मुंबई – आयुष्यभर खोटे बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. तर रोहित पवारांनी बेलगाम आरोप करुन सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रेनंतर, रोहित पवार यांनी यात्रा काढली. राहुल गांधींपेक्षा त्यांची यात्रा मोठी होती असे त्यांना वाटते. त्यामाध्यमातून त्यांना मिळालेला आनंद नैराश्यच्या माध्यमातून त्यांना झाकता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात येत आहेत.
अजित पवार यांना त्यांच्या गुणवत्तेवर संधी मिळाली आहे. पहिली त्यांनी लोकसभा निवडणूक लढलेली होती. त्यानंतर त्यांना प्रत्येकवेळी मताधिक्य मिळाले आहे. आज ४३ आमदार बाहेर पडले, कारण अजित पवार यांनी त्यांच्यासाठी काहीतरी केले आहे म्हणूनच. आमदार यांनी जे पत्र दिले होते ते विधीमंडळ नेता निवडीसाठी दिली होते. तर अजित पवार यांनी कायम स्वत:चे नाव समोर केले.
आयुष्यभर खोटे बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावे यासाठी आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सह्या केल्या होत्या. सर्व काही हातून गेले की असे बेलगाम दावे केले जातात.
भाजपसोबत जाण्याबरोबरच जितेंद्र आव्हाड ज्या पत्राचा उल्लेख करत आहेत, त्या पत्रबाबत मला माहिती नाही. भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी सगळ्यांनी सह्या केल्या होत्या, असेही त्यांनी म्हटले.
त्यासाठी गुणवत्ता हवी
जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते व्हायचे होते. मात्र त्यासाठी गुणवत्ता लागते. शरद पवार यांची राजकारणातील ६० वर्षांची तपश्चर्यामधून हे माहिती झाले आहे की, कुणाला संधी द्यायची. मी लायक हा शब्द वापरणार नाही. त्यासाठी गुणवत्ता हवी असते असे म्हणत तटकरेंनी आव्हाडांना टोला लगावला आहे.