेही. आपण कसं जगायचं ते आपणच ठरवलं पाहिजे नाही का? त्यात आम्ही स्त्रिया जरा जास्तच भावनिक होतो आयुष्याच्या बाबतीत आणि मग गळ्यापर्यंत अपेक्षांच्या ओझ्यात बुडून जगत राहतो. मारतोही एखादी उसळी, मोकळा श्वास घ्यायची इच्छा होते तेव्हा, पण ते ही तेवढ्यापुरतच. पुन्हा आहेच ती अपेक्षांची दलदल.
रामासोबत वनवासाला जाताना त्या सीतेला वनवास म्हणजे पतीसोबत राहायची संधी वाटली पण जेव्हा तिच्या हातात वल्कले ठेवली गेली तेव्हा तिला माहितीच नव्हते की ती नेसायची कशी? ती निरागसपणे त्या वल्कलांकडे पाहात राहिली. शेवटी रामानेच तिला वल्कले नेसायला शिकवले. यासाठीच नात्यात नितळता असायला हवी.
कोणीतरी कुठेतरी लिहिलेलं आठवतेय की, खरे पाहता आपली जोडलेली नाती म्हणजे एखाद्या वहीच्या कोऱ्या कागदासारखीच असतात, जन्मतः कोरी पण नंतर काही ना काही पांढऱ्यावर काळं गिरवत राहणारी आणि शेवटी अपेक्षांच्या शाईने विरली जाऊन फाटणारी! त्या वहीतच जगताना भोगलेल्या साऱ्या जन्म-मरणांची कवने रचायची. त्यालाच कविता म्हणायचे. कधीतरी त्याच कागदांवर मरणाचा पुरावा आणि सरणाचा पत्ता लिहून घ्यायचा कोण्या परक्या हातांकडून. मग उरतात ते फक्त काही ओल्या ऋणानुबंधांचे अवशेष.
ते असे कितीसे असणार. तेच मग एखाद्या मोरपीसासारखे आश्वस्तपणे जपून ठेवायचे आणि मिटायची वही. नात्यांचे गणितही असेच असावे. त्यात गणिताची सारी सूत्रे असावीत पण ती प्रामाणिक असावीत. माणसाच्या आयुष्याचा प्रवास आणि एखाद्या नात्याच्या आयुष्याचा प्रवास; दोन्हीमध्ये खूपच समानता आहे!
ह्या प्रवासात बरोबर चालणारे सहप्रवासी, नातेवाईक, मित्र हे सगळेच कधी समांतर वाटा, कधी भलतीकडेच जाणारे फाटे, कधी अवघड घाटवळणं, कधी रम्य पायवाटा, कधी येऊन मिळणारे उपरस्ते अशाच स्वरूपाचे असतात. अगदी लग्नाचा, आयुष्याचा जोडीदारसुद्धा एखाद्या अनवट, अनोळखी वाटेसारखाच एका वळणावर भेटतो. मग आठवते “इस मोडसे जाते है.. कुछ सुस्त कदम रस्ते.. कुछ तेज कदम राहे..’ नात्यातील हा असा ताजेपणा टिकण्यासाठी नात्याचा आगळावेगळा असा एखादी सण असायलाच हवा.
मानसी चिटणीस